आंतरराष्ट्रीय पर्वत दिन
सोमवार , दिनांक - ११ डिसेंबर २०१७.
भिष्मराज बाम... एक देवतुल्य व्यक्तिमत्त्व - भाग २
बोलण्याच्या ओघात मी फिटनेस कसा सांभाळतो याबाबत सरांनी सहजच विचारलं. मी आपलं साधेपणाने माझी पद्धत सांगीतली. पोलीस दलाच्या अडनिड्या कर्तव्यातुन नियमितपणे सरावाकरीता वेळ मिळणं अशक्य नाही. पण अवघड नक्कीच आहे. गिर्यारोहणासारख्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगिण विकास साधणा-या अन् उत्तुंग पर्वतांनाही गवसणी घालणाऱ्या छंदाकरीता तर सतत डोंगर चढाईची आव्हाने पेलत राहणे हाच सर्वोत्तम व्यायाम आहे. या उत्तरावर सर भलतेच खुष झाले. एक्झॅक्टली ... मला हेच अपेक्षित होतं म्हणाले. तुझी गाडी अगदी योग्य ट्रॅकवर आहे. त्याचवेळी माझ्या टाचेत होणाऱ्या त्रासामुळे मी कसा त्रस्त झालोय याची रामकहाणी मी सरांना ऐकवली. त्यातील माझी आगतिकता आणि त्याचा माझ्या मानसिकतेवर होणारा दुष्परिणाम सरांनी बरोब्बर हेरला. आणि काही चपखल उदाहरणं देऊन विशिष्ट व्यायामावर भर द्यायचा सल्ला दिला.
सरांनी माझ्यावर केलेल्या या अनुग्रहानंतर माझ्यातील सकारात्मक बदल मला जाणवू लागले. त्याच वर्षी (सन २०१३) इंडियन माऊंटेनिअरिंग फाऊंडेशन या भारत सरकारमार्फत गिर्यारोहणाचं नियंत्रण आणि नियोजन करणाऱ्या संस्थानामार्फत हिमाचल प्रदेशातील दुर्गम पर्वतराजीत "अल्पाईन क्लाईंबेथाॅन" नांवाची आंतरराष्ट्रीय महत्व असलेली हिमालयीन गिर्यारोहण मोहीम पहिल्यांदाच आयोजित करण्यात आली होती. याकरीता संपूर्ण देशभरातुन निवडण्यात आलेल्या ५५ सदस्यांमध्ये मी देखील एक होतो.
अशा मोहीमेत सरांनी दिलेल्या गुरुमंत्रांचा खुबीने वापर करीत ती महाकर्मकठीण मोहीम तर मी पूर्ण केलीच शिवाय हिमाचल प्रदेशातील "बडा शिगरी" नामक अतिदुर्गम हिमनदीवरील ६,२०० मीटर उंचीचे एक अनामिक हिमशिखर यशस्वीरीत्या सर करण्यात मी यश मिळवले. इतकेच नाही तर त्या मोहीमेत "अल्पाईन स्टाईलने" एखादं हिमशिखर यशस्वीरीत्या सर करणारा, वयाची चाळीशी उलटून गेलेला मी एकमेव नागरी सदस्य होतो.
सरांच्या दिव्य अनुग्रहामुळे माझा आरोहणरथ जणू सुसाटच सुटला. पुढील वर्षी म्हणजे २०१४ मध्ये तर पट्टीच्या आरोहकांनाही जेरीस आणणा-या जम्मू-काश्मीर मधील मा. नुन या ७,१३५ मीटर उंचीच्या हिमशिखरालाही चांगली दणदणीत धडक दिली. पण लहरी हवामानाशी जास्त पंगा घेणं सयुक्तिक आणि व्यवहार्य न वाटल्याने ६,५०० मीटरवर बिघडलेल्या हवामानाशी सतत ४ दिवस झुंज देत असतांनाच यशस्वी माघारीचा निर्णय नाईलाजाने मलाच घ्यावा लागला. मोहिम आवरती घेतल्यानंतर सगळे थकले जीव आपापल्या घरट्यांकडे भुर्रकन उडुन गेले. पण त्यातील बामसरांच्या या भक्ताने अद्याप हार मानली नव्हती.
मुंबईला परतण्याऐवजी माझी भटकंतीची पायगाडी उलटी फिरवुन मी भटक्यांची पंढरी लेह गाठली. सुमारे २०-२२ दिवस मा. नुन या मातब्बर हिमशिखराशी प्राणपणाने लढुनही अंगातली रग अद्याप पुरेशी जिरली नव्हती. किंबहुना खेळाडूने रग जिरु द्यायचीच नसते, तर ईप्सित ध्येयाप्रत पोहोचण्यासाठी तीचा खुबीने वापर करायचा असतो. हा बामसरांचा मंत्र डोक्यात ठेऊन मी लेहजवळचे मा. स्तोक कांग्री हे ६,१२३ मीटरचे शिखर तिथल्या फावल्या वेळेत सर करण्यात यशस्वी झालो.
अनेक मोहीमांचा अनुभव असलेल्या माझ्यासारख्या आरोहकाने मा. स्तोक कांग्रीसारखं शिखर सर करण्यात खरंच विशेष काही नव्हतं. विशेष होता बामसरांनी केलेला अमोघ उपदेश. माझ्यासारख्या अतिसामान्य व्यक्तीवर सरांनी अक्षरशः ज्ञानकुंभच रिता केला होता.
मा. स्तोक कांग्री हे ट्रेकिंग पिक जरी मी सर केलं असलं तरी ती मोहीम केवळ एका सदस्याची अर्थात माझी एकट्याची होती. जगभरातुन तेथे या शिखरावर चढाईकरीता लोक येत असले तरी मी मात्र एकटाच होतो. शिवाय मा. नुनवर बरीच शक्ती खर्च झाली असतांनाही स्तोक कांग्री हे शिखर मी लेह पासून अवघ्या २२ तासांत सर केले होते. इतकेच नाही तर लेह सोडल्यापासुन स्तोक कांग्रीवरील आरोहण एकट्यानेच सहीसलामतरित्या पूर्ण करुन अवघ्या ३४ व्या तासाला मी लेहमधल्या माझ्या काॅटेजमध्ये संध्याकाळचा चहा घेत निवांत बसलेलो होतो. ही जादु होती सरांच्या दैवी वाणीची.
२०१५ मध्ये देखील मला सरांच्या शब्दांची मोहिनी आजमावण्याची संधी मिळाली. ते वर्ष क्रांतीशिरोमणी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आत्मार्पणाचं ५०वं स्मृतीवर्ष होतं. त्यानिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नांवाने एखादं भव्यदिव्य कायमस्वरूपी स्मारक हिमालयात देखील उभारलं जावं याकरीता स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारकामार्फत हिमाचल प्रदेशातील कर्चा नाला परिसरातील अजिंक्य अनामिक शिखराची निवड करण्यात आली होती. या शिखरावरील मोहीम यशस्वी करून त्या अजिंक्य अनामिक शिखरास स्वा. सावरकर यांचे नांव देण्याचा स्मारकाचा मानस होता. अशा मानाच्या मोहीमेतला एक आरोहक सदस्य म्हणून अगदी शेवटच्या क्षणाला माझी देखील निवड करण्यात आली होती.
स्वा. सावरकरांच्या नांवाचा जादुई करिष्मा अन् बाम सरांच्या शब्दांची पुण्याई, एक जगन्मान्य प्रखर राष्ट्रभक्त अन् भाषाप्रभू तर दुस-याच्या शब्दा-शब्दात अपरंपार सामर्थ्य. आणि हे दोघेही माझे श्रद्धास्थान आणि उर्जास्त्रोत असल्याने या अपूर्व योगाने मी मात्र अंतर्बाह्य उजळून निघालो होतो.
या मोहिमेतील एक प्रसंग अतिशय बाका होता. शिखरचढाई अंतिम टप्प्यात आलेली. अन् अचानक आमच्या प्रमुख गाईडने तो जिथंपर्यंत पोहोचला होता. तोच शिखरमाथा आहे असं सांगून चढाई थांबवली. काही मिनिटांतच मी त्याच्याजवळ पोहोचून त्याला विचारले असता त्याने छातीठोकपणे हाच शिखरमाथा असल्याचे मला ठणकावले.
हवामान फाॅगी असल्याने काही अंदाज येत नव्हता. माझं अंतर्मन मात्र तिथं चढाई थांबविण्याची ग्वाही देत नव्हतं. त्यावेळी मी सर्व टिमवर एक नजर फिरवली असता, सर्वजण आतोनात थकलेले दिसले. त्यात माझाही समावेश होता. ५२०० मीटरवरील कँप २ पासुन सुमारे ६ तास सातत्याने चाललेली चढाई, त्यातच मध्यरात्रीपासुनच त्या काहीशा बिघडलेल्या हवामानातच शिखरचढाईचा अट्टाहास अशा ब-याच बाबी याला कारणीभूत होत्या. पण ही मोहिम देखील अशी तशी नव्हती. इथं १९,००० फूट उंचीवर मी त्या गाईडचं एक चांगलं सविस्तर बौध्दिक घेतलं.
मनाची कवाडं उघडून जगाकडे विशाल नजरेने पहायचे असेल तर विविध खेळ खेळणे गरजेचे आहे. नुसतंच खेळणे नाही तर त्यातुन सर्वांगीण विकास आणि आत्मोन्नती साधता आली पाहीजे. आणि त्यासाठी खेळातील मानसशास्त्राचे बारकावे ज्ञात असणं अत्यंत आवश्यक आहे. हि बामसरांची शिकवण तेथे कामी आली.
अगदी शांतपणे, मधुरवाणीने अन् पुढाकार घेऊन त्यावेळी मी हे कार्य मोठ्या हिंमतीने करु शकलो. तोपर्यंत सर्वांनाच अविश्रांत चढाईच्या थकवणा-या कामातुन एक छोटीशी विश्रांती मिळाल्याने सारेच तरतरीत झाले. अन् पुढील तासा- दिडतासाच्या चढाईनंतर आम्ही त्या अजिंक्य, अनामिक हिमशिखराच्या सर्वोच्च माथ्यावर होतो. ( लवकरच त्या हिमशिखराला स्वा. सावरकर असं महान नामाभिधान अधिकृतपणे लाभणार आहे.)
गिर्यारोहण क्षेत्रातील बामसरांचं योगदान असामान्य असं होतं. हे नांव माहित नाही असा क्रिडाप्रेमी निदान महाराष्ट्रात तरी अाढळणार नाही. गिर्यारोहण आणि गिर्यारोहकांकरीता तर त्यांची कवाडं सदाच उघडी असत. त्यांचं याबाबत म्हणणं असायचं कि इतर खेळ कायम लाईमलाईटमध्ये असतात. पण गिर्यारोहणाला तसं भाग्य नाही, अन् त्याची गरजही नाही. गिर्यारोहक स्वयंभु असतात. कारण स्वतः निसर्गच त्यांचा खरा मार्गदर्शक असतो. हा सर्वसामान्यांनी जोपासलेला खेळ असला तरी ना तो खेळ सामान्य आहे ना त्यातील खेळाडु सामान्य असतात.
मर्दाचा पोवाडा मर्दानेच गावा अशी एक म्हण आहे. कारण गिर्यारोहण हा येऱ्या- गबाळ्यांचा छंदच नाही असं बामसरांचं गिर्यारोहण आणि गिर्यारोहकाबाबतचं मत होतं.
१९९८ सालच्या हृषिकेश यादवांच्या नेतृत्वाखाली आखण्यात आलेल्या मा. ऐव्हरेस्ट मोहीमेला मानसिक रसदबळ पुरवण्याचं कार्य बामसरांनीच केलं. या लेखात सुरुवातीपासून उल्लेख असलेला रफीक शेख हा तर संपूर्ण महाराष्ट्र पोलीस दलाचा पहिला एव्हरेस्टवीर जवान. हा त्यांच्या अतिशय जवळच्या खेळाडुंपैकि एक. त्याचं तर बामसरांनी ओल्या मातीच्या गोळ्यातुन एका महान कलाकृती साकारावी असंच रुपांतर केलंय. मा. एव्हरेस्टला सलग धडका देऊन त्याने तिस-यांदा विजयश्री अक्षरशः खेचून आणली. हा विजय त्याच्या एकट्याचा नक्कीच नव्हता. तर यात बामसरांच्या वाणीचा वाटा खुप मोठा होता. साताऱ्याची पहिली महिला एव्हरेस्ट वीरांगना प्रियांका मोहितेलाही एव्हरेस्टपुर्वी अनमोल गुरुमंत्र सरांनीच दिलेला आहे.
माझ्या आणि त्यांच्यातले स्नेहबंध तर शब्दांच्या पलीकडले होते. माझ्या कौशल्यावर, नेतृत्वगुणांवर सरांना ठाम विश्वास होता. एकदा तर मला म्हणाले "आनंद तु जेंव्हा कधी माऊंट ऐव्हरेस्टला जाशील तेंव्हा सोबत माझ्या मुलाला घेऊन जा " साक्षात देववाणीसह देवाच्या विश्वासाचा अनुग्रह. यापरतं आणखी काय हवं ?
सर गेले त्यादिवशी अवघं क्रीडाविश्वच दोलायमान झालं. खेळ आणि खेळाडुंसाठी तर भिषण धरणीकंपच होता तो. आता गोंधळलेल्या, भांबावलेल्या क्रिडाजनांचं मानसिक बौद्धिक कोण घेणार ? चुकिच्या क्रिडाधोरणांना स्वतःच्या हातांनी सुयोग्य असं घडीव-ताशीव रुप कोण देणार ? खेळ आणि खेळाडुंची न्याय्य बाजू शासनदरबारी वजनदारपणे कोण मांडणार?
या गहन प्रश्नांची उत्तरे सरांनी आपल्या हयातीतच देऊन ठेवलीयत. त्यांची भरपुर ग्रंथसंपदा, हज्जारोंनी प्रसिद्ध झालेले त्यांचे लेख, शेकडोंनी दिलेली व्याख्यानं यामधून सर आपल्याला भेटत राहणार, अलौकिक मार्गदर्शन करीतच राहणार.
अंधारून अाल्यानंतर भक्तांना मार्ग दाखविण्याचं काम देवालाच करावं लागतं. आणि सर तर क्रीडाविश्वातील साक्षात देवच होते. भक्तांना वरदहस्त दिल्यानंतर देव अंतर्धानच पावत असतात.
देवाने दाखवलेल्या मार्गावर निरंतर वाटचाल करीत अंतिम ध्येयाच्या स्वर्गसुखाचा यशोसोपान गाठण्याची जबाबदारी मात्र भक्तांचीच असते.
नाशिकसारख्या पावन तिर्थक्षेत्री मला घडलेलं हे साक्षात देवदर्शन, देवाचा सहवास, प्रासादिक देववाणीचा अनुग्रह निदान या जन्मात तरी मी विसरू शकणार नाही... कधीही नाही.
अनपेक्षितपणे आम्हा तरुण पिढीला बाम सरंविषयी आपण केलेले अनुभव कथन अमूल्य मार्गदर्शनाची बरसात आहे. असेच आपल्या लेखणीतून आम्हांवर मौलिक विचारांचा अमृत वर्षाव होऊ दया.
ReplyDeleteधन्यवाद सुमुदजी... आपण सरांना ओळखता?
Delete