श्रीशिवजयंती
दिनांक १९ फेब्रुवारी २०१८.
स्थळ - शिवमंदिर, किल्ले माहुली पायथा , जि - ठाणे.
श्रीशिवराज्याभिषेकाची आनंदवारी भाग - १
मुंबई ते किल्ले रायगड… मोटारसायकल स्वारी...
ऐ न भरातल्या कडकडीत उन्हाचा ६ जूनचा दिवस. जूनच्या सुरुवातीचं हे उन तर मेपेक्षाही भयाण जाणवत होतं. तशातच आव बघितला ना ताव. त्या तिक्ष्ण उन्हातच भर दुपारी आम्ही दोघांनी मोटारसायकल सुसाट भिरकावली.
ऐनवेळी प्रवासाची इतर कोणतीही सोय होण्याची लक्षणं दिसत नव्हती. त्यामुळे महेशसरांनी मोटार सायकलवरुन किल्ले रायगड गाठण्याच्या प्रस्तावाने अगदी हायसं वाटलं.
अजिबात वेळ न दवडता मुंबईतून दोघंही टाकोटाक अन् सुसाट निघालो. पनवेल, पेण, वडखळ अशा मजला मारीत सायंकाळच्या आसपास माणगाव जवळ करीत असतांनाच पावसाने भाॅ... s...s... करण्यास सुरुवात केली
रायगडाचा धारकरी... पाऊस...
एक बरं होतं कि, अाम्ही जसजसे रस्ता कापत होतो, पाऊस आमच्या पुढे पुढेच पळत होता. यावेळी का कोणास ठाऊक तो नेहमीसारखा तिरपीट उडवणारा, खोडकर नाही वाटला. तर त्याच्या येण्याने आमच्या कार्यात बाधा येऊ नये याची मनोमन काळजी घेणारा दिसला. आज तोही जणू रायगडाचा धारकरीच झाला होता. खुपच खुश झाल्याने त्याच्या मेघमल्हाराला आज अवर्णनीय असा सुर, ताल आणि लयही गवसल्याचे दिसत होते.
श्रीशिवराज्याभिषेक सोहळ्याकरीता आंम्हांला इतमामाने घेऊन जायला आलेल्या एखाद्या खास यजमानासारखाच तो वावरत असल्याचेही जाणवले. त्यामुळे आम्ही पोहोचण्यापूर्वीच सगळीकडे अवीट आनंदाची बरसात करत तो आमच्या पुढे निघाला होता. केवळ मनोरंजनासाठीच म्हणून कि काय आंम्हांला तो पाठशिवणीचा एक मस्त खेळही खेळवत होता.
जगाच्या इतिहासातील एका सर्वश्रेष्ठ राजाचा राज्याभिषेक सोहळा पाहण्याची आस जीवाला अश्शी लागली होती की मन तर पाखरू होऊनच केंव्हाच उडु लागलं. अन् विलंबाला जागाच ठेवली नसल्यामुळे मिळेल तसा तडक निघालो होतो. कधी एकदा सर्वांग सजलेला, जाणत्या राजाच्या रयतेने फुलून गेलेला दुर्गेश्वर पाहतोय अस्सं होऊन गेलं होतं.
ज्ञानदानाच्या व्यवसायकार्यात असले तरी उभा आडवा सह्याद्री पिंजून काढण्याचा मनसुबा कायम जागरुक ठेवणारे उच्चविद्याविभुषित महेश कुलकर्णी सर आमच्या दुचाकीचं सारथ्य करीत होते. दादरच्या स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या भव्य संकुलात राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा परिक्षार्थ्यांकरीता त्यांचा ज्ञानयज्ञ अव्याहत सुरु असतो. शिवाय मोटारसायकलवरुन देशभरात अमाप भटकंती करण्याचा रग्गड अनुभव गाठीशी असल्याने हे परिवहन खातं त्यांच्याकडेच असलेलं बरं असा विचार करुन मी मागे बसून हिरव्याकंच कोकणसफरीचा आनंद लुटायचा मार्ग पत्करला.
रायगडाच्या घे-यात प्रवेश करेपर्यंत केवळ सुखाची बरसात करणाऱ्या पावसाचा मानाचा पाहुणचार स्विकारतच आम्ही चितदरवाजा गाठला. वरूणराजाचा तर आमच्या महाराजांवर अमाप जीव. म्हणूनच तर या महान सोहळ्यासाठी अक्खा गड न् सा-या गडवाटा त्याने आपल्या स्नेहाने न्हाऊ-माखून घेतल्या होत्या. अगदी चंद्र-सुर्याचं लिंबलोणं करुन या राजावरून ओवाळून टाकलं तरी समाधान व्हायचं नाही असा प्रौढप्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस आमचा राजा.
गडपायथ्याशी पोहोचताच, आम्हांला सहीसलामत पोहोचविण्याचे सत्कार्य करुन दमल्या भागल्या दुचाकीला, एका सुरक्षित ठिकाणी लावुन मस्त विश्रांती दिली. वेळ न दवडता, प्रवासात अस्ताव्यस्त झालेला जामानिमा सरळ करुन घेतला.
धुंद-कुंद हवामानाची साथ अन् काजव्यांची करामात...
आकाशाकडे पाहुन हवामानाच्या लहरींचा वेध घेण्याचा प्रयत्न केला. पण चांगलंच झाकोळुन आल्याने काहीच अंदाज लागला नाही. चित दरवाजाच्या पहिल्या पायरीजवळ आलं कि, का कोणास ठाऊक पण अंतरी जागृत होणारी नेहमीची एक वेगळीच संवेदना याही वेळी मी शांतपणे अनुभवली. हे काय असतं ? कुठून येतं ? या फंदात मी आजवर पडलो नाही न् पडणारही नाही. गडाच्या पहिल्या पायरीजवळ येऊन तिला श्रद्धेने हात लावला. हाताला लागलेले ते देवकण भाळी लेऊन, महाराजांचं स्मरण करीत आस्ते-आस्ते गडचढाईचा छान शुभारंभ केला.
रात्रौ जवळपास आठचा सुमार. मस्त धुंद-कुंद वातावरण. ढगांमध्येच रूतलेला असुनही आणि नांव चंद्रराव असले तरी आडमुठ्या ढगांना बाजुला सारत त्याने गडावर मंदसा, शितल प्रकाश कायम ठेवला होता. स्वराज्यस्वामींच्या राज्याभिषेकाला येणाऱ्या भक्तांना कोणत्याही प्रकारची तोषिस लागू नये हि उदात्त भावना त्या रजनीनाथानेही मोठ्या अौदार्याने जपलेली दिसत होती.
वातावरणात मस्त गारवा तर होताच पण नेहमी गडावर त्रास देणाऱ्या खोडसाळ वाऱ्यानेही त्यात बोचरेपणा येऊ न देता स्वतःला एका संथगतीत झुळझुळते ठेवले होते. क्षणभर आपण पृथ्वीवरच आहोत ना? चुकून स्वर्गात तर नाही ना आलो ? असा भास होऊन गेला.
रायगड म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्गच नाही का? रयतेच्या जाणत्या राजाची राजधानी स्वर्गाहुन कमी का असेल? कदापि नाही. ज्याने नामवंत आणि गर्भश्रीमंत शाह्यांना त्यांची असली अौकात दाखवली, ज्याच्या श्रेष्ठत्वापुढे तर देवांनीही हेवा करावा अशा राजाची राजधानी स्वर्गाहुनही रम्यच म्हणावी लागेल.
गडपरिसराला मंत्रून टाकणाऱ्या, अत्यंत मनोवेधक वातावरणाची निर्मिती करणाऱ्या समस्त निसर्गतत्वांना मनोमन दुवा देत असतांनाच एका विलक्षण अपूर्वाईने लक्ष वेधून घेतलं. खुब लढा बुरूज ओलांडून थोडंच अंतर काटलं होतं. डावीकडील दरीसदृश उतारावरून कोणी लुढकु नये म्हणून लोखंडी रेलींग लावल्या होत्या. या रेलींगपलीकडच्या उतारावरील झाडी-झाडोऱ्यातुन काजव्यांनी पसरलेल्या चांदणचुऱ्याच्या हलक्याशा सोनपिवळ्या प्रकाशाची मस्त आभा मनाला उल्हासीत करुन गेली. सांजवातीने फुललेला प्रसन्न प्रकाश पाहून मरगळलेलं मनही कसं प्रफुल्लित होतं, अगदी तस्संच झालं. ते मनोहारी दृश्य डोळे पहात होते, पण कसं कोण जाणे पायांना त्वरित थांबण्याच्या आज्ञा सुटल्या. निसर्गदिव्यांनी केलेली ती शितप्रकाशाची उधळण मनमोराला अक्षरशः डोलायला, नाचायला लावणारी होती. सारं जग काही क्षणासाठी थांबलंय की काय असंच वाटून गेलं.
आम्ही पोहोचण्यापूर्वीच पावसाने पुरेसं बरसुन, प्रवासात त्याच्याशी लपंडाव, पकडा-पकडी आणि हुतुतु खेळल्याची बक्षिशी म्हणुन या नितांत सुंदर अशा अंतरीच्या ठेव्याची आमच्यासाठी गडभर पखरण केेली होती. उल्हासित झालेल्या माझ्या मनाने तो स्वर्गीय नजारा आधाशीपणे टिपायला सुरुवात केली.
काजवा... एक सामान्य, निरूपद्रवी किटक असला तरी त्यालाही शिवसोहळ्याला चार चांद लावायचा मोह अनावर झाला. खट्याळ पावसाशी संगनमत करुन राज्याभिषेकाच्या पुर्वसंध्येलाच त्यांनी आपल्या मिणमिणत्या प्रकाशाने ती स्वर्गिय गडवाट दिमाखदारपणे सजवून काढली.
वाटेवरील प्रत्येक झाडोऱ्याचं त्यांनी प्रकाशाच्या झाडात रुपांतर करुन त्याला मनमुरादपणे उजळून काढलं होतं. रायगडाच्या वाटेला जाणकार मंतरलेली वाट म्हणतात असं अनेक वर्षं ऐकुन होतो. पण रायगडाची वाट अशीही मंतरलेली असू शकते याची कल्पनाच केली नव्हती. शेकडो झाडं प्रकाशाने निथळतांना पाहणं सोपं नव्हतं. महाराजा...
प्रत्येक दोन श्वासांमधील अंतर उगाच वाढत चाललं होतं. तर काळजाच्या ठोक्यांनाही लय सापडंत नव्हती. काजव्यांच्या प्रकाशमायेची किमया केवळ ऐकून होतो. पण त्यातलं सुख काय असत? हे पहिल्यांदाच प्रत्यक्षरित्या अनुभवत होतो.
एकटा-दुकटा काजवा तर मुंबईतही अनेकवेळा पाहिला होता. पण त्यांच्या समुहाची हि कमालीची करामत निश्चितच मोहवुन टाकणारी होती. या प्रचंड मोहक दृश्यामुळे इथंच मुक्काम होतोय कि काय अशी भितीही वाटू लागली. डोळ्यांनी तर पायांशी कमालीचं संधान बांधलं होतं अन् मनाची तर मतीच गुंग झाली होती. काय करावं खरंच सुचत नव्हतं. क्षणात मंदावणाऱ्या आणि लगेच उजळून निघणाऱ्या या झिलमिल दिव्यांनी इथे गडपायथ्याशी दिवाळीच सुरु केली होती.
शिवकाळात मावळे आनंदसमयी मशालनृत्य करीत असत. हे लुलुकणारे काजवे... मावळेच नसतील कशावरून? अंगावरुन शहारा सरसरत गेला... किती सुंदर कल्पना? त्याकाळी मशाली नाचवत आनंद साजरा करणारे, रात्र-रात्र जागवणारे शिवभक्त मावळे काजव्यांच्या रुपात येऊन या महान सोहळ्याच्या पुर्वसंध्येला तेजोमयी अविट प्रकाशाने सारा गड सजवताहेत.
गडवाटांचं तर त्यांनी अभूतपूर्व प्रकाशवाटांमध्येच रुपांतर केलं होतं. त्यांच्या टिमटिमण्यामुळे एक वेगळंच रोमहर्षक वातावरण गडपरिसरात निर्माण झालं होतं. त्यांच्या त्या बेभान, अनवट अन् गुढ नाचानेही तेथे एक सुंदर लय गाठली होती. आणि त्या लयीवर साक्षात दुर्गराज रायगडानेही मंदसा ताल धरलाय कि काय असंच वाटून गेलं.
खरंच या काजवानृत्याने अन् त्यांच्या आगळ्या-वेगळ्या दिपोत्सवाने तर राज्याभिषेकाच्या मुख्य सोहळ्याआधीच कमालीची रंगत आणली. गडावरील बहारदार सोहळ्याची मस्त चुणूक इथे गडपायथ्यालाच आम्ही अनुभवली. अत्यानंदाच्या नादात भराभर उलटून चाललेल्या वेळेकडे पाहता, मुख्य कार्यक्रमाचे वेध लागायला सुरुवात झाली होती.
दुर्गदुर्गेश्वर रायगड म्हणजे शिवछत्रपतींच्या काळजाचा ठाव. थोड्याच वेळात तेथे राज्याभिषेकाच्या महासोहळयास आरंभ होणार होता... प्रचंड जनसागर आनंदसागरात डुंबण्याच्या तयारीत होता. दाहि दिशा गोब्राम्हण प्रतिपालकाचा जयजयकार करणार होत्या. अन् आमची हृदयं कमालीच्या अतीव आनंदाने भरुन आली होती. प्रौढप्रताप… पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस… गोब्राम्हण प्रतिपालक… अशा बिरुदावल्यांनी अन् अल्काबांच्या पुका-यांनी गडवाट दणाणून गेली होती.
तमाम उदात्त निसर्गतत्वांमुळे आणि विशेषतः काजव्यांमुळे आमची अचपळ मनं आणि थकली गात्रं अशी तृप्तावली होती कि एक अपूर्व समाधान उरात घेऊन, अधीरतेने आमची सय काढणाऱ्या गडाच्या महाद्वाराकडे अगदी शांतपणे आम्ही वाटचाल करु लागलो...
क्रमशः
