किल्ले हरिहर - दिगंताच्या छायेत... दिग्गजांसमवेत - भाग १


                                                        प्रजासत्ताक दिन  
                                                                                    शुक्रवार, दिनांक - २६  जानेवारी  २०१८ .

किल्ले हरिहर - दिगंताच्या छायेत... दिग्गजांसमवेत... - भाग १

प्रास्ताविक ....



र्दी आणि माझं फार वितुष्ट. त्यामुळे गर्दीत मिसळणं मला कधी जमलंच नाही. खूपदा चांगले, कौटुंबिक, सामाजिक, कार्यक्रम, सोहळे निव्वळ गर्दीपायी टाळून मी अनेकांच्या शिव्या-शापांचा धनी झालो आहे.

मुंबापुरीसारख्या अखंड धावत्या आणि गर्दीच्या माहेरघरातील अष्टौप्रहर वास्तव्यामुळे असेल असं. दैनंदिन शहरी जीवनात तर गर्दी टाळायचा मी आतोनात प्रयत्न करतो. पण पाण्यात राहून... म्हणतात ना अगदी तस्संच या गर्दीचे अन् माझे संबंध आहेत. आणि मग…. या गर्दीत हरवलेल्या आत्म्याशी, माझ्या हक्काच्या स्व'शी, पुन्हा एकरूप व्हायला मी गडकिल्ल्यांचा 'बेमिसाल याराना बडे सुकून के साथ' जवळ करतो. त्यांच्या भेटीला जाताना मात्र मोजकेच गिने-चुने सवंगडी सोबतीला, नाहीतर "हा माझा मार्ग एकला..." च्या धर्तीवर सरळ चालू पडतो. अनेक वर्षांचा हा शिरस्त्याचा नियम.

पण शेवटी काय तर... नियम हे अपवादानेच सिद्ध होतात. होय ना ? असेच काही गडकोटांइतकेच भव्य अन् दिलदार अपवाद माझ्या वाटेला आलेत. त्यापैकी एक प्रमुख म्हणजे चारकोपला राहून दैदीप्यमान इतिहासाचा चौदिशांनी ठाव घेणारा परममित्र आणि जाणता मार्गदर्शक म्हणजे संजय तळेकर. वाहत्या झऱ्यासारखा तळनितळ माणूस. तरीही अजब वल्ली असलेला हा गिरीचर गिर्यारोहणातील माझ्या जन्मापासूनच माझ्या राशीला आहे.

गडकोट आणि त्यांचा प्रज्वल इतिहास खोलातून जाणुन घेणे, इतरांना त्याची सखोल जाणिव करुन देणे, अन् त्या अमाप धगीवर माणसं "चेतवणे" हा याचा धंदा. बाकी याची नोकरी-बिकरी हि सारी... अंधश्रद्धा.

या पुरातन माणसाच्या वयाबद्दल एक अघोरी शंका मला नेहमीच येते. याच्या उच्चविद्याविभुषित संगिनीबरोबर (रायफलीची नाही) माझा यावरून कैकवेळा वादही झालेला आहे. लौकिकदृष्ट्या याच्या वयाचा अंदाज लावायचाच झाला तर शिवनेरी, नाणेघाट परिसरातील गुंफा खोदल्या जात असतांना हा तिथल्या कुशल कारागीरांचा खमक्या मुकादम असणार. किल्ले शिवनेरीपेक्षा हा किंचीतसा लहान तर रायगडापेक्षा २-४ वर्षांनी थोराडच असावा.

आम्हां भटक्यांसाठी प्रातःस्मरणीय अशा गोनिदांबरोबर भटकंती केलेल्या संजयवर बाबासाहेबांचा जीव इतका कि शिवशाहिर याच्या घरी चहापानाला येतात. दिवंगत निनादकाका बेडेकरांशी याचं मोठं सख्य. इतिहासाचार्य सरदार बलकवडे यांचा तर हा जीवश्च-कंठश्च. चालता-बोलता इतिहास कोष म्हणजे आप्पा परब, ईतिहास तज्ञ तु.वि.जाधव, ऐतिहासिक शस्त्रांचे संग्राहक आणि विशेषज्ञ गिरीश जाधव अन् इतिहासाला  बोलायला लावणारे रवींद्र लाडांच्या हा खाजगीतला. आता बोला... याच्याबद्धल  आंम्हांला असूया का होऊ नये? असो.

तर, अशा तळेकर कुलोत्पन्न राजे संजयजींनी ऐनवेळी हुकुम सोडला ... हर्षगडला जायचं... बस्स्स... वनीं आनंद, भुवनी आनंद अशीच साऱ्यांची अवस्था होऊन गेली. झाडून सारे (कामा) धंद्याला लागले. आमच्या पक्षिमित्र मनिष नाखवा साहेबांनी थेट एक खाजगी बसच आरक्षित केली. वर्षाच्या सुरुवातीलाच अशी रांगड्या गडोत्तमाची भेट नाकारण्याचं महापाप कोण करेल?

जाणता राजा या महानाट्यातील कलाकारांच्या नसा-नसांत सह्याद्रीचा भर्राट वारा आणि गडकोटांचं भन्नाट पाणी भिनवून त्याचा विशुद्ध अर्क त्यांच्या अभिनयात उतरवण्याकरीता संजयने “जाणता राजा ट्रेकर्स” या दुर्गभ्रमण पथकाची निर्मिती केली. संजयच्या फुकट फौजदारी अर्थात् लष्कराच्या भाकऱ्या असलेल्या ( गिर्यारोहण साहित्य तयार करणे, मंडळांचे हिशेब तपासणे, सार्वजनिक देवादिकांना वस्त्रं नेसवणे, उत्सवांची सजावट करणे ) अशा अनेक उद्योगांपैकीच हा एक. त्या पथकातील कलाकारांच्या या मोहिमेवर अक्षरशः उड्या पडल्या. ऐनवेळी अनेकांना नकार द्यावा लागला. अन् लगोलग ३० धारकऱ्यांची एक मोहिम हर्षगड उर्फ किल्ले हरिहराच्या दिशेने क्षेत्र नाशिककडे रवानासुद्धा झाली.

शनिवार, दि. ६ जानेवारीच्या रात्री उशिरा ठाण्यातून निघालो तोपर्यंत सारंकाही आलबेल होतं. पण जसं आमच्या खाजगी बसने कल्याण सोडलं तसं पुढ्यातल्या संकटाची चाहूल लागली. नाशिकमध्ये तपमान ९ डिग्री सें.ग्रे. पर्यत घसरल्याच्या माहितीने पोटात गोळाच आला. पुरेसा जामानिमा सोबतीला असूनही मध्यरात्री कसाऱ्याला चहापान करतांना थंडीचा आवाका जाणवला.

मोहिमेचा शुभारंभ… क्षेत्र नाशिक येथे आगमन आणि देवदर्शन...



पहाटे साडेचाराच्या सुमारास त्र्यंबकेश्वर गाठलं. पण त्या चिवट गारठ्यात, उबदार बसच्या कुशीतून बाहेर पडण्याची हिंमत काही होत नव्हती. शेवटी काही हौशी कलाकारांना भरीस घालून संजयने वाहनतळाच्या कोपऱ्यात मस्त शेकोटी पेटवून घेतली. तेंव्हा कुठे मेहेरबानी केल्यासारखे.... लोक खाली उतरले... तेही... स्वतःच्या प्रातःविधिसाठी.

शेकोटीची ऐश चालू असतांनाच ब्राम्हमुहुर्ताच्या त्या अकलंक, निरव शांततेत, एका नादमधूर लकेरीने भान वेधून घेतलं. खेचल्यासारखा शेजारच्या मैदानात गेलो. तर तेथे एका मिनीबसच्या बाहेर १०-१२ दाक्षिणात्यांचा जत्त्था दिसत होता. घनघोर गारठ्यात आंघोळी (छटट यार ... मला तर कल्पनाच सहन होत नाहिये) उरकून ओलेत्यानेच त्या भक्तांनी कमरेला फक्त पंचा गुंडाळून अय्यप्पा स्वामींचे गुणगान आरंभले होते.

त्यांतील एका वयोवृद्ध स्वामीभक्ताने अय्यप्पां स्वामींना जागविण्याकरीता त्यांच्या प्रौढ पण कमावलेल्या गळ्यातील परिपक्व सुरांचा सुरेल साज चढवून आळवणी चालवली होती. पाठोपाठ भक्तगण कोरसमध्ये त्यांना साथ करत होते. त्यातील मंगलम्... मंगलम् शिवाय काहीही आमच्या पल्ले पडत नव्हतं. पण त्या मंगलम आळवणीने  समां बांधला होता. तरल सुरावटींनी एक उंची लय गाठली होती. मंत्रोच्चारणाच्या नादमाधुर्याचा ठेका तर असा खुब होता कि सारे भक्तगण एका संथ लयीत नाचू लागले होते.

नादब्रम्हाच्या तालावर भक्तांच भान हरपलेलं ते दृश्य इतकं लुभावनं कि माझं थट्टेखोर अागाऊ पोर आणि त्याचा डब्बल आगाऊ अस्मादिक बाप... आम्ही दोघांनीही त्या ठेक्यावर कधी ताल धरला ते कळलंच नाही. सुमारे दहाऐक मिनिटांच्या कर्णमधुर सोहळ्याने अंतर्बाह्य तृप्त होऊन अाम्ही एका अपूर्व एनर्जीने चार्ज्ड होऊन गेलो. भानावर आलो तेंव्हा मंत्रपठण संपून प्रसादाचे वाटप सुरु होते.

प्राचीन तिर्थक्षेत्रांचा आणि त्यातही जागृत ज्योतिर्लिंगाचा महिमा हा असा अगाध असतो. पहाटे-पहाटे खरंच जाग आली होती... भक्तिरसात चिंब होऊन पर्वतप्रिय, शंभूमहादेव अर्थात् त्र्यंबकेश्वराच्या दर्शनाकरीता आम्ही प्राचीन आणि अद्वितीय असं शिवालय गाठलं.

झिम्माड थंडीचा कडाका अस्सा आशिकाना होता कि मी मंदिरात, शिवाय "तसा एकटाच" आहे हे विसरून जनाब गालिब साहेबांच्या बेभान, प्रणयरंगी शायरीच्या, भावभोर दुनियेत काही क्षण मुशाफिरी करून आलो. "इश्कने (भटकंतीच्या) हमको निकम्मा कर दिया, वरना आदमी हम भी थे कामके".

हिमालयाच्या ओढीने आतुरले होऊन त्याच्या भेटीला नेहमीच जातो. पण यंदा, हिमालयच अपल्या भेटीला  येतोय कि काय अस्संच गोठवणारं वातावरण होतं. भव्यदिव्य मंदिराच्या प्रांगणातील फरसबंदीवरील उघड्या पायांमुळे थंडी थेट हाडांपर्यंत पोहोचत होती. माझ्या 'सायंटिफिक वांड' लेकाने तर हिमालयाशी नेहमीच पंगा घेणा-या बापालाही  'फ्राॅस्टबाईटची' भिती घालून टाकली.

महाखट पुजारीवर्गाच्या 'कृपे'मुळे झटापटीचं दर्शन उरकून बाहेर फेकला गेलो. तसा मंदिरासमोरच्या टपरीवरून मिसळीच्या ठसक्याचा गंध सुरसुरत्या नाकातून थेट मेंदूपर्यंत पोहोचून डोक्याचं भजं घालू लागला. मग आव देखा ना ताव ... त्या टपरीवर जोरदार हल्लाबोल केला. सक्काळी सक्काळी ६-७च्या गारेगार गारठ्यात कानातून धुर निघेल अश्शा... आगजाळ, 'तर्री मारके' गर्मा-गर्म मिसळीबरोबर काहि लाद्या पाव चेपून व डब्बल अद्रक मारके कोरा करकरीत टमरेलभर चहा नरड्यात ओतून पुढच्या अतिमहत्वाच्या कामगिरीला सज्ज झालो.

किल्ले हरिहराच्या रोखाने...


सामीये अय्यप्पा, त्र्यंबकेश्वरीचा महादेव आणि खमंग मिसळ, चहाने चित्तवृत्ती बहरुन आल्या होत्या. अनेक वर्षांपासून हुलकावणी देत हुकलेल्या हर्षगडाचे वेध आता थांबू म्हटलं तरी थांबू देत नव्हते. लगोलगीने तिथून सुमारे २०-२२ कि.मी. वरच्या हर्षवाडीला पोहोचलो तर गावात अनेक गाड्यांनी गर्दी केलेली.

एव्हाना चांगलंच फटफटल होतं. थंडीची तिव्रताही बरीच अोसरली होती. गावातील एका छोट्याशा खळ्यातच ओळखपरेड उरकून घेतली त्यावेळी संजय आणि इतिहास प्रेमी अरुण गवेकर यांनी खूपच छान माहिती दिली.

अरुण गवेकर हे आणखी एक मस्तमौला व्यक्तीमत्व आमच्यात होते. नाही.... असं म्हणणं योग्य होणार नाही, तर आम्ही त्यांच्यासोबत गड भटकंती करीत होतो हे जास्त सयुक्तिक होईल. कमालीची व्यस्त आणि तणावपूर्ण अशी उच्चपदस्थ शासकिय नोकरी आणि पंचावन्नाच्या पुढे-मागे वय असलं तरी हा माणूस, वेळ उपलब्ध होतोय असं दिसलं कि त्याच्या सदुपयोगाकरीता एखाद्या गडकिल्ल्यावरच आढळून येईल... मजबूत शरीरयष्टी राखून असलेले अरुणजी सह्यांगणातील रानवा-यासारखे भिरभरत असतात. लेखनाचं उत्तम अंग असलेले हे साहेब लिहायला मात्र जाम कंटाळा करतात ही एक यांच्याविरूद्ध माझी कायमची तक्रार. अशा चांगलं लिहिणाऱ्यांनी लेखण्या म्यान केल्यामुळे माझ्यासारख्यांना हे असं काहीतरी खरडावं लागतं.

सह्याद्री आणि गडकोटांशी नातं जुळलेले अरुण गवेकर इतिहात चांगलेच रमतात. सह्याद्रीतीलच नाही तर शिवरायांच्या पावन पदचिन्हांचा त्यांच्या अमोघ कर्तृत्वाचा ठसा जिथं-जिथं म्हणून उमटला असेल तिथं-तिथं जाऊन ते सारसर्वस्व न्याहाळणे हा त्यांचा प्रमुख छंद. बरं हे सारं फिरतांना आपला कुटुंब कबिलाही सोबत ठेवण्याकडे यांचा कटाक्ष असतो.

अस्सल कोल्हापूरकर असलेल्या गवेकरांचं नरकेसरी सुभेदार तानाजीराव मालुसरे यांच्या घराण्यात चांगलीच जानपछान. जंजी-याच्या नबाबाकडे यांचा वशिला. आता बोला...  या अडनिड्या वयातही ते नुकतेच कुलंग-मदन-अलंग या सर्वांत अवघड दुर्गत्रयींच्या भेटीला जाऊन आले. त्यांच्या सोबत, गडफेरीदरम्यान इतिहासाची पानं उलटणे हि एक वेगळीच अनुभूती असते. आणि का असू नये? अहो, श्रीमान योगी, स्वामी अशा दिग्गज ग्रंथांची श्रीमान रणजित देसाई यांनी ज्या वाड्यात रचना केली, तिथंच आमच्या अरुणजींचं बालपण गेलंय. आता बोला?

या ट्रेकला, वाटलं होतं कि एका नव्या टिमबरोबर जातोय, त्यातून गड असा हा कस लावणारा. त्यामुळे मी चांगल्या तयारीनेच आलो होतो. प्रस्तरारोहणाचं ब-यापैकि साहित्य मी सोबत नेलं होतं. गेल्या दोन-अडीच दशकात विपुल प्रमाणात केलेल्या भटकंती आणि आरोहणादरम्यान असं एक एक पाहिलंय, अनुभवलंय कि अगदी डोंगरातल्या १००% सुरक्षित ठिकाणी जातांनाही माझ्याकडे थोडीफार सुरक्षासाधनं मी ठेवतोच. (इतकंच काय लग्नाच्या वाढदिवसानिमित्त जोडीने करावयाच्या भटकंतीच्यावेळी सोबत घेतलेल्या या साधनांमुळे मी सालाबादप्रमाणे बोलणी खातो… कुणाची हे सांगायलाच हवं का? ) 

साधारण तीस लोकांचा भक्कम जमाव सोबत आहे म्हटल्यावर यावेळी त्याचं ओझं जरा जास्तच झालं. आमच्या जमावात असा एक अत्यंत उत्साही मावळा मला सापडला. त्याला या साधनांची गरज आणि महत्व समजावून सांगीतल्यावर जबराट उत्साहाने मुसमुसलेल्या आमच्या कृणाल जांभळनेे संपूर्ण मोहिमेत ती जडशीळ जबाबदारी शेवटपर्यंत अगदी नेटाने वागवली.

करारी कारवीची करुण कहाणी...

हर्षवाडीतील ठळक पायवाटेने गडाचा रोख धरुन पुढे निघालो असता, सपाटीवरील अंतर पार करून गडचढाईवरील झाडीत शिरण्यापुर्वी एका दृश्यामुळे जगीच थबकलो. काही गावकरी तेथे ढिगावारी पडलेल्या काटक्यांच्या सुबक पद्धतीने मोळ्या बांधायचं काम करीत होते. निरखून पाहिलं असता, त्या बांधेसूद काटक्या कारवीच्या होत्या. शेणा-मातीत लिंपून घेऊन वनचरांच्या घरभिंतीत चिणल्या जाण्याबरोबरच, धनदांडग्यांच्या शेतशिवारातील टोमॅटो, शिराळी, पडवळांच्या वेला-रोपांचा आधार होणारी कारवी, थोड्याफार अर्थप्राप्तीमुळे निष्कांचन गिरिजनांच्या संसारवेलीच्या मांडवाचाही आधार होते हे पाहून माझं कारवीवरचं प्रेम आणि आदर दुणावला.

७-८ फुट लांब एका रेषेतल्या सरळसोट इंचभर जाडीच्या काठ्या बुंध्यापासून तोडून त्यावरचं पान न् पान छाटून तासलेल्या ताज्या-ओल्या कारवीची ती कलेवरं पाहून आत, कुठंतरी खोलवर गलबलून अालं. कारवी आणि माझं नातं आता लपून राहिलेलं नाही. या अनवट, अनकही नात्यात डोकवायचं असेल तर पुढील लिंकवर अगदी प्रेमाने एक टिचकि माराच. ( पर्वतकन्या कारवी http://anandvaari.blogspot.com/2017/06/blog-post_5.html )



गडसोपान... एक अद्भुत, उत्तुंग पाषाणशिल्प...


हर्षवाडी लगत गडवाटेवरील कारवीच्या बनात एक छान, मंदसा सुगंध आस्मंतात भरून राहिला होता. याच वाटेवरून अोझरता दिसणारा हर्षगड आता चांगलीच जवळीक साधू लागला. चोरट्या अन् बेजबाबदार तोडीमुळे कमालीच्या विरळ होत चाललेल्या गडपायथ्याच्या झाडीतून तासाभरातच पांढऱ्या मुरमाड अशा नागव्या चढाई धारेवर येताच ते जगद्विख्यात अफलातून पायऱ्यांचं दृश्य अक्षरशः मोहिनी घालतं. काय, कसं, कधी, का? कश्शा कश्शाचं भान म्हणून उरत नाही. त्याची ती अप्रतिम सुंदरता सौंदर्यासक्त, आशिकमिजाज प्रकृतीच्या मनावर अघोरी जादू करतं.

दिलोदिमागकि बत्तीयाँ गुल हो जाती हैं... तिथल्या कातळी भानामतीचं भल्या-भल्यांना लागिरं होऊन जातं. त्या नशेमन नजाऱ्याच्या खुबसुरत गारूडातून बाहेर पडणं मात्र सोपं नाही.

वेळीच सावध होऊन भानावर येणंही क्रमप्राप्त होतं. कारण हरिहरच्या त्या दिव्य स्वर्गसोपानावर बरीच गर्दी झाली होती. जमलेल्या सर्व हौशा-नवशा-गवश्यांना स्वर्गात जाण्याची घाई झाली होती. आमच्या सर्व जाणत्यांना पुन्हा एकदा सावधगिरिच्या सुचनांचा एक हेवी डोस दिला गेला. कारण या स्वर्गसोपानावर शिस्त मोडणं म्हणजे खऱ्या-खु-या स्वर्गदर्शनाची हमखास गॅरंटी.

सावधपणे पुढे सरकत असतांना अचानक गर्दितला एक आवाज अोळखीचा वाटला. अरुण सावंत... हा आणखी एक अवलिया तेथे हजर होता नजरा-नजर होताच अरुण दादाने नेहमीप्रमाणे एक घट्ट मिठी मारली. त्याच्या भेटीची हि नेहमीची पद्धत मला खुप आवडते.

महाराष्ट्रातील ज्येष्ठ गिर्यारोहकांच्या आघाडीच्या फळीतला हा "नवतरुण" नुकताच ६० वर्षांचा होऊन त्याच्या 'अंशकालीक' नोकरीतून निवृत्त झाला अन् सह्यसेवेच्या चाकरीत पूर्णकालीक रुजू झाला आहे. सह्याद्रीचं बारसं जेवलेल्यांपैकि एक (असं कौतुकानं) म्हणता येईल अशा अरुणदादाकडे बघून त्याच्या वयाचा अंदाज येणे शक्य नाही. उच्चपदस्थ नोकरीत जखडलेला असतांना या माणसाने सह्याद्री उभा-आडवा खंगाळून काढला आता 'मोकाट' सुटल्यावर काय करेल काहि नेम नाही.

अरुणदादाबद्धल बोलावं तितकं कमीच. सह्याद्री, प्रस्तरारोहण, गडकोट, सागरसफरी, गुहासंशोधन, हिमालयीन मोहिमा, पाकसंशोधन, आणि इतर अनेक साहसी क्रीडाप्रकारांचं त्याने कधीच लोणचं घातलंय. आणि आत्ता कुठे ते मस्त मुरू लागलंय. या हुन्नरी व्यक्तिमत्वाची अशा झुंजार ठिकाणी भेट झाल्याने आमच्या या भटकंतीला  मात्र चार चांद लागले.


एकंदर झालं काय? तर २-२ सिनियर अरूण आणि नभांगणातील सर्वांनाच सिनियर अरुणरावांमुळे आमच्या या मोहिमेत खणखणीत अरुणोदय होऊन सबंध गड अपुर्व प्रकाशाने न्हाऊन निघाला. दिलखुश हवामानाच्या साथीनं हरिहराचं असं अपरंपार तेजाने निथळण्याचा सोहळा पाहून तबियत खुष होऊन गेली.

दरम्यान गडाच्या स्वर्गीय सोपानावर गर्दी वाढू लागली होती. गडाच्या त्या कातळकोरीव जिन्याला भिडण्यापुर्वी मी तेथे माथा टेकवला. तो मान या गडाचा तर होताच पण त्याचबरोबर मानाचे मानकरी होते ते कुशल हात ज्यांनी हे काळ्या फत्तरातील हे अद्भुत शिल्प घडवलं. मनोमन त्यांच्या या बेमिसाल कलाकारीस लाख-लाख दुवा देत गडचढाईला सुरूवात केली.


अशा थरारक वाटेवरही कर्कश्श्य आवाजात पोर्टेबल ब्लुटूथ स्पिकरवर बाजारू संगीताच्या तालावर माकडचाळे करणा-या जमातीचा तेथेही सुळसुळाट होता. ते माझ्या गडनिरीक्षणात अकारण व्यत्यय आणत होते. काहींना प्रेमाने तर काहींना "विशेष प्रेमाने" त्यांची 'ईंपोर्टेड' डबडी  बंद करायला लावली.

गडकोटांवर यायचं ते इथल्या खडका-मातीत झिरपलेला अभिमानास्पद इतिहास टिपायला, टिपकागदासारखं स्वच्छ, हळुवार मन घेऊन. यांना चांगल न् वाइट यातला फरक कधी समजणार आहे कोण जाणे? खऱ्या थ्रिलभऱ्या अॅडव्हेंचरची न् यांची कधी गाठच पडली नाही. इन्स्टंट फुडवर पोसलेली ही पिढी. एक गावरान झटका द्यायचा विचार होता पण थोडक्यात आवरतं घेतलं.

या धुरंधर गडाच्या हर्षगड, हरीष अशा अनेक नावांपैकी हरिहर हे नांव मला खुप आवडतं. याच्या इतिहासात थोडं डोकावलं तर दिसून येतं कि, सन १८१८ मध्ये मराठेशाहीचं विधीवत् विसर्जन केल्यानंतर टोपीकरांनी त्यांचे शेंडे-बुडखे ओले करणाऱ्या अशा अनेक बळवंत गडकोटांच्या निर्घृण शिरकाणाचं काळंकुट्ट काम सुरु केलं होतं.

प्राचिन स्थापत्य शास्त्राचा उत्तुंग आविष्कार असलेल्या या गडोत्तमाच्या मुळाशी सुरूंग लाऊन ठिक-या-ठिक-या उडवण्याच्या कामगिरीवर गोरा कॅप्टन ब्रिग्ज निघाला देखील. अशा अघोरी कामावर नेमणूक झाली असली तरी त्याच्या कलासक्त वृत्तीला खरंतर आपण भटक्यांनी सलामच केला पाहिजे. हे येडपट त्यावेळी या पायऱ्यांच्या नादाने खुळावलं नसतं तर आज हरिहराचा उध्वस्त सांगाडा पाहून आपल्याला वेड लागायची वेळ नक्कीच आली असती.

किल्ले हरिहरानेही त्यावेळी केलेली लबाडी तर पहा. आपल्या अमोघ मोहिनी अस्त्राच्या लपेट्यात टोपीकर कॅप्टन ब्रिग्जला अस्सा काही लपेटला कि हा गड मुळापासून उखडून टाकायला आलोय हे विसरून ते खुळं गडाचं गुणगान करत परत गेलं. एका फाकड्या लष्करी अधिकाऱ्याची हि कथा... तर तुम्ही आम्ही किस झाडकि पत्ती?

विश्ववंदनिय ज्ञानेश्वरीची एक तरी अोवी अनुभवावी असं हरिभक्तपरायणांकडून सांगीतलं जातं. त्याच धर्तीवर या हरिहराची एकतरी पायरी प्रत्येक भटक्याने, दुर्ग अभ्यासकाने बारकाईने अनुभवली पाहिजे असं आवर्जून सांगावंसं वाटतं. राजेहो... काय त्याचा आब अन् काय तो दरारा, काय त्याचं सौष्ठव अन् काय ते बेमिसाल सौंदर्य याच्यापुढे तर प्रत्येक दुर्गयात्रीने साष्टांग दंडवतच घातला पाहिजे.


काळ्याकुट्ट, दगडातून खोदलेल्या ओबड-धोबड पायऱ्यांनादेखील कमालीचं सौंदर्य असतं हे इथं आल्यावर कळतं. खडक फोडून तराशलेल्या या पायऱ्या... बलाकि खुबसुरत आहेत. यांच्या नजाकतीपुढे तर एखाद्या अय्याश, गुलाबी रंमहालाच्या, बारीक, नक्षीदार कलाकुसरीच्या संगेमरमरी तेजाच्या महालांनीही झक्कत मान खाली घालावी. असा हा गडसोपान गर्दिनं अोसंडत असला तरी माझी बेकल नजर प्रत्येक पायरी न पायरी बारकाईने न्याहाळत होती.

चढून येणाऱ्या प्रत्येकाच्या मनाची विलक्षण भयावह घालमेल लक्षात घेऊन पायऱ्यांच्या दोन्ही बाजूंना हाताची बोटं मजबूतीनं रुतवण्यासाठी खोबण्यांचे खोल आधार ईथे कोरुन ठेवलेत. या जिन्यावर हाता-पायांचा भरपूर वापर झाल्याने हा खट्याळ गड आपल्याला पुन्हा एकदा उत्क्रांतीच्याही आधीच्या काळात पाठवून नराचा पुरता वा'नर बनवून सोडतो.

आमच्यासारखी खडकांशी धडका घेण्याची सवय असलेल्यांचं एक ठिकंय, पण कुणाचंतरी ऐकून फुकाचा माज करण्यासाठी आलेले अन् भितीने हात पाय गाळून सैराट खाली उतरणारेही काही महाभाग दिसले. कमजोर हृदयाच्या गड्यांनी तर याच्या नादाला न जाणंच चांगलं. अर्थात् त्यांनी आपल्या 'पायरीनेच' राहिलेलं बरं...

येक येक पायरी शांतपणे अनुभवत गडाचं महाद्वार गाठलं. छोटेखानीच पण मोठ्या मानाचा मानकरी असलेल्या महाद्वाराच्या दर्शनाने उर भरून आला. पायऱ्या न तोडण्याचा निर्णय घेतलेल्या फिरंगी कॅप्टन ब्रिग्जला जाता-जाता गडाचं हे एकमेव प्रवेशद्वार सहज उद्ध्वस्त करता येण्यासारखं होतं. पण हा गोरा साहेब जसा या सोपानाच्या प्रेमात पडला होता तस्साच तो या महाद्वारातही गुंतला होता. त्याच्या रसिक मनाने हे पक्कं जाणलं होतं कि या पायऱ्यांशिवाय महाद्वाराला आणि महाद्वाराशिवाय पायऱ्यांना शोभा नाहीच. म्हणूनच तो उदार फिरंगी कॅप्टन, तृप्त होऊन आल्या वाटेने परत गेला.

गडाचं हे महाद्वार असलं तरी इतरांसारखं हे अवाढव्य अन् प्रशस्त नाही. तर आत झुकूनच प्रवेश करावा लागतो, इतकं हे लहान आहे. हि गोष्ट मात्र मला चांगलीच भावली. प्राचीन मांदिरं, लेणी आणि गडांचे दरवाजे कमी उंचीचे ठेवण्याची हि पद्धत मला खूप आवडते. दुसरं काही नाही हो ... वाकून गेल्यामुळे त्या महान वास्तूदेवतेला, त्यांच्या रचनाकारांना नकळत नमस्कार तर घडतोच पण आपलीही 'उंची' समजते .

बिकट ही वाट... गडाची... 

महाद्वारातून अंतर्भागात प्रवेश करताच समोरच्या खडकातील लोभस गणेशमुर्तिचं दर्शन घडतं. गणपती बाप्पा मोरया म्हणून लगेच वाटेला लागायचं. पुढची वाट इथं डावीकडे वळते आणि एका अद्भुत सज्जात आणून सोडते. या सज्जात अापण डोकं आणि तोल सांभाळत गडपायथ्याच्या रहाळावर एक राजेशाही नजर फिरवायची आणि पुढे व्हायचं. या गॅलरीला गोऱ्या साहेबाने सन्मानपूर्वक "राॅक कट गॅलरी" असं भारदस्त नांव दिलंय.

एखाद्या भ्रमर भुंग्याने मजबूत लाकूड पोखरून आपल्या पिढ्यांची वहिवाट सुकर करावी अगदी तश्शाच  पद्धतीने ईथून पुढची गडवाट त्या बेनाम शिल्पकारांनी जीव अोतून कोरलेली दिसते. या वाटचालीत आपण त्यांच्या या अजरामर कलाकृतीची तारीफ करण्यात कंजुषी मात्र करायची नाही.

गॅलरीच्या शेवटी वाट उजवीकडे उभ्या कड्यात बेधडक घुसते. आपणही अनमान न करता पाऊले चालतीच्या चालीवर मनोभावे चढत-चालत रहायचं. पुढच्या टप्प्यात तर मोठमोठया महालांमध्ये विशेषतः पाश्चिमात्य वाडे-बंगल्यांत असतो तसा अर्धगोल, सर्पिलाकार जिनाही इथं तपशिलाने खोदून काढलेला आहे. आता लावा हिशेब, कि तो गोरा साहेब इथून जाताना काय-काय घेऊन गेला ?


हा जिना सांभाळून चढून जायचं आणि चक्क लहानशा विटांनी बांधून काढलेल्या मोडक्या घुमटीचं छत असलेल्या दरवाजातून खालून वर चढत गडावर थाटात प्रवेश करायचा. या मोडकळीस आलेल्या घुमटीची रचना आपल्याला दाद द्यायलाच लावते. तीच्याकडे निरखुन पहात असतांनाच एक उर्दू शेरवजा कहावत आठवली. अर्ज है... “खंडहर बयाँ कर रहें हैं, के इमारत कभी बुलंद थी”... पुढच्या पावसाळ्यात हि असेल याची का… ही शाश्वती नाही.

एका मोठ्या भुलभुलय्यातून सहीसलामत सुटून जग जिंकल्याचा आनंद चेहऱ्यावर घेऊन आपण गडमाथ्यावर अवतरतो. इथंपर्यंत पोहोचल्यानंतर स्वतःला एक मस्त शाब्बासकि बिनधास्त देऊन टाकायची. शांतपणे बसून धपापणारा श्वास एकसुरी करून घ्यायचा. थोडं पाणी तोंडावर मारायचं आणि थोडंसं आतही सोडायचं. पूर्व-पश्चिम पसरलेला चिंचोळ्या माथ्याचा गड उभा-आडवा नापायला फार वेळ लागत नाही.






गडावर प्रवेश केलेल्या उगवतीच्या दिशेने तसंच सरळ रेषेत पुढे गेलं कि सुबकरीत्या बांधून काढलेल्या एका पुष्करणीच्या काठचा शेंदूरचर्चीत हनुमान आपली वाट अडवतो.


त्याशेजारीच एका चौथऱ्यावर शिवलिंग स्थापलेले आहे. दोघांनाही वंदन करून तसेच सरळ रेषेत पुढे नीघायचं. त्या विस्तीर्ण पठारसदृश माथ्यावरील अनेक  लहान-मोठ्या कोरीव टाक्यांमध्ये डोकावत इकडम-तिकडम करत गडावरील एकमेव सुस्थितीत असलेली वास्तू अर्थात् धान्याच्या  कोठीकडे आपला मोर्चा न्यायचा.





गडावर मुक्काम करणे आवश्यक असल्यास एकतर "निली छत्री" किंवा या कोठीशिवाय पर्याय नाही. बुलंद गडावरचं हे एकमेव सहिसलामतीचं बांधकाम. आतापासूनच संवर्धनाची पुरेशी काळजी न घेतल्यास कालाय तस्मै नमः म्हणण्यशिवाय आपल्याला काहीच करता येणार नाही. आणि तसंही... आपण दुसरं काय करतो म्हणा.

याच दिशेने पुढ्यात दिसणाऱ्या अगदी शेवटच्या टोकापर्यंत सहज जाता येतं. इथून बैजवार परिसर न्याहाळण्याची मजा बाकी जब्बरदस्तच आहे. हरिहरापासून एका खिंडीमुळे वेगळा झालेल्या, अगदी शेजारच्याच डोंगरातील एका निरूंद, खड्या घळीतून काही गावकरी चढून जातांना दिसले. अधिक चौकशी करता तेथे परिसरातील स्थानिक  ग्रामस्थांचं दुर्गम देवस्थान असल्याचं समजलं. त्या 'देवाच्या डोंगरामागे' भंडारदुर्ग लपल्यासारखा दिसत होता. तर थोडं उजवीकडे खेटून उभा असलेला आणि स्वतःचं अस्तित्व ठळकपणे दर्शवणारा ब्रम्हगिरी अर्थात त्रिंबकगड मोठ्या दिमाखात भाव खात होता.

घड्याळाच्या दिशेने थोड्या उजवीकडे नजर फिरवली तर वैतरणेच्या प्रचंड जलाशयाने समृद्ध झालेलं विस्तीर्ण खोरं दिसतं. तसंच नजरेचा फेरा आणखी उजवीकडे अर्थात् पश्चिमेकडे फिरवला तर बसगड, उतवड दिसतात.फण्या डोंगर तर तोंडाचा चंबू करून आपल्याकडे पहात असतो. "तुम्ही सगळे हरिहरलाच भेटता, मी काय कुणाच घोडं मारलंय व्हंय?" अशा रुसलेल्या अविर्भावातच तो कायम असतो. असो बापडा.


तसं म्हटलं तर खडकाळ माथ्याचा हा गड उजाड बोडकाच. पण शांत जळाने भरलेली छान पुष्करणी, आध्यात्माशी आपलं एक वेगळं नातं जोडणारी तिच्या काठची देवालयं, वा-यावर फडफडणारा रेशमी भगवा आणि एक भारदस्त  पर्णसंभाराचा, विशाल छायेचा वृक्ष इथल्या सा-या कमतरतेवर पांघरुण घालून "कमी तिथे आम्ही" म्हणत पैसावसुल भरपाई करुन जातात.

गडपुष्करणीच्या नितांत सुंदर परिसराची ती अफलातून फोटोजेनिक फ्रेम पाहून तिथे क्षणभर विश्रांतीचा मोह अनावर झाला. त्याच छान ठिकाणी आमच्या अरुणदादाचा एक छोटेखानी सत्कारसमारंभ घडवण्यात आला. त्यावेळी आजवरच्या गिर्यारोहणातील यशस्वी वाटचालीचं आणि साठीतल्या उत्तम आरोग्याचं रहस्य त्यांनी थोडक्यात उलगडलं. नवोदितांसाठी मार्गदर्शनाचा एक उत्तम धडा आमच्या सावंतगुर्जींच्या वर्गात इथं चांगलाच रंगला.

पाठोपाठचा प्रायोजित कार्यक्रम म्हणजे आमच्या रा.रा.श्री.संजय तळेकरांची एक खासियत. अर्थात् प्रत्येक ट्रेकसदस्याला त्यांच्याकडून मिळणारी एक अपुर्वाईची भेट. ट्रेकपुर्वी संजय स्वतःच्या सुवाच्च्य हस्ताक्षरात भेटीला जात असलेल्या किल्ल्याच्या संपुर्ण माहितीचं, ढोबळ नकाशासह एक हस्तलिखीत काढतो. त्या बेशकिमती हस्तलिखिताच्या प्रतिचं प्रत्येक सदस्याला वाटप केलं जातं. इतकंच नाही तर गडभुमीवर त्याचं जाहिर वाचन-विवेचन करुन चर्चासत्राची मस्त फैर झडते.

काही वर्षांपूर्वी थोर दुर्गसाहित्यकार सर्वश्री आनंद पाळंदे आणि समकालीन जेंव्हा भ्रमंतीच्या गडघाटवाटा धुंडाळू लागले होते तेंव्हा पुण्यातील विख्यात गिर्यारोहक डाॅ. जी. आर. पटवर्धन अर्थात् बापूकाकांनी अशी प्रथा सुरू केली होती. अशा माहितीपूर्ण हस्तलिखितांची त्यावेळी अत्यंत मौलिक मदत व्हायची. बापूकाकांचं ते कार्य आणि साहित्य इतकं परिणामकारक होतं कि त्यावर पिढ्या पोसल्या गेल्या. आमच्या संजयचं हे कामदेखील असंच  निखालस, निगर्वी अन् मार्गदर्शनपर आहे.

आजच्या इंटेरनेटच्या जगात, एका क्लिकवर सर्वकाही उपलब्ध असतांना त्याच्या या कार्याचं महत्व फारसं जाणवणार नाही. पण शेवटी आभासी जग ते आभासीच असणार. हस्तलिखितांच्या पुढे त्याचं महत्व ते काय? अशा अनेक हस्तलिखितांचं आता त्याच्याकडे एक चांगलंच बाड तयार झालंय. त्यावर एक वजनदार माहितीचा ग्रंथ कधी तयार होतोय? याची मी आतुरतेने वाट पाहतोय.

संजयची, उच्चविद्याविभुषित वज्रचुडेमंडीत सकल सौभाग्यसंपन्न सहधर्मचारिणी सौ. शरयुराजे अर्थात् नीता तळेकर उर्फ आमच्या ताईसाहेब यांनी त्यांच्या सुस्पष्ट स्वरात हस्तलिखिताचं वाचन करून गडदर्शनाची लज्जत चांगलीच वाढवली. प्रोफेसरकी करुन या मॅडम थकत नाहीत मग त्यांचा वर्ग अशा पद्धतीने गडकिल्ल्यांवरही भरतो.

गेल्या २५ वर्षांहुनही अधिक काळ मी नीताराजेंना सह्याद्रीच्या कडेकपारी पिंजून काढतांना पहात आलोय. वाढतं वय असो कि नोकरी, संसाराच्या अनुषंगाने आलेल्या संकटांची भरमार असो शिवछत्रपती, किलेकोट आणि आमच्यासारखा चाहतावर्ग यांच्यावरच्या प्रेमात तसूभराची उणीव म्हणून दिसली नाही. झालीच तर यात दिवसेंदिवस वाढच होतांना पहातोय.

आता तर वैद्यकिय उच्चशिक्षण घेत असलेलं त्यांचं एकमेवाद्वितीय, अनेक खेळात पारंगत कन्यारत्न प्रांजली हीसुद्धा सह्यसेवेत रुजू झालीय. अगदी लहान असल्यापासून माता-पित्यांसह भटकंती करतच वाढलेली प्रांजली आता पालकांप्रमाणेच दुर्गाभ्यासी होतांना दिसतेय. थोडक्यात सांगायचं तर संपुर्ण कुटुंबच त्यांच्या 'तळेकरवाड्यातून' सह्यशिवाराधनेत कायम व्यग्र असतं. त्यांच्या वाड्यात' निगुतीने जपलेल्या ऐतिहासिक ऐवजांचा ठेवा याची साक्ष पटवायला पुरेसा आहे.

आमच्या किल्ले हरिहर दर्शनाचा मध्यांतर झालेला असूनही आमच्या मावळ्यांनी चांगलाच धीर धरला होता.आक्रमणाची इशारत होताच भाजी-भाकरी, धपाटे, चटण्या, मेथीचे लाडू अशा खास मराठमोळ्या खाद्यान्नांचे डबे खणखणू लागले. तलवारींचा खणखणाट ऐकण्याची सवय असलेला गडपुरुष या आवाजाने नक्कीच चकित होऊन गेला असणार.

वर्षारंभीच या मोहिमेच्या निमित्ताने अाम्ही "प्लॅस्टिकमुक्त सह्याद्री" या आणखी एका मोहिमेचाही शुभारंभ केला. यापुढे हि मोहीम अधिक व्यापक स्वरूप धारण करेल अशी खात्री आहे.

मोहिमेवर निघण्यापूर्वीच सर्वांना याची सविस्तर माहिती देण्यात आली होती. प्लेट चमचे, वाट्या, डबे यातलं काहीही प्लॅस्टिकचं असणार नाही अन् तसं काही आणलंच तर त्याच्या योग्य पद्धतिने विल्हेवाटीची सर्वांना तंबीच दिली होती. अनेक वर्षांनी या वेगळ्या खणखणाटाने गडपरिसर नक्कीच सुखावला असणार. सविस्तर पोटपूजा आवरल्यानंतर दुर्गजागराचा एक फक्कड फड "त्या तरूतळी" छानच रंगला.

मोहिमेत छायाचित्रकार हा घटक खुप महत्वाचा असतो. पण आपल्याकडे अजून त्यांना हवं तितकं महत्व दिसून येत नाही ही एक मोठी खंत आहे. आमच्या पथकातला देहेरकर असं वजनदार आडनांव असलेला अवधूत एक गुणी भटक्या. आणि होऊ घातलेला एक उत्तम छायाचित्रकार. मोहिमेत जिथं आपला जीवही आपल्याला जड झालेला असतो तिथं हा पठ्ठ्या सर्वांना आग्रहाने थांबवून त्यांचे फोटो घेत होता. आमच्यातल्या निखील हळबे या गोंडस बाळाने आणि नारायण बेबले या गुंतवणूक तज्ञाने त्याच्या कॅमे-यात स्वतःच्या छबींची भली भक्कम गुंतवणूक केली. आणि महिला आघाडीने तर याचा मामा बनवून भरपूर फोटो काढून घेतले. छायाचित्रणावरचंं त्याचं निरतिशय प्रेम त्याला आयुष्यात खुप काही मिळवून देईल यात मात्र शंका नाही.

धार्मिक बाबतीत जगभरात आपलं वर्चस्व राखणारी नाशिकनगरी, नैसर्गिक आणि ऐतिहासिकदृष्टयाही परमवैभवसंपन्न आहे. एकट्या नाशिक परिसरात सह्याद्रीच्या पहाडी बाण्याचे ५०हुन अधिक आणि एकापेक्षा एक रौद्र-बळवंत अशा दुर्गम गडकोटांचं वास्तव्य आहे. त्यामुळे नाशिकला मी तर कौतुकाने “किल्ल्यांचा जिल्हा” असंच म्हणतो.


सुखद हवामान आणि महामुर पावसामुळे बारमाही ताजातवाना निसर्ग, पूजनीय नद्या, प्राचीन मंदिरे, सरोवरे अन् प्रचूर मात्रेतील पाषाणसौंदर्य अशा विविधतेने नटलेला हा प्रदेश भटक्यांसाठी स्वर्गासमान आहे. याच स्वर्गातल्या किल्ले हरिहराच्या भेटीमुळेे खूप काही मिळवल्याचं एक वेगळंच चमकदार समाधान गडावरील प्रत्येक चेह-यावर दिसत होतं.                                                                                                                  


क्रमश: 

भिष्मराज बाम... एक देवतुल्य व्यक्तिमत्त्व - भाग २

आंतरराष्ट्रीय  पर्वत  दिन  

सोमवार  , दिनांक - ११ डिसेंबर  २०१७.


भिष्मराज बाम... एक देवतुल्य व्यक्तिमत्त्व - भाग २


बोलण्याच्या ओघात मी फिटनेस कसा सांभाळतो याबाबत सरांनी सहजच विचारलं. मी आपलं साधेपणाने माझी पद्धत सांगीतली. पोलीस दलाच्या अडनिड्या कर्तव्यातुन नियमितपणे सरावाकरीता वेळ मिळणं अशक्य नाही. पण अवघड नक्कीच आहे. गिर्यारोहणासारख्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगिण विकास साधणा-या अन् उत्तुंग पर्वतांनाही गवसणी घालणाऱ्या छंदाकरीता तर सतत डोंगर चढाईची आव्हाने पेलत राहणे हाच सर्वोत्तम व्यायाम आहे. या उत्तरावर सर भलतेच खुष झाले. एक्झॅक्टली ... मला हेच अपेक्षित होतं म्हणाले. तुझी गाडी अगदी योग्य ट्रॅकवर आहे. त्याचवेळी माझ्या टाचेत होणाऱ्या त्रासामुळे मी कसा त्रस्त झालोय याची रामकहाणी मी सरांना ऐकवली. त्यातील माझी आगतिकता आणि त्याचा माझ्या मानसिकतेवर होणारा दुष्परिणाम सरांनी बरोब्बर हेरला. आणि काही चपखल उदाहरणं देऊन विशिष्ट व्यायामावर भर द्यायचा सल्ला दिला.


सरांनी माझ्यावर केलेल्या या अनुग्रहानंतर माझ्यातील सकारात्मक बदल मला जाणवू लागले. त्याच वर्षी (सन २०१३) इंडियन माऊंटेनिअरिंग फाऊंडेशन या भारत सरकारमार्फत गिर्यारोहणाचं नियंत्रण आणि नियोजन करणाऱ्या संस्थानामार्फत हिमाचल प्रदेशातील दुर्गम पर्वतराजीत "अल्पाईन क्लाईंबेथाॅन" नांवाची आंतरराष्ट्रीय महत्व असलेली हिमालयीन गिर्यारोहण मोहीम पहिल्यांदाच आयोजित करण्यात आली होती. याकरीता संपूर्ण देशभरातुन निवडण्यात आलेल्या ५५ सदस्यांमध्ये मी देखील एक होतो.


अशा मोहीमेत सरांनी दिलेल्या गुरुमंत्रांचा खुबीने वापर करीत ती महाकर्मकठीण मोहीम तर मी पूर्ण केलीच शिवाय हिमाचल प्रदेशातील "बडा शिगरी" नामक अतिदुर्गम हिमनदीवरील ६,२०० मीटर उंचीचे एक अनामिक हिमशिखर यशस्वीरीत्या सर करण्यात मी यश मिळवले. इतकेच नाही तर त्या मोहीमेत "अल्पाईन स्टाईलने" एखादं हिमशिखर यशस्वीरीत्या सर करणारा, वयाची चाळीशी उलटून गेलेला मी एकमेव नागरी सदस्य होतो.


सरांच्या दिव्य अनुग्रहामुळे माझा आरोहणरथ जणू सुसाटच सुटला. पुढील वर्षी म्हणजे २०१४ मध्ये तर पट्टीच्या आरोहकांनाही जेरीस आणणा-या जम्मू-काश्मीर मधील मा. नुन या ७,१३५ मीटर उंचीच्या हिमशिखरालाही चांगली दणदणीत धडक दिली. पण लहरी हवामानाशी जास्त पंगा घेणं सयुक्तिक आणि व्यवहार्य न वाटल्याने ६,५०० मीटरवर बिघडलेल्या हवामानाशी सतत ४ दिवस झुंज देत असतांनाच यशस्वी माघारीचा निर्णय नाईलाजाने मलाच घ्यावा लागला. मोहिम आवरती घेतल्यानंतर सगळे थकले जीव आपापल्या घरट्यांकडे भुर्रकन उडुन गेले. पण त्यातील बामसरांच्या या भक्ताने अद्याप हार मानली नव्हती.


मुंबईला परतण्याऐवजी माझी भटकंतीची पायगाडी उलटी फिरवुन मी भटक्यांची पंढरी लेह गाठली. सुमारे २०-२२ दिवस मा. नुन या मातब्बर हिमशिखराशी प्राणपणाने लढुनही अंगातली रग अद्याप पुरेशी जिरली नव्हती. किंबहुना खेळाडूने रग जिरु द्यायचीच नसते, तर ईप्सित ध्येयाप्रत पोहोचण्यासाठी तीचा खुबीने वापर करायचा असतो. हा बामसरांचा मंत्र डोक्यात ठेऊन मी लेहजवळचे मा. स्तोक कांग्री हे ६,१२३ मीटरचे शिखर तिथल्या फावल्या वेळेत सर करण्यात यशस्वी झालो.


अनेक मोहीमांचा अनुभव असलेल्या माझ्यासारख्या आरोहकाने मा. स्तोक कांग्रीसारखं शिखर सर करण्यात खरंच विशेष काही नव्हतं. विशेष होता बामसरांनी केलेला अमोघ उपदेश. माझ्यासारख्या अतिसामान्य व्यक्तीवर सरांनी अक्षरशः ज्ञानकुंभच रिता केला होता.


मा. स्तोक कांग्री हे ट्रेकिंग पिक जरी मी सर केलं असलं तरी ती मोहीम केवळ एका सदस्याची अर्थात माझी एकट्याची होती. जगभरातुन तेथे या शिखरावर चढाईकरीता लोक येत असले तरी मी मात्र एकटाच होतो. शिवाय मा. नुनवर बरीच शक्ती खर्च झाली असतांनाही स्तोक कांग्री हे शिखर मी लेह पासून अवघ्या २२ तासांत सर केले होते. इतकेच नाही तर लेह सोडल्यापासुन स्तोक कांग्रीवरील आरोहण एकट्यानेच सहीसलामतरित्या पूर्ण करुन अवघ्या ३४ व्या तासाला मी लेहमधल्या माझ्या काॅटेजमध्ये संध्याकाळचा चहा घेत निवांत बसलेलो होतो. ही जादु होती सरांच्या दैवी वाणीची.


२०१५ मध्ये देखील मला सरांच्या शब्दांची मोहिनी आजमावण्याची संधी मिळाली. ते वर्ष क्रांतीशिरोमणी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आत्मार्पणाचं ५०वं स्मृतीवर्ष होतं. त्यानिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नांवाने एखादं भव्यदिव्य कायमस्वरूपी स्मारक हिमालयात देखील उभारलं जावं याकरीता स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारकामार्फत हिमाचल प्रदेशातील कर्चा नाला परिसरातील अजिंक्य अनामिक शिखराची निवड करण्यात आली होती. या शिखरावरील मोहीम यशस्वी करून त्या अजिंक्य अनामिक शिखरास स्वा. सावरकर यांचे नांव देण्याचा स्मारकाचा मानस होता. अशा मानाच्या मोहीमेतला एक आरोहक सदस्य म्हणून अगदी शेवटच्या क्षणाला माझी देखील निवड करण्यात आली होती.


स्वा. सावरकरांच्या नांवाचा जादुई करिष्मा अन् बाम सरांच्या शब्दांची पुण्याई, एक जगन्मान्य प्रखर राष्ट्रभक्त अन् भाषाप्रभू तर दुस-याच्या शब्दा-शब्दात अपरंपार सामर्थ्य. आणि हे दोघेही माझे श्रद्धास्थान आणि उर्जास्त्रोत असल्याने या अपूर्व योगाने मी मात्र अंतर्बाह्य उजळून निघालो होतो.


या मोहिमेतील एक प्रसंग अतिशय बाका होता. शिखरचढाई अंतिम टप्प्यात आलेली. अन् अचानक आमच्या प्रमुख गाईडने तो जिथंपर्यंत पोहोचला होता. तोच शिखरमाथा आहे असं सांगून चढाई थांबवली. काही मिनिटांतच मी त्याच्याजवळ पोहोचून त्याला विचारले असता त्याने छातीठोकपणे हाच शिखरमाथा असल्याचे मला ठणकावले.


हवामान फाॅगी असल्याने काही अंदाज येत नव्हता. माझं अंतर्मन मात्र तिथं चढाई थांबविण्याची ग्वाही देत नव्हतं. त्यावेळी मी सर्व टिमवर एक नजर फिरवली असता, सर्वजण आतोनात थकलेले दिसले. त्यात माझाही समावेश होता. ५२०० मीटरवरील कँप २ पासुन सुमारे ६ तास सातत्याने चाललेली चढाई, त्यातच मध्यरात्रीपासुनच त्या काहीशा बिघडलेल्या हवामानातच शिखरचढाईचा अट्टाहास अशा ब-याच बाबी याला कारणीभूत होत्या. पण ही मोहिम देखील अशी तशी नव्हती. इथं १९,००० फूट उंचीवर मी त्या गाईडचं एक चांगलं सविस्तर बौध्दिक घेतलं.


मनाची कवाडं उघडून जगाकडे विशाल नजरेने पहायचे असेल तर विविध खेळ खेळणे गरजेचे आहे. नुसतंच खेळणे नाही तर त्यातुन सर्वांगीण विकास आणि आत्मोन्नती साधता आली पाहीजे. आणि त्यासाठी खेळातील मानसशास्त्राचे बारकावे ज्ञात असणं अत्यंत आवश्यक आहे. हि बामसरांची शिकवण तेथे कामी आली.


अगदी शांतपणे, मधुरवाणीने अन् पुढाकार घेऊन त्यावेळी मी हे कार्य मोठ्या हिंमतीने करु शकलो. तोपर्यंत सर्वांनाच अविश्रांत चढाईच्या थकवणा-या कामातुन एक छोटीशी विश्रांती मिळाल्याने सारेच तरतरीत झाले. अन् पुढील तासा- दिडतासाच्या चढाईनंतर आम्ही त्या अजिंक्य, अनामिक हिमशिखराच्या सर्वोच्च माथ्यावर होतो. ( लवकरच त्या हिमशिखराला स्वा. सावरकर असं महान नामाभिधान अधिकृतपणे लाभणार आहे.)


गिर्यारोहण क्षेत्रातील बामसरांचं योगदान असामान्य असं होतं. हे नांव माहित नाही असा क्रिडाप्रेमी निदान महाराष्ट्रात तरी अाढळणार नाही. गिर्यारोहण आणि गिर्यारोहकांकरीता तर त्यांची कवाडं सदाच उघडी असत. त्यांचं याबाबत म्हणणं असायचं कि इतर खेळ कायम लाईमलाईटमध्ये असतात. पण गिर्यारोहणाला तसं भाग्य नाही, अन् त्याची गरजही नाही. गिर्यारोहक स्वयंभु असतात. कारण स्वतः निसर्गच त्यांचा खरा मार्गदर्शक असतो. हा सर्वसामान्यांनी जोपासलेला खेळ असला तरी ना तो खेळ सामान्य आहे ना त्यातील खेळाडु सामान्य असतात.

मर्दाचा पोवाडा मर्दानेच गावा अशी एक म्हण आहे. कारण गिर्यारोहण हा येऱ्या- गबाळ्यांचा छंदच नाही असं बामसरांचं गिर्यारोहण आणि गिर्यारोहकाबाबतचं मत होतं.


१९९८ सालच्या हृषिकेश यादवांच्या नेतृत्वाखाली आखण्यात आलेल्या मा. ऐव्हरेस्ट मोहीमेला मानसिक रसदबळ पुरवण्याचं कार्य बामसरांनीच केलं. या लेखात सुरुवातीपासून उल्लेख असलेला रफीक शेख हा तर संपूर्ण महाराष्ट्र पोलीस दलाचा पहिला एव्हरेस्टवीर जवान. हा त्यांच्या अतिशय जवळच्या खेळाडुंपैकि एक. त्याचं तर बामसरांनी ओल्या मातीच्या गोळ्यातुन एका महान कलाकृती साकारावी असंच रुपांतर केलंय. मा. एव्हरेस्टला सलग धडका देऊन त्याने तिस-यांदा विजयश्री अक्षरशः खेचून आणली. हा विजय त्याच्या एकट्याचा नक्कीच नव्हता. तर यात बामसरांच्या वाणीचा वाटा खुप मोठा होता. साताऱ्याची पहिली महिला एव्हरेस्ट वीरांगना प्रियांका मोहितेलाही एव्हरेस्टपुर्वी अनमोल गुरुमंत्र सरांनीच दिलेला आहे.


माझ्या आणि त्यांच्यातले स्नेहबंध तर शब्दांच्या पलीकडले होते. माझ्या कौशल्यावर, नेतृत्वगुणांवर सरांना ठाम विश्वास होता. एकदा तर मला म्हणाले "आनंद तु जेंव्हा कधी माऊंट ऐव्हरेस्टला जाशील तेंव्हा सोबत माझ्या मुलाला घेऊन जा " साक्षात देववाणीसह देवाच्या विश्वासाचा अनुग्रह. यापरतं आणखी काय हवं ?


सर गेले त्यादिवशी अवघं क्रीडाविश्वच दोलायमान झालं. खेळ आणि खेळाडुंसाठी तर भिषण धरणीकंपच होता तो. आता गोंधळलेल्या, भांबावलेल्या क्रिडाजनांचं मानसिक बौद्धिक कोण घेणार ? चुकिच्या क्रिडाधोरणांना स्वतःच्या हातांनी सुयोग्य असं घडीव-ताशीव रुप कोण देणार ? खेळ आणि खेळाडुंची न्याय्य बाजू शासनदरबारी वजनदारपणे कोण मांडणार?


या गहन प्रश्नांची उत्तरे सरांनी आपल्या हयातीतच देऊन ठेवलीयत. त्यांची भरपुर ग्रंथसंपदा, हज्जारोंनी प्रसिद्ध झालेले त्यांचे लेख, शेकडोंनी दिलेली व्याख्यानं यामधून सर आपल्याला भेटत राहणार, अलौकिक मार्गदर्शन करीतच राहणार.


अंधारून अाल्यानंतर भक्तांना मार्ग दाखविण्याचं काम देवालाच करावं लागतं. आणि सर तर क्रीडाविश्वातील साक्षात देवच होते. भक्तांना वरदहस्त दिल्यानंतर देव अंतर्धानच पावत असतात.


देवाने दाखवलेल्या मार्गावर निरंतर वाटचाल करीत अंतिम ध्येयाच्या स्वर्गसुखाचा यशोसोपान गाठण्याची जबाबदारी मात्र भक्तांचीच असते.


नाशिकसारख्या पावन तिर्थक्षेत्री मला घडलेलं हे साक्षात देवदर्शन, देवाचा सहवास, प्रासादिक देववाणीचा अनुग्रह निदान या जन्मात तरी मी विसरू शकणार नाही... कधीही नाही.




त्याला "ट्रेकर" म्हणू नये....

                                                                                                          जागतिक पर्वत दिवस.
                          दिनांक  ११  डिसेम्बर  २०१७ .

त्याला "ट्रेकर" म्हणू नये...
ज्याची न जुळे नाळ अथांग निसर्गाशी
ज्याला न कळे साद उत्तुंग गिरीशिखरांची
ज्याचे लागेबांधे केवळ भ्रष्ट हव्यासाशी

त्याला ट्रेकर म्हणू नये...

ज्याला नाही जाण वैभवी इतिहासाची
ज्याला नाही आण अभिमानी स्वराज्याची
जो भटके केवळ सेल्फी अन् धिंगाण्यासाठी

त्याला ट्रेकर म्हणू नये...

ज्याच्या उरात न जपली छबी शिवरायांची
ज्याने न राखली शान ताना, बाजींच्या पराक्रमाची
ज्याच्या नसांत नुरली रग मावळ्यांच्या रक्ताची

त्याला ट्रेकर म्हणू नये...

ज्याला न चाड भटकंतीच्या नियमांची
ज्याची न निष्ठा गडकोटांच्या पावित्र्याशी
जो न राखे इमान इथल्या पावन मातीशी

त्याला ट्रेकर म्हणू नये...

ज्याला न माहित निसर्गाची शिस्त
ज्याची केवळ मौज मजेवर भिस्त
जो नाहकच करी पर्यावरणाचा अस्त

त्याला ट्रेकर म्हणू नये...

ज्याच्या नेतृत्वाला नाही नियोजनाची साथ
ज्याच्या तोंडी केवळ फुशारकीची बात
ज्याने केला सदा संघभावनेचा घात

त्याला ट्रेकर म्हणू नये...

ज्याच्या कृतीने होई अवमान महाराष्ट्राचा
ज्याने न राखला मान बुलंद सह्याद्रीचा
ज्याला नसे गंध गिरी-निसर्ग संवर्धनाचा

त्याला ट्रेकर म्हणू नये...