पेंबाशेर्पा... एक हिमालयीन झंझावात...

   
र्वतारोही शेर्पा आणि हिमालयीन गिर्यारोहणाच्या दुनियेतील एक उत्तुंग मानवी शिखर म्हणजे पेंबा शेर्पा.

या नांवाच्या जादूई करिष्म्यामुळे गेली काहि वर्षे मी जबर प्रभावित होऊन गेलो होतो. मागील दहाएक वर्षांत या व्यक्तीने केलेल्या, अशक्य आणि अविश्वसनिय वाटणाऱ्या मोहिमांची यादी पाहिली कि या अफाट माणसाच्या अचाट क्षमतेची कल्पना येते. मा.एव्हरेस्ट (८वेळा), मा.कांचनजंगा, मा.अन्नपुर्णा, मा.धौलागिरी, मा.मकालू, मा.मानास्लू या विश्वविख्यात ८ हजारी शिखरांबरोबरच मा.भृगुपंथ, मा.शिवलिंग (First civilian ascent?) मा.थलय सागर, मा.कामेट, मा.नुन, मा.सासेर कांग्री-IV अशा मातब्बर शिखरांची नांवं घ्यायला खरं तर जाणकारांचीही दमछाक होते... पण पेंबा कायम यशाची नवनवी शिखरं काबीज करतच राहिला... पेंबा शेर्पा ज्या ज्या मोहिमेत समाविष्ट व्हायचा त्या मोहिमा कोणत्याही परिस्थितीत, निसटता का होईना पण यश नक्की मिळवणार असा दंडकच निर्माण झाला होता.

कित्येक वेळा तर भयंकर बिघडलेले हवामान आणि नैसर्गिक प्रकोपामुळे हातातून निसटलेल्या अनेक मोहिमा पेंबाने लीलया सावरून नेल्या, सहज-सुरक्षित यशस्वीही करून दाखवल्या...अशी साक्ष अनेक नामवंत गिर्यारोहक देतात.

थोडक्यात काय? तर पेंबा म्हणजे नुसतंच यश नाहि तर पेंबा म्हणजे सुरक्षित यशाची गॅरंटी असंच काहिसं समीकरण  तयार झालं होतं... पण काराकोरमच्या कुशीत बसून हे लिखाण करतांना अजूनही मन या गोष्टीवर विश्वास ठेवायला तयारच होत नाहिये कि हिमालयाशी हक्काने झोंब्या घेणारा, हिमालयाचा लाडका लेक, आमचा सर्वांचा आवडता पेंबा'दा... आता पुन्हा कधीही दिसणार नाही...

होय... अत्यंत दुर्दैवाने का असेना पण हे खरंच खरं आहे... आमच्या सासेर कांग्री शिखरसमुहावरील संयुक्त मोहिमेत पेंबादा शेर्पा म्हणून नाही तर अगदी हट्टाने सदस्य म्हणून सहभागी झाला होता... दि. १२/७/१८ रोजी त्याने आमच्या संयुक्त पथकातील दोन सदस्यांना हाताशी धरून मोहिमेच्या अवघ्या २१व्या दिवशी मा. सासेर कांग्री -IV" हे ७४१६ मीटर/ २४३३० फुट उंचीचे काराकोरममधील दुर्गमातिदुर्गम शिखर, अत्यंत खवळलेल्या हवामानात यशस्वीरीत्या सर देखील केले... असं अवाढव्य यश मिळवल्यानंतर, दुस-याच दिवशी अतिशय आनंदात, शिखरावरील डेंजरझोनमधून सर्व सदस्यांना तो सहिसलामत बाहेरही घेऊन आला... त्यानंतर  अत्यंत  सावधरीत्या  परतीच्या  वाटेवरील  कँप-II  जवळच्या        ( मा. सासेर कांग्री - IV,  मा.सासेर कांग्री- I आणि मा.प्लॅटू या सप्तहजारी दिग्गजांमुळे तयार झालेल्या अर्धवर्तुळाकार ) प्रचंड नालेसारख्या आकाराच्या बेसिनमधील छुपी हिमदरी ओलांडण्याचा प्रयत्न करत असतांनाच अचानक पेंबा, सावरण्याची संधी न मिळताच, त्यात अतिशय वेगाने झेपावला गेला... हे सर्व इतक्या वेगाने घडले की ते भयानक दृश्य पाहतांना बधिर झालेल्या सोबत्यांना सावध व्हायला काही क्षणच गेले असतील- नसतील आणि तो गेला... तो गेलाच... तोही कायमचाच... एक वादळी, हिमालयीन झंझावात हिमालयाच्याच कुशीत कायमचाच सामावून गेला...

१२ जूलै रोजी शिखरावरील यशस्वी स्वारीनंतर पेंबादाचा अत्यंत करुण शेवट झाला त्या दुर्दैवी दिवसाची तारीख होती १३ जूलै. १३ हा अंक तर एकप्रकारे जगभरातून बदनाम... आणि याच दिवशी पेंबासारखा हिमालयीन झंझावात शांत होऊन जावा... याला काय म्हणायचं? खरंच असं काही  असतं का ? तसं असो अगर नसो पण आता भविष्यात १३ जूलै ही तारीख कधीही विसरता येणार नाही... कधीच नाही...

अनेकवेळा हिमद-या (क्रेव्हासेस) तर कोरड्या आणि अगदीच अरुंद देखील असतात... हिमालयीन गिर्यारोहणातील जादूगार म्हणून जगभर विख्यात इटलीच्या रेनाॅल्ड मेसनर यांनी तर कोणत्याही मोहिमेत तंबू न वापरता अशा क्रेव्हासेसचा वापर नेहमीच विश्रांतीसाठी केला होता... पण पेंबासाठी मात्र त्यावेळी खरंतर साक्षात् काळच अवतरला होता... आणि सहसा वेळेवर न येणारी वेळही जणूकाही पेंबासाठीच टपून बसली होती... त्यातही दुसरं दुर्दैव इतकं मोठं की  ती हिमखाई रक्तही गोठवून टाकणा-या बर्फाळ आणि वेगवान प्रवाही पाण्याने भरलेली आणि १५/२० फुट सरळसोट उंचीनंतर खाली मोठी होत जाऊन आतल्या-आत वेडी-वाकडी वळालेली होती. खरंतर अशा परिस्थितीत विशेष अत्याधुनिक साहित्यांशिवाय आणि उपलब्ध असलेल्या जुनाट साधनसामुग्रीच्या आधारे त्याच्या सुटकेचा प्रयत्न करणे म्हणजे खरंतर शोध आणि बचावकर्त्यांच्या जीवाशीच खेळ होता...   




पेंबासारखा आघाडीचा मोहरा खाईत पडल्याचे पाहताच त्या निमिषार्धात हादरुन गेलेल्या सोबत्यांनी वेगवान हालचाली करीत त्याच्या सुटकेचे जमेल तितके प्रयत्न केले... पण सततच्या वाढत्या तपमानामुळे त्या परिसराची इतकी हानी झाली होती की, खोलात पडलेल्या (आणि सापडण्याची शक्यता जवळजवळ नसलेल्या) पेंबाला शोधायचे? की त्याचवेळी आजूबाजूच्या तशा भिषण परिस्थितीतून स्वतःचा जीव वाचवायचा? या अवघड मनःस्थितीतच त्यांनी भरपूर प्रयत्न करुन त्या भयकारी बर्फाळ भागातून काही तासांच्या घनघोर प्रयत्नांनंतर स्वतःला सुखरूप बाहेर काढण्यात यशस्वी झाले.

इकडे बेसकँपवर असलेला पेंबाचा मोठा भाऊ पासांग यास त्यांना बराच उशिर झाल्याचे पाहून, वरच्या शिबीरांवर घडलेल्या गडबडीची अंधुकशी शंका आल्याने तो पहाटेच उठून त्यांच्यासाठी जेवण घेऊन रवाना झाला... बेसकँप ते कँपमध्ये-I हे सुमारे ५ तासांचे खड्या चढाईचे अंतर पासांग या कसलेल्या अनुभवी आरोहकाने भावाच्या ओढीने अवघ्या ३ तासांतच कापून तेथे पोहोचला... पण वरून परतीला लागलेल्या पेंबाच्या पथकाची तेथे भेटच झाली नाही... त्यामुळे भयंकर काळजीत पडलेल्या पासांगने त्याही पुढे जाऊन कँपमध्ये-II च्या दिशेने स्वतःला पिटाळले... त्याची त्या दिशेने चढाई सुरू असतांनाच अगदी दूरवर केवळ ४ आकृत्या खाली येतांना दिसल्या... ५ जणांपैकी केवळ ४ जणच परत येतांना दिसल्याबरोबर पासांगच्या अनुभवी नजरेने त्यातील गांभीर्य तात्काळ ओळखले... आणि वा-याच्या वेगाने त्यांना जाऊन गाठले.  तर नेमका त्याचा लाडका भाऊ पेंबाच त्यात दिसला नाही... काळजाचा ठोका चुकवतच त्याने विचारले असता सोबत्यांकडून त्याला खरी हकिकत समजली. त्यामुळे कळवळून उठलेल्या पासांगने त्यांच्यासह पुन्हा ते ठिकाण गाठून त्वरेने हालचाल करत जवळच्याच क्रेव्हासवर पेंबानेच लावलेला दोर काढून आणला आणि २ शेर्पांच्या मदतीने पासांगदा त्या अवाढव्य क्रेव्हासमध्ये पाहता पाहता उतरला देखील...

सुमारे तासभर (३०/४० फुट) खाली उतरून पासांगने  सख्ख्या भावाला, त्याच्या काळजाच्या तुकड्याला शोधण्याचा भरपूर प्रयत्न करुनही काहीही हाती लागले नाही... गेल्या २५ वर्षांच्या माझ्या कारकीर्दीतली ही  सर्वात भयानक घटना... सुन्न होऊन गेलेल्या तना-मनाला सावरणं मात्र आंम्हां सर्वांसाठीच अतिशय अवघड बाब होती... आम्ही गड जरी जिंकला असला तरी आमचा नरवीर सिंह मात्र आम्ही कायमचा गमावला होता... त्याच्या अशा जाण्याने आम्ही अपार मेहनतीने लाभलेलं इतकं घवघवीत, चमकदार यशही काळवंडून गेल्याचा भास होऊ लागला... 




सुन्न करुन सोडणाऱ्या या घटनेनंतर पेंबाच्या आमच्या सोबतच्या या शेवटच्या मोहिमेतील आठवणींसह इतरही अनेक आठवणी डोळ्यांसमोर फेर धरु लागल्या... पुर्वी भरदार, भरीव देहाचा दिसणारा पेंबा, आता उतारवयाकडे झुकतांना, आयुष्यात येऊ घातलेल्या थोड्याफार स्थैर्यामुळे आता अगदीच गोल गरगरीत शरीरयष्टीचा झाला होता...

पेंबाच्या तशा निष्पाप चेहऱ्यावर खळखळून येणारं हसू पाहणं हा आमच्या करमणुकीचा एक मोठा विषय असायचा... मोठ्याने हसणं त्याच्या स्वभावात नव्हतं... पण त्याचं हसू निरागस असलं तरी काहीसं खोडकर मात्र असायचं...पेंबाची बंगाली समाजाशी विशेष घट्ट नाळ जुळली होती... सतत बंगाली टिम्सबरोबर हिमालयीन मोहिमा करून करून तो जवळजवळ बंगालीच होऊन गेला होता... त्यांची भाषादेखील त्याने उत्तमरित्या आत्मसात केली होती... इतकंच नाही तर पश्चिम बंगालमधील अनेक गिर्यारोहण संस्थांचा तो सदस्यही होता... इतर कोणा टिमबरोबर जाण्यापेक्षा त्याला बंगाली टिमबरोबर जाणं खुप आवडायचं... 

बंगाली खाद्यप्रकार, मांसाहार आणि मिठाया यांचा तो चाहता होता... याचं मुख्य कारण म्हणजे त्याच्या वाईट दिवसांत याच बंगाली संस्थांनी त्याला आसरा दिला, कामं दिली आणि तगडा गिर्यारोहक शेर्पा म्हणून नांवारूपाला आणलं... तो इतका बंगालमय होऊन गेला होता की, हिमालयात काम नसलं कि तो बंगालमध्ये पहुडलेला असायचा. त्यामुळे पेंबानेही आपल्या जिगरबाज आरोहण कौशल्याच्या आधारे बंगाली समुदायाने दिलेल्या प्रेमभावनेची परतफेड अक्षरशः दामदुपटीनेच करुन दिली असंच म्हणावं लागेल...



एरव्ही सतत कामात व्यस्त असलेला पेंबा थोड्याशा सवडीतही मोकळेपणाने बोलायचा. शेर्पा समाजातील बेकारी, त्यांचे हलाखीचे जीवन, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची आबाळ, आरोहणप्रसंगी झालेल्या अपघातांवेळी विम्याचा प्रश्न इत्यादींचा काच त्याला कुठेतरी आत खोलवर जाम सलायचा... त्यांच्यासाठी एखादी योजना सुरु करण्याची त्याची खुप इच्छा होती. त्यांच्या अठराविश्व दारिद्र्यामुळे व्यथेमुळे पेंबा बोलता-बोलता सद्गदित होऊन जायचा... शेर्पा समाजातून जे पुढारले, मोठे झाले त्यांनी स्वतःपुरतेच पाहून गरिब गिरीजन शेर्पा समाजाकडे पाठ फिरवल्याबद्धल त्याचे डोळे पाणावून यायचे.

सुरुवातीला मोठ्या भावाबरोबर किरकोळ भारवाहक म्हणून येऊन, पडेल ती कामं करणारा पेंबा... या क्षेत्रातला त्याचा गुरू टेंडी शेर्पाने उत्तराखंडातील भृगुपंथ या शिखरावरील मोहिमेत स्वतंत्ररीत्या शेर्पा म्हणून पाठवले. ती मोहिम स्वकर्तृत्वाने जबर हिंमतीने यशस्वी केल्यानंतर पेंबाने कधीही मागे वळून पाहिले नाही... त्याच्या कर्तृत्वाचा आलेख कायम चढताच राहिला... शेर्पा समाजातही त्याने आपले भरीव योगदान दिले असल्यामुळे त्याच्या लोकप्रियतेचा आलेखही चांगलाच उंचावला होता.    

आज गिर्यारोहण विश्वात अनेक विक्रमवीर आणि मोठमोठया पुरस्कारांचे मानकरी म्हणून दिमाखात मिरवणाऱ्यांच्या बेगडी यशामागे याच पेंबाची अपार मेहनत आहे... हे आता त्या सर्वांनी आवर्जून लक्षात ठेवले पाहिजे... आणि आपल्या पुढील कर्तव्याला जागलेच पाहिजे... कारण आता पेंबादाचं कुटुंब... निराधार झालंय... त्याची कच्ची-बच्ची आता उघड्यावर आलीयत... त्यांच्या पालनपोषणाची, शिक्षणाची, त्याच्या विधवेच्या निर्वाहाची व्यवस्था व्हायला हवी अन्यथा... अनर्थ होईल... आता ही आपल्या गिर्यारोहक समुदायाची मोठी आणि नैतिक जबाबदारीही आहे...

आता पेंबादाची कधीही भेट होणार नाही... या विचाराने मनात आता प्रचंड काहूर माजवलंय... आठवणींच्या कप्प्यांतील  त्याच्या लहान मुलासारख्या गोल गोब-या गालावरील ते निरागस हसू कधीही पाहता येणार नाही... या विचाराने मन कातर  होऊन गेलंय... शिखराच्या बेसकँपवर बसल्या बसल्याच, पुर्वी झालेल्या पेंबादाशी झालेली पहिली भेट आठवू लागलो... त्याचं नांव बरीच वर्षे ऐकून होतो पण भेटीचा योग काही येत नव्हता...

२०१४ च्या ऑगस्टमध्ये मा. नुन च्या अंतिम शिबीरावरून  भयंकर हिमवादळाशी सतत चार दिवस झुंज देऊनही आमची चढाई यशस्वी होऊ शकली नाही . तेंव्हा आम्ही मोहिम आवरुन परतीच्या वाटेला लागलो असतांनाच एका बंगाली टिमसह तेथील मोहिमेवर आलेल्या पेंबाशी मा. नुनच्या पायथ्याशी पहिल्यांदाच भेट झाली होती... त्या ओझरत्या भेटीतही पेंबाच्या प्रसन्न व्यक्तिमत्वाने मनात चांगलंच घर केलं... इतकं मोठं आणि जबरदस्त कर्तृत्व असूनही मला पेंबा अगदीच साधासुधाच वाटला... आणि मला तर वाटतं हा कमालीचा साधेपणाच त्याचं प्रमुख वैशिष्ट्य होतं...




पुढच्याच वर्षी २०१५ मध्ये पुन्हा एकदा पेंबाशी भेटण्याचा योग जुळून आला होता... मुंबईतील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक यांच्या वतीने हिमाचल प्रदेशातील एक अजिंक्य अनामिक हिमशिखर सर करून त्यास स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नांव देण्याच्या मोहिमेत सहभागी झालो होतो. त्यावेळी एक दुथडी भरून वाहणारा नाला पार करीत असतांना त्याच परिसरातील एका शिखराकरीता बंगाली पथकासह आलेल्या पेंबाशी अगदी उराउरी चांगलीच भेट झाली... काही वेळ विचारपूस, गप्पागोष्टी आणि चक्क फोटोसेशनही झालं... त्यावेळी मात्र अपरिचित असलेला पेंबा अधिकच जवळचा होऊन गेला... त्यावेळी पेंबासारख्या दादा गिर्यारोहकाचा नाझ्या मित्रयादीत समावेश असल्याचा जबर अभिमान वाटून गेला... चार-चौघात पेंबा माझ्या परिचयाचा आहे हे काॅलर टाइट करून सांगायला फार बरं वाटायचं...

गेल्या वर्षी भारताचे तिसरे अत्त्युच्च मा. कामेट किंवा मा. त्रिशूल च्या आयोजनात नको तेवढा उशिर अन् घोळ झाल्याने आमचा तो प्रयत्न तसाच राहुन गेला. यंदाच्या वर्षी मात्र मार्चच्या सुमारास पुणे व्हेंचरर्स चा कार्यवाह जमिर शेखने फोन करून मा. सासेर कांग्री मोहिमेतील सहभागाबाबत मला विचारले... भारताच्या या चौथ्या अत्त्युच्च शिखराचे नांव ऐकून मी क्षणाचाही विलंब न लावता फोनवरच तात्काळ होकार कळवून टाकला... ही महाराष्ट्र आणि बंगालची एक संयुक्त मोहिम होती... ज्यात एक टिम म्हणून पुणे व्हेंचरर्स आणि बंगालमधील एका टिमचा समावेश असणार होता... आणि आरोहक शेर्पा म्हणून चक्क पेंबा आणि त्याचे दोन पराक्रमी भावांचा सहभाग असणार होता. त्याचा लहान भाऊ ताशी देखील आपल्या दोन मोठ्या भावांप्रमाणेच प्रचंड पराक्रमी होता... त्याने भारतातील मा. एव्हरेस्ट, मा. कांचनजंगाच नाही तर पाकिस्तानातील मा. के२ हे जगातील द्वितीय क्रमांकाचे सर्वात अवघड शिखरही सर केले होते... मोठा भाऊ पासांग ज्याने गेल्या २५/३० वर्षात गिर्यारोहणातील अनेक उच्चांक पादाक्रांत केले होते... जगातील सर्वोच्च शिखर मा. एव्हरेस्ट आणि भारताचे सर्वोच्च कांचनजंगा आणि जगातील ३रे शिखर सर करणारे हे जगातील एकमेवाद्वितीय असे भाऊ होते... अशा प्रकारे एका आंतरराष्ट्रीय महत्वाच्या मोहिमेत सहभागी व्हायचा आनंद मात्र खुपच मोठा होता.

प्रस्तुत मोहिमेकरीता पुण्यातून, चंदिगड-मनालीमार्गे लेहमध्ये पोहोचताच पुन्हा एकदा पेंबाची अपेक्षेप्रमाणे भेट झाली. आपल्या आवडत्या हिरोला पाहिल्यानंतर जो आनंद उचंबळून येतो अगदी तश्शीच माझी अवस्था होऊन गेली होती. त्यावेळी असं चुकूनही वाटलं नव्हतं की ही आमची शेवटची भेट असेल... आता मात्र आमच्या भेटींचा  हा रंगबिरंगा सिलसिला कायमचाच खंडीत झाला आहे...

भविष्यात शेर्पा होतील, गिर्यारोहकही भरपूर होतील... पण पेंबासारखा निस्सिम पर्वतपुत्र मात्र एखादाच होऊ शकतो... गिरीपर्वत, गिर्यारोहण, गिर्यारोहक आणि गिरीजनांवर  मनापासून प्रेम करणारा... अत्यंत मृदू आणि लोभस स्वभावाचा... भेटेल त्या प्रत्येकाच्या मनात घर करणारा... एखाद्या हिमशिखरासारखाच भव्य आणि उत्तुंग त्याच्या विविध स्मृतींचा दरवळ तर मनात कायम राहिलच... तरीही साश्रू नयनांनी त्याला अखेरचा मानाचा... जय... हिंद.




साहित्यसह्याद्री... माझा सह्याद्री ...

साहित्यसह्याद्री...  "माझा सह्याद्री" ...

आत्म्याचा चिरंतन ध्यास न् धपापत्या उरातला श्वास 
माझा सह्याद्री...
जीवा, सखा, सजणा अन् त्याहूनही अगदीच खास
माझा सह्याद्री...
भटक्या जीवांची आन बान अन् शान...
माझा सह्याद्री...
तर.... अंतरीची जान अन् कुडीतला प्राणही...
माझा सह्याद्री...

कातळकोरीव, अनगड-अवघड, चिंचोळी वाट
माझा सह्याद्री...
दरीकाठच्या भयाण घसाऱ्यावरचा थरथराट
माझा सह्याद्री...
भटकंतीची राकट, रेखीव, अनवट वहिवाट
माझा सह्याद्री...
तर... भुल्या, भुकेल्या भटक्याचं भरलं ताटही...
माझा सह्याद्री...

निसर्गाच्या कुशीतला शिस्तबद्ध साहसी पदन्यास
माझा सह्याद्री...
कातळकोरीव लेण्या अन् गुहेतला धुंद सहवास
माझा सह्याद्री...
गडकोटांवरच्या अवचित धाडसाचा सावध अदमास
माझा सह्याद्री...
तर... किर्रकाटा रानातला अर्ध्या रातीचा घनघोर प्रवासही
माझा सह्याद्री ...

किलेकोटांच्या तटां-बुरूजांवरचा भिरभिरता भर्राट वारा
माझा सह्याद्री ...
स्वराज्यलक्ष्मीच्या अफाट दौलतीचा अकलंक तोरा
माझा सह्याद्री ...
गनिमी काव्याच्या अचाट युद्धनितीचा अनगड गुंगारा
माझा सह्याद्री ...
तर विश्वाच्या अफाट रचनेतला सुखद नजाराही
माझा सह्याद्री ...

मडक्यातलं गोडघट्ट दहि न् चवदार आंबटसर ताक...
माझा सह्याद्री...
कोरडीखट भाकरी न् खमंग चटणीवरल्या तेलाची धार..
माझा सह्याद्री...
बंबाळ्या रानातल्या, आंबटगोड मेव्यांचा सरताज...
माझा सह्याद्री...
तर कुडा-झापाच्या झोपडीतल्या मलंग श्रीमंतीचा बाजही
माझा सह्याद्री...

शहा-जीजाऊंच्या स्वर्णिम स्वप्नांचा तगडा मनसबदार
माझा सह्याद्री...
शिवछत्रपतींच्या स्वराज्याचा मस्तमौला राखणदार...
माझा सह्याद्री...
ताना-बाजींच्या मावळी समशेरीचा कणखर वार...
माझा सह्याद्री...
तर धर्मवीर शंभूंच्या बलिदानाचा ज्वलज्जहाल साक्षीदारही
माझा सह्याद्री...

ज्ञानियांच्या राजाने रचिलेला विराट-विशाल पाया
माझा सह्याद्री...
तुकोबांरायांच्या सग्यासोय-या वृक्षवल्लींच्या राया
माझा सह्याद्री...
समर्थांच्या कणखर वाणीतली अपरंपार माया
माझा सह्याद्री...
तर कवीराज भुषणाच्या खड्या बोलीतला अत्तराचा फायाही
माझा सह्याद्री...


श्रीशिवराज्याभिषेकाची आनंदवारी -भाग १

श्रीशिवजयंती
दिनांक १९ फेब्रुवारी २०१८.
स्थळ  - शिवमंदिर, किल्ले  माहुली  पायथा , जि - ठाणे.

श्रीशिवराज्याभिषेकाची आनंदवारी भाग - १

मुंबई ते  किल्ले रायगड… मोटारसायकल स्वारी...

न भरातल्या कडकडीत उन्हाचा ६ जूनचा दिवस. जूनच्या सुरुवातीचं हे उन तर मेपेक्षाही भयाण जाणवत होतं. तशातच आव बघितला ना ताव. त्या तिक्ष्ण उन्हातच भर दुपारी आम्ही दोघांनी मोटारसायकल सुसाट भिरकावली.

ऐनवेळी प्रवासाची इतर कोणतीही सोय होण्याची लक्षणं दिसत नव्हती. त्यामुळे महेशसरांनी मोटार सायकलवरुन किल्ले रायगड गाठण्याच्या प्रस्तावाने अगदी हायसं वाटलं.

अजिबात वेळ न दवडता मुंबईतून दोघंही टाकोटाक अन् सुसाट निघालो. पनवेल, पेण, वडखळ अशा मजला मारीत सायंकाळच्या आसपास माणगाव जवळ करीत असतांनाच पावसाने भाॅ... s...s... करण्यास सुरुवात केली


रायगडाचा धारकरी... पाऊस...


एक बरं होतं कि, अाम्ही जसजसे रस्ता कापत होतो, पाऊस आमच्या पुढे पुढेच पळत होता. यावेळी का कोणास ठाऊक तो नेहमीसारखा तिरपीट उडवणारा, खोडकर नाही वाटला. तर त्याच्या येण्याने आमच्या कार्यात बाधा येऊ नये याची मनोमन काळजी घेणारा दिसला. आज तोही जणू रायगडाचा धारकरीच झाला होता. खुपच खुश झाल्याने त्याच्या मेघमल्हाराला आज अवर्णनीय असा सुर, ताल आणि लयही गवसल्याचे दिसत होते.

श्रीशिवराज्याभिषेक सोहळ्याकरीता आंम्हांला इतमामाने घेऊन जायला आलेल्या एखाद्या खास यजमानासारखाच तो वावरत असल्याचेही जाणवले. त्यामुळे आम्ही पोहोचण्यापूर्वीच सगळीकडे अवीट आनंदाची बरसात करत तो आमच्या पुढे निघाला होता. केवळ मनोरंजनासाठीच म्हणून कि काय आंम्हांला तो पाठशिवणीचा एक मस्त खेळही खेळवत होता.

जगाच्या इतिहासातील एका सर्वश्रेष्ठ राजाचा राज्याभिषेक सोहळा पाहण्याची आस जीवाला अश्शी लागली होती की मन तर पाखरू होऊनच केंव्हाच उडु लागलं. अन् विलंबाला जागाच ठेवली नसल्यामुळे मिळेल तसा तडक निघालो होतो. कधी एकदा सर्वांग सजलेला, जाणत्या राजाच्या रयतेने फुलून गेलेला दुर्गेश्वर पाहतोय अस्सं होऊन गेलं होतं.

ज्ञानदानाच्या व्यवसायकार्यात असले तरी उभा आडवा सह्याद्री पिंजून काढण्याचा मनसुबा कायम जागरुक ठेवणारे उच्चविद्याविभुषित महेश कुलकर्णी सर आमच्या दुचाकीचं सारथ्य करीत होते. दादरच्या स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या भव्य संकुलात राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा परिक्षार्थ्यांकरीता त्यांचा ज्ञानयज्ञ अव्याहत सुरु असतो. शिवाय मोटारसायकलवरुन देशभरात अमाप भटकंती करण्याचा रग्गड अनुभव गाठीशी असल्याने हे परिवहन खातं त्यांच्याकडेच असलेलं बरं असा विचार करुन मी मागे बसून हिरव्याकंच कोकणसफरीचा आनंद लुटायचा मार्ग पत्करला.

रायगडाच्या घे-यात प्रवेश करेपर्यंत केवळ सुखाची बरसात करणाऱ्या पावसाचा मानाचा पाहुणचार स्विकारतच आम्ही चितदरवाजा गाठला. वरूणराजाचा तर आमच्या महाराजांवर अमाप जीव. म्हणूनच तर या महान सोहळ्यासाठी अक्खा गड न् सा-या गडवाटा त्याने आपल्या स्नेहाने न्हाऊ-माखून घेतल्या होत्या. अगदी चंद्र-सुर्याचं लिंबलोणं करुन या राजावरून ओवाळून टाकलं तरी समाधान व्हायचं नाही असा प्रौढप्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस आमचा राजा.

गडपायथ्याशी पोहोचताच, आम्हांला सहीसलामत पोहोचविण्याचे सत्कार्य करुन दमल्या भागल्या दुचाकीला, एका सुरक्षित ठिकाणी लावुन मस्त विश्रांती दिली. वेळ न दवडता, प्रवासात अस्ताव्यस्त झालेला जामानिमा सरळ करुन घेतला.


धुंद-कुंद हवामानाची साथ अन् काजव्यांची करामात...


आकाशाकडे पाहुन हवामानाच्या लहरींचा वेध घेण्याचा प्रयत्न केला. पण चांगलंच झाकोळुन आल्याने काहीच अंदाज लागला नाही. चित दरवाजाच्या पहिल्या पायरीजवळ आलं कि, का कोणास ठाऊक पण अंतरी जागृत होणारी नेहमीची एक वेगळीच संवेदना याही वेळी मी शांतपणे अनुभवली. हे काय असतं ? कुठून येतं ? या फंदात मी आजवर पडलो नाही न् पडणारही नाही. गडाच्या पहिल्या पायरीजवळ येऊन तिला श्रद्धेने हात लावला. हाताला लागलेले ते देवकण भाळी लेऊन, महाराजांचं स्मरण करीत आस्ते-आस्ते गडचढाईचा छान शुभारंभ केला.

रात्रौ जवळपास आठचा सुमार. मस्त धुंद-कुंद वातावरण. ढगांमध्येच रूतलेला असुनही आणि नांव चंद्रराव असले तरी आडमुठ्या ढगांना बाजुला सारत त्याने गडावर मंदसा, शितल प्रकाश कायम ठेवला होता. स्वराज्यस्वामींच्या राज्याभिषेकाला येणाऱ्या भक्तांना कोणत्याही प्रकारची तोषिस लागू नये हि उदात्त भावना त्या रजनीनाथानेही मोठ्या अौदार्याने जपलेली दिसत होती.

वातावरणात मस्त गारवा तर होताच पण नेहमी गडावर त्रास देणाऱ्या खोडसाळ वाऱ्यानेही त्यात बोचरेपणा येऊ न देता स्वतःला एका संथगतीत झुळझुळते ठेवले होते. क्षणभर आपण पृथ्वीवरच आहोत ना? चुकून स्वर्गात तर नाही ना आलो ? असा भास होऊन गेला.

रायगड म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्गच नाही का? रयतेच्या जाणत्या राजाची राजधानी स्वर्गाहुन कमी का असेल? कदापि नाही. ज्याने नामवंत आणि गर्भश्रीमंत शाह्यांना त्यांची असली अौकात दाखवली, ज्याच्या श्रेष्ठत्वापुढे तर देवांनीही हेवा करावा अशा राजाची राजधानी स्वर्गाहुनही रम्यच म्हणावी लागेल.

गडपरिसराला मंत्रून टाकणाऱ्या, अत्यंत मनोवेधक वातावरणाची निर्मिती करणाऱ्या समस्त निसर्गतत्वांना मनोमन दुवा देत असतांनाच एका विलक्षण अपूर्वाईने लक्ष वेधून घेतलं. खुब लढा बुरूज ओलांडून थोडंच अंतर काटलं होतं. डावीकडील दरीसदृश उतारावरून कोणी लुढकु नये म्हणून लोखंडी रेलींग लावल्या होत्या. या रेलींगपलीकडच्या उतारावरील झाडी-झाडोऱ्यातुन काजव्यांनी पसरलेल्या चांदणचुऱ्याच्या हलक्याशा सोनपिवळ्या प्रकाशाची मस्त आभा मनाला उल्हासीत करुन गेली. सांजवातीने फुललेला प्रसन्न प्रकाश पाहून मरगळलेलं मनही कसं प्रफुल्लित होतं, अगदी तस्संच झालं. ते मनोहारी दृश्य डोळे पहात होते, पण कसं कोण जाणे पायांना त्वरित थांबण्याच्या आज्ञा सुटल्या. निसर्गदिव्यांनी केलेली ती शितप्रकाशाची उधळण मनमोराला अक्षरशः डोलायला, नाचायला लावणारी होती. सारं जग काही क्षणासाठी थांबलंय की काय असंच वाटून गेलं.

आम्ही पोहोचण्यापूर्वीच पावसाने पुरेसं बरसुन, प्रवासात त्याच्याशी लपंडाव, पकडा-पकडी आणि हुतुतु खेळल्याची बक्षिशी म्हणुन या नितांत सुंदर अशा अंतरीच्या ठेव्याची आमच्यासाठी गडभर पखरण केेली होती. उल्हासित झालेल्या माझ्या मनाने तो स्वर्गीय नजारा आधाशीपणे टिपायला सुरुवात केली.

काजवा... एक सामान्य, निरूपद्रवी किटक असला तरी त्यालाही शिवसोहळ्याला चार चांद लावायचा मोह अनावर झाला. खट्याळ पावसाशी संगनमत करुन राज्याभिषेकाच्या पुर्वसंध्येलाच त्यांनी आपल्या मिणमिणत्या प्रकाशाने ती स्वर्गिय गडवाट दिमाखदारपणे सजवून काढली.

वाटेवरील प्रत्येक झाडोऱ्याचं त्यांनी प्रकाशाच्या झाडात रुपांतर करुन त्याला मनमुरादपणे उजळून काढलं होतं. रायगडाच्या वाटेला जाणकार मंतरलेली वाट म्हणतात असं अनेक वर्षं ऐकुन होतो. पण रायगडाची वाट अशीही मंतरलेली असू शकते याची कल्पनाच केली नव्हती. शेकडो झाडं प्रकाशाने निथळतांना पाहणं सोपं नव्हतं. महाराजा...

प्रत्येक दोन श्वासांमधील अंतर उगाच वाढत चाललं होतं. तर काळजाच्या ठोक्यांनाही लय सापडंत नव्हती. काजव्यांच्या प्रकाशमायेची किमया केवळ ऐकून होतो. पण त्यातलं सुख काय असत? हे पहिल्यांदाच प्रत्यक्षरित्या अनुभवत होतो.

एकटा-दुकटा काजवा तर मुंबईतही अनेकवेळा पाहिला होता. पण त्यांच्या समुहाची हि कमालीची करामत निश्चितच मोहवुन टाकणारी होती. या प्रचंड मोहक दृश्यामुळे इथंच मुक्काम होतोय कि काय अशी भितीही वाटू लागली. डोळ्यांनी तर पायांशी कमालीचं संधान बांधलं होतं अन् मनाची तर मतीच गुंग झाली होती. काय करावं खरंच सुचत नव्हतं. क्षणात मंदावणाऱ्या आणि लगेच उजळून निघणाऱ्या या झिलमिल दिव्यांनी इथे गडपायथ्याशी दिवाळीच सुरु केली होती.

शिवकाळात मावळे आनंदसमयी मशालनृत्य करीत असत. हे लुलुकणारे काजवे... मावळेच नसतील कशावरून? अंगावरुन शहारा सरसरत गेला... किती सुंदर कल्पना? त्याकाळी मशाली नाचवत आनंद साजरा करणारे, रात्र-रात्र जागवणारे शिवभक्त मावळे काजव्यांच्या रुपात येऊन या महान सोहळ्याच्या पुर्वसंध्येला तेजोमयी अविट प्रकाशाने सारा गड सजवताहेत.

गडवाटांचं तर त्यांनी अभूतपूर्व प्रकाशवाटांमध्येच रुपांतर केलं होतं. त्यांच्या टिमटिमण्यामुळे एक वेगळंच रोमहर्षक वातावरण गडपरिसरात निर्माण झालं होतं. त्यांच्या त्या बेभान, अनवट अन् गुढ नाचानेही तेथे एक सुंदर लय गाठली होती. आणि त्या लयीवर साक्षात दुर्गराज रायगडानेही मंदसा ताल धरलाय कि काय असंच वाटून गेलं.

खरंच या काजवानृत्याने अन् त्यांच्या आगळ्या-वेगळ्या दिपोत्सवाने तर राज्याभिषेकाच्या मुख्य सोहळ्याआधीच कमालीची रंगत आणली. गडावरील बहारदार सोहळ्याची मस्त चुणूक इथे गडपायथ्यालाच आम्ही अनुभवली. अत्यानंदाच्या नादात भराभर उलटून चाललेल्या वेळेकडे पाहता, मुख्य कार्यक्रमाचे वेध लागायला सुरुवात झाली होती.

दुर्गदुर्गेश्वर रायगड म्हणजे शिवछत्रपतींच्या काळजाचा ठाव. थोड्याच वेळात तेथे राज्याभिषेकाच्या महासोहळयास आरंभ होणार होता... प्रचंड जनसागर आनंदसागरात डुंबण्याच्या तयारीत होता. दाहि दिशा गोब्राम्हण प्रतिपालकाचा जयजयकार करणार होत्या. अन् आमची हृदयं कमालीच्या अतीव आनंदाने भरुन आली होती. प्रौढप्रताप… पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस… गोब्राम्हण प्रतिपालक… अशा बिरुदावल्यांनी अन् अल्काबांच्या पुका-यांनी गडवाट दणाणून गेली होती.

तमाम उदात्त निसर्गतत्वांमुळे आणि विशेषतः काजव्यांमुळे आमची अचपळ मनं आणि थकली गात्रं अशी तृप्तावली होती कि एक अपूर्व समाधान उरात घेऊन, अधीरतेने आमची सय काढणाऱ्या गडाच्या महाद्वाराकडे अगदी शांतपणे आम्ही वाटचाल करु लागलो...





  क्रमशः

शिवराज्याभिषेक... एक आनंदवारी... भाग-२

श्रीशिवराज्याभिषेकाची आनंदवारी ... भाग - २

डचढणीला लागताच काजव्यांनी मांडलेल्या मनोहारी महोत्सवाने भरुन आलेली मने आणि जडावलेल्या पावलांना थोडी गती दिली. तेथून निघालो ते थेट महाद्वार गाठले. तोपर्यंत रात्रीचे १० वाजून गेले होते. वाटेत झाकोळुन आलेल्या ढगांनी चांगलंच भेववलं. पण तो नुसताच भाॅ ssss.. होता. त्यात दम काहीच नव्हता. 

महाद्वाराशी पोहोचताच त्या बुलंद बलिष्ठ बुरुजांना अगदी झुकुन मुजरा केला. या सन्मानाचा तो हक्काचा मानकरीच आहे. अशा रात्रीच्या काळोखभरल्या वातावरणात देखील महाद्वाराची भव्यता आणि देखणेपण भारुन टाकणारं होतं. नजरेच्या मिठ-मोह-या उतरवून टाकाव्यात कि काय असंच काहिसं भारून सोडणारं वातावरण होतं.

रायगडाचं महाद्वार हा महान वास्तुविशेष माझ्यासाठी नेहमीच आकर्षणाचा एक परमोच्च बिंदु होऊन राहिलाय. अगदी पहिल्यांदा रायगड दर्शन केलं तेंव्हापासून एक गुढ संवेदना ईथं आल्यानंतर आपोआपच जाणवते. अंगावर शहारे उठतात. इथल्या सुखद, अकलंक आणि निवांत वातावरणामुळे कधी-कधी असंही वाटतं की या अजस्त्र वास्तूतच रायगडाच्या गडपुरुषाचं ठाणं असावं. त्या महापुरूषाला गडापेक्षा इथला सहवास जास्तच आवडत असावा. आणि म्हणूनच माझ्यासारख्या गडभटक्याला रायगडाला भेट दिल्याच्या समाधानाची पहिली पावती इथंच मिळते.

या वास्तूत काहीतरी जादू नक्कीच आहे. मला चांगलंच आठवतं... एकदा रायगडाच्या तिनही कड्यांच्या आरोहणाकरीता गडावर येणं झालं होतं. २५०/३०० किलो साधनसामग्रीची जाम गर्दी झाली होती. आणि रोपवेने येण्याशिवाय गत्यंतरच उरलं नव्हतं. काही इलाजच नव्हता. त्यामुळे मनावर भलामोठा दगड ठेऊनच हे (कु)कर्म केलं होतं. पण त्याही वेळेला मी गडावर पोहोचताच भारल्यासारखा वायुवेगाने महाद्वारी येऊन गेलो. काय करणार ? इथल्या पवित्र मातीची धुळ कपाळी लावल्याशिवाय चैनच पडत नाही. कारण इथल्या मातीत स्वराज्यसुर्याच्या पदचिन्हाचं शिवतेज विखुरलंय. तिला स्पर्श झालाय तो साक्षात युगपुरुषाचा. हि माती आम्हां भटक्यांसाठी साधीसुधी नाही तर एका प्रचंड ऊर्जेचा अखंड स्त्रोत आहे. 

किती तरी वेळा गड चढाईदरम्यान शिवछत्रपतींनी काही क्षण का असेना इथं विसावा घेतला असेल. त्या जाणत्या राजाने पालखीच्या भोयांसह इथल्या पहारेदार, तटावरील धारकरी, त्यांच्या पोराटोरांची लेकिसुनांची ख्याली-खुशाली पुसली असेल, त्यांच्या सुखदुःखात सहभागी झाले असतील. चांगल्या कामगिरींच्या बक्षिशीसाठी मोहरांचा कसा इथं रिता केला असेल. महाद्वाराच्या अवाढव्य भिंतींवर ती करारी, भेदक नजर मायेेच्या ओलाव्याने परत परत अंतर्बाह्य फिरली असेल. महाद्वाराला बांधणाऱ्याचं, त्याला राखणाऱ्यांचं राजांनी तोंडभरुन कौतुक, कैकवेळा इथंच केलं असेल. त्या अजस्त्र बलाढ्यपणाकडे पाहुन त्या शिवावताराने इथल्या चिऱ्या-चिऱ्यावरुन आपला वरदहस्त प्रेमाने फिरवला असेल. त्या स्वर्गीय स्पर्शाने तो जडशीळ पत्थर देखील शहारून उठला असेल. काय आणि किती तरी गोष्टी इथं घडल्या असतील त्याची मोजदादच नाही. आणि याचमुळे महाद्वारात आल्यानंतर काहि गुढ संवेदनांची  आपोआप जाणीव आजही होते.

कितीही रात्र, कोणतीही वेळ असली तरी महाद्वारात का कोणास ठाऊक कधीच भय वाटलं नाही. भटकंतीला सुरूवात केल्यानंतर, खुप वेळा मी इथं रात्री-बेरात्री आणि एकटाही आलोय. पण इतरत्र जाणवणारी असुरक्षिततेची भावना या काळ्याकभिन्न बुरुजांच्या सान्निध्यात यायला धजावत नाही. त्या जुळ्या, बळकट बुरुजांच्या बलदंड बाहुपाशात आणि जपमाळेच्या गोमुखी आवरणासारख्या स्थापत्यरचनेच्या अंतरंगात असतांना तर साक्षात त्या गडरूपी पुराणपुरुषाच्या छत्रछायेखाली अत्यंत सुरक्षित असल्यासारखं वाटतं. 

एक बरंय कि हि वास्तु महाद्वार असल्याने गडभेटीत प्रथम दर्शन याचंच होतं. आणि याचं दर्शनच असंय कि कितीही थकलेल्या तना-मनाचा कणन् कण अगदी सुखाऊन जातो.

माझ्या अल्प-स्वल्प ज्ञानानुसार खरं तर स्थापत्यशास्त्र, युद्धशास्त्र आणि संरक्षणाच्या दृष्टीने त्यावेळी गडाची महाद्वाराकडची ही उतरती बाजू खरं तर एक मोठी ऐब म्हणजेच कमजोरी असणार. अन् गनिमांच्या हल्ल्यात गडाच्या सर्वनाशाला कारणीभूत ठरणारी देखील. पण तिच्या त्या उताराच्या खोलगट भागात महान हिंदवी स्वराज्याच्या राजधानीला साजेसं अतिभव्य महाद्वार ज्या चपखलपणे उभारून गडाला जे परमोच्च वैभव मिळवून दिलंय याची तोड जगात कुठेही मिळणार नाही.

महान स्वराज्याच्या त्या जाणकार स्थपतीने, हिरोजी ईंदुलकरांनी याच्या उभारणीत आपल्या ज्ञान, कौशल्य आणि अनुभवाचं सारसर्वस्वच नव्हे तर थेट आत्माच अोतलेला दिसून येतो. उगाच राजधानीचा कोट म्हणून अगडबंब पसारा अशी त्याची बांधणी नाही. तर फार सखोल विचाराअंती हे बांधकाम आणि विलक्षण मोहक अशी रचना केलेली आहे. खरं तर रायगडाचं स्थापत्य हा एक स्वतंत्र अभ्यासाचा गहन विषयच आहे. पण ते अजब-गजब वास्तू अंगावर घ्यायची कुवत मात्र हवीच हवी.

अस्सं रांगडं, देखणं अन् भव्यदिव्य महाद्वार भारतातच काय तर जगाच्या पाठीवर कोणत्याही डोंगरी किल्ल्याला निश्चितच नसेल. सन १८१८ च्या आसपास महाराष्ट्र काबिज करतांना अनेक डोंगरी गडकोटांना इंग्रजांचा सुरूंगरुपी नाग डसला. त्या विखारी दंशाने अनेक देखण्या गडांच्या वाटा-वास्तुंनी दम तोडला. पण रायगडाच्या या बळीवंत, लढवय्या महाद्वारापुढे तर त्या परकिय नागाचाही फणा नतमस्तक झाला असणार... भव्यतेचे भोक्ते असणारे इंग्रज याचा बेसुमार आवाका पाहुन अवाकच झाले असतील. आणि म्हणूनच याला हात लावायची त्यांची छाती झाली नाही... किंवा छत्रपतींनी उभारलेल्या अशा देखण्या वास्तुमंदिराचा विध्वंस करायला त्यांचंही मन धजावलं नसेल. आमच्या महान राजाची किरत आहेच तशी मोठी.

इथं आलं कि गड चढून आल्याच्या समाधानाने अंगचा रोम रोम पुलकित होऊन उठतो... हे समाधान रोप वेने आलेल्यांना मात्र लाभत नाही. एखाद्या मंदिरात मागल्या दाराने किंवा चोरपावलाने आलेल्यांसारखीच त्यांची अवस्था असते... आजारी, हतबल, वृद्ध, महिला आणि मुलांना वगळले तरी हट्टेकट्टे पुरुष अन् आजच्या तरुण समजणा-या मंडळींना रोपवेने वर येताना पाहुन त्यांच्या तारुण्याची किव आल्याशिवाय रहात नाही. सांगणं एवढंच कि रणमर्दांचा रायगड पहायला मर्दानी वाटेनेच यावं, असं मागल्या दाराने प्रवेश करायला आपण का बाजारबुणगे आहोत ? 

रोपवेचा एक किस्सा सहजच आठवला म्हणुन नमुद करतो. आमचा मोठा मुलगा कु. आदित्य जेमतेम चार महिन्यांचा असतांना त्याला शिवसमाधीवर घालायला न्यायचं ठरवलं. घरातुन फार कोलाहल झाला. पण मागं हटलो नाही, कि विचारही बदलला नाही. 

पत्नी सरिताला याबाबत विचारलं तर ती एका पायावर तयार. सिझेरियन झालेल्या परिस्थितीत ही आमची सईबाई (तिचं जन्मनांव खरंच सईबाई आहे ) चार महिन्यांच्या तान्ह्या लेकराला उराशी कवटाळून उभा रायगड, कसलीही सबब न सांगता चढून गेली. मी रोपवेचा पर्याय विचारला तर म्हणाली "अजून इतके काही वाईट दिवस आले नाहीत माझे. तुम्हांला जायचंय तर जा रोपवेने मी व माझा लेक, राजांच्या अन् त्यांच्या रायगडाच्या दर्शनाला गड चढुनच जाणार". यावर मी काय बोलणार? हि सारी किमया त्या थोर राजाची आणि जीवही अोवाळुन टाकावा अशा दुर्गदुर्गेश्वराची... असो...

महाद्वाराशी काही वेळ विसावल्यानंतर गडात प्रवेश करण्यास सज्ज झालो. प्रवेशद्वारी नव्यानेच बसवलेला अप्रतिम रणमस्त कलाकारीचा भव्य लाकडी दरवाजा पाहून खुप आनंद झाला. अगदी शिवकालानुरुप बनवलेला हा दरवाजा महाद्वाराच्या वैभवात चांगलीच भर घालणारा आहे. यापुढे गडाचे दरवाजे सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळेनुसार आणि शिवकालीन प्रथेनुसार उघड-बंद होणार असं दिसतंय. आता गडावर कधीही येण्या-जाण्याची आपली राजेशाही मिजास बंद होणार याचं मात्र भारी दुःख झालं. 

महाद्वार भेटीचा कौतुकसमारंभ आवरेपर्यंत रात्रीचे अकरा वाजत आले होते. दाट धुकं, झिरमिर पाऊस आणि गच्च काळोखाने इथं आमची चांगलीच फिरकी घ्यायला सुरुवात केली. फक्त पायाखालच्या वाटेशिवाय काहीच नजरेत येत नव्हतं. गडावर लागलेले दिवे धुकंभरल्या काळोखामुळे खुपच लांबवर लागल्याचे भासत होते.
शेवटी धुकं आणि काळोखात चाचपडत का होईना महत्प्रयत्नानंतर एकदाची आमची स्वारी गडावर दाखल झाली. जिल्हा परिषदेच्या निवासस्थानांजवळ मोठी लगबग उडाल्याचं दिसून आलं. श्रीशिवराज्याभिषेक समितीतर्फे दरसालाप्रमाणे गडावर आलेल्या शिवभक्तांच्या दोन दिवसांच्या पोटापाण्याची सोय लावली जात होती. रात्रभर गडावर येत असलेल्या आणि दुसऱ्या दिवशी मुख्य सोहळ्यात सामील होणाऱ्या शेकडो मावळ्यांच्या भोजनाची सोय करणाऱ्या या समितीचं करावं तेवढं कौतुक कमीच होईल. यंदाच्या वर्षी तर दादर, मुंबई येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाने देखील या समितीच्या कार्यात मोठा हातभार लावून आपले भरीव योगदान दिले होते. 

गडावर आल्यानंतर शिवप्रेमींच्या भेटीगाठी आणि विचारपूस करण्यात मध्यरात्र कधी झाली ते कळलंच नाही. ऐवढ्या रात्रीसुद्धा अाल्या-आल्या मला गड पहायची इच्छा होती. म्हणून लगोलग पोटात गरमागरम पुलाव्याचे चार घास झटापटीने कोंबले. सोबतच्या गड्यांनीही गडफेरीच्या प्रस्तावाला लगेच मान्यता दिल्याने तडक निघालो. तेंव्हा पावसाचा मंदगतीने शिडकावा सुरूच होता. 

झेडपीच्या निवासापासून पासून वर चढत शिर्काईचं छान सजवलेलं राऊळ उजवीकडे ठेवत होळीचा माळ गाठला. आमच्यासारखेच काही निशाचर मावळे त्या माळावर मौजेत भटकताना दिसले. तर काहीजण माळावरील शिवछत्रपतींच्या पुतळ्याजवळ होते. गडाचेच नाही तर तमाम स्वराज्याचे धनी असलेल्या शिवछत्रपतींच्या पुतळ्याला अशा उघड्या बोडक्या माळावर दिलेली हि जागा मनाला नेहमीच सलते. वेळ पडल्यास जन्मदात्यालाही घराबाहेरचा रस्ता दाखवतील अशांकडून अपेक्षा ती काय ठेवायची ?
शिवप्रतिमेची ती जागा कशीही असली तरी पण राजांचा हा पुतळा मात्र केवळ सुखद, अवर्णनीय असा आहे. हा पुतळा त्या माळावर चैतन्य आणतो. तिथल्या सा-या आसमंतात जान आणतो. या सर्वांगसुंदर शिवपुतळ्यामुळे तो उजाड, वैराण होळीचा माळ मात्र पावन होऊन गेला.

त्या पुतळ्याचा महिमा काय वर्णावा ? त्यातील शिवरायांची भेदक नजर आरपार जाऊन समोरच्या बाजारपेठेतून पलिकडील गगनचुंबी पर्वतशिखरांवर फिरुन घे-यातील रहाळाचा अदमास घेत असते. त्याचवेळी नजरेच्या टप्प्यात येणाऱ्या काळनदीच्या खो-यातील कोकणदिवा, लिंगाणा, बाजारपेठेच्या पलीकडे दिसणारा गडदेव जगदीश्वर अन् त्याही पलीकडुन साद घालणा-या जिवासखा राजगड-तोरण्यावरही महाराज नजर फिरवतसत कि काय ? असं वेड लावणारं दृश्य इथं दिसतं.

तेथून सरळ निघालो तो नगारखान्यासमोर येऊन थबकलो. अहाहा... काय तो थाट न् काय ती अदब ? अख्खा नगारखाना कसा नखशिखान्त नवरदेवासारखाच सजलेला होता. अन् का सजु नये त्यानं ? या राज्याभिषेक सोहळ्याचा तोच तर खरा यजमान होता. प्रत्येक खाशा स्वाऱ्याच नाही तर आलेल्या प्रत्येक आम आदमीचंही स्वागत तो तितक्याच अगत्याने करीत होता. नगारखान्याचा कोपरा न् कोपरा रंगबिरंग्या फुलमाळा न् रांगोळ्यांनी सुशोभित झाला होता. आत येणारा प्रत्येकजण नगारखान्याच्या पायरीला वंदन करूनच प्रवेशत होता. आत पहारेकऱ्यांच्या देवडीत काही जण मावळ्यांच्या वेशात आगत-स्वागत करतांना दिसले. सारं काही कसं शानदार न् जानदार वाटत होतं.

आस्ते-आस्ते नागारखान्यातुन मोठ्या अदबीनं राजसदरेच्या अंतर्भागात प्रवेश करते झालो. आतील दृश्य पाहुन तर खरोखर स्तिमितच होऊन गेलो. शिवभक्तांच्या या आनंदसोहळ्यात पावसाचं विघ्न येऊ नये म्हणून इतक्या अवाढव्य सदरेवर मंडप घालुन सदरेला चांगलीच शोभा आणली होती. त्या मंडपाखाली जमिनीवर अंथरलेल्या आच्छादनावर भक्तगण बैठक घालुन बसले होते. हजारोंचा समुदाय शिस्तबद्धरित्या बसून अशा मध्यरात्रीला शिवचरित्राख्यानाचा आनंद घेतांना पाहुन अंगावर रोमांच उठल्याशिवाय राहतील काय ? 

राजसभेच्या मधोमध शिस्तबद्धरित्या मोकळ्या सोडलेल्या मार्गिकेतुन तसेच पुढे जात थेट सिंहासनाच्या चौथ-याजवळ आलो. अशा मध्यरात्री तो चौथरा सोन्यासारखा झळकायचाच काय तो बाकी राहिला होता. आणि झळकायला तो दिसायला तर हवा ना ? अनाम सजावटकारांनी त्याला सजवतांना कसलीही उणीव म्हणून  सोडली नव्हती. 

एखाद्या स्वर्गीय राजसभेतच आल्यासारखे वाटत होते. चौथ-याच्या खालच्या मोकळ्या जागेत आमच्या पंकज भोसलेच्या शिवमय कुटुंबसदस्यांनी कवीराज भुषणरचित खड्या बोलीतलं अप्रतिम शिवाख्यान चालु ठेवले होते. आणि सदरेत जमलेल्या शेकडो शिवभक्तांकडुन अगदी शांत चित्ताने ते श्रवण केले जात होते. आणि विशेष म्हणजे बाहेर पावसाच्या मंदशा रिपरिपीनेही त्यावर मस्त ताल धरला होता. 

चौथ-याच्या वरच्या भागात सिंहासनाधीश्वर शिवछत्रपतींचा विरासनातील पुतळा विराजला होता. त्यांच्या बैठकीसाठी उभारलेल्या राजमंदिराचं तर पुष्पमंदिरातच रुपांतर झालं होतं. कसलेल्या कसबी कलावंतांनी अवर्णनीय अशी पुष्परचना करुन रंगांची मस्त उधळण केली होती. त्या मखरात विसावलेला आमचा दिगंत कीर्तीचा, फुलांइतक्याच कोमल हृदयाचा दिगंत किर्तीचा आमचा राजा समोर जमलेल्या रयतेकडे अभिमानाने पहात असल्याचे ते दृश्य नजर लागेल असंच होतं. 

आंम्हां दोघांना आता, मोटारसायकलवरुन मुंबई सोडल्यापासून आता सुमारे १७ तास उलटून गेले होते. शरीरातला विश्रांतीचा अलार्म घणघणायला केंव्हाच सुरुवात झाली होती. तरी राजसदरेवरच्या त्या भारलेल्या वातावरणातून निघायला मन  काही तयार होत नव्हतं. त्याला कसंबसं बाबापुता करुन, समजूत काढून एमटीडीसीच्या विश्रामस्थळावर आणलं. आणि काही वेळासाठी का होईना थकल्या शरीराला विश्रांती दिली. 

दुस-या दिवशी मात्र पक्ष्यांच्या गुंजारवाने भल्या पहाटे रामप्रहरीच तयार होऊन पुन्हा एकदा जोरदार उत्साहातच बाहेर पडलो. होळीचा माळ, नगारखाना व राजसदरेवर जनसागराचं उधाण आलं होतं. सारा आसमंत श्रीशिवघोषाच्या नादानं दुमदुमत होता. छत्रपतींच्या वैशिष्टयपूर्ण बिरुदावल्या ऐकून शरीराचा रोम-रोम सुखाऊन जात होता. 

राज्याभिषेकाच्या समंत्र विधीकरीता अनेक ठिकाणाहुन आलेल्या ब्रम्हवृंदांच्या पवित्र मंत्रोच्चारणाने तेथील वातावरण भारुन गेलं होतं. कोल्हापुरच्या राजघराण्यातील वंशज असलेल्या  राजे यांचे हस्ते तेथे वेगवेगळ्या धार्मिक विधींकरीता मांडलेल्या धातुच्या पुतळ्यावर राज्याभिषेकाच्या मंत्रविधींचा शुभारंभ झाला. 

गडावरील गंगासागराच्या परम पावन जळाभिषेकाबरोबरच दह्या-दुधाची स्नानादि विधिही आमंत्रण सुरू होते. अनेकप्रकारचे गंध, चंदनादि लेप आणि अत्तरांच्या परिमळाने तर सारी राजसभाच सुगंधित होऊन गेली होती. राजांच्या सेवेतील ब्रम्हवृंदांची लगबग पाहण्यासारखी होती. त्याचवेळी सदरेवर काही तरुण मावळ्यांच्या वेशात तेथे अदबशीरपणे उभे राहून आपली दरबारी सेवा बजावत होते. करारी चेहरा, पिळदार मिशा, बाराबंद्यांची बंधन तटतटतील अशा मर्दानी छात्यांचे ते वीर मावळे पाहुन आपण खरंच शिवकालात तर नाहि ना आलो ? असंच वाटून गेलं.

तिकडे होळीच्या माळावर तर आणखी मोठा जल्लोष सुरु होता. अनेक ठिकाणच्या ढोल पथकांंमार्फत आपापल्या कलेचा नजराणा शिवचरणी सादर करण्यासाठी चुरशीची चढाओढच सुरु केली होती. त्या ढोलांचा एक अपुर्व असा नाद त्या माळावर अवतरला होता. त्याच तालावर काही शिवकालीन शस्त्रपारंगत मंडळींनी उपस्थितांसमोर तलवार, भाले, दांडपट्टयांचे हात दाखवून डोळ्यांचे पारणे फेडले. आजच्या मिसाईल युगातही या पुराणकालीन शस्त्रांवरली त्यांची पकड आणि कौशल्य जबरदस्त होते. विविध प्राचिन हत्यारांनी त्या मावळ्यांकडुन दाखविण्यात आलेली ती प्रात्यक्षिकं डोळ्यांच्या पापण्या लवु देत नव्हती. आज राजे असते तर नक्कीच त्यांच्यावर सोनमोहरांची तुफान उधळण झाली असती. 

असा सगळा अानंदसोहळा होळीच्या माळावर सुरु असतांनाच, राजसदरेवरील अभिषेकाचा सोहळा संपन्न होऊन शंख, कर्णे, तुता-यांच्या नादात महाराजांची पालखी गडदेवतांच्या दर्शनाला निघाल्याची इशारत झाली. सारा सारा जनसमुदाय त्या अपूर्व अशा पालखीसोहळ्यात सामील झाला होता. श्रीजगदीश्वराच्या मंदिराकडे निघालेला  तो रयतेचा सागर पाहून चंद्रभागेच्या वाळवंटी तीरावर जमलेल्या भागवत भक्तांच्या महामेळ्याचीच आठवण होत होती...    

श्रीशिवरायांना "पृथ्वीतलावरील सर्वश्रेष्ठ राजा" असं संबोधलं जातं तर शिवराज्याभिषेक हि जगाच्या मानवी इतिहासातली एक महान घटना मानली जाते. आणि अशा विश्वविख्यात सोहळ्याच्या समारोपप्रसंगी जयजयकारी आरोळ्यांच्या आनंदसोहळ्यात नखशिखांत डुंबून गेलेला दुर्गदुर्गेश्वर रायगड पाहणं हे तर अापल्या आयुष्यातील अत्यंत समृद्ध क्षण म्हणून कायमचे नोंदले गेले. 

कदाचित आपल्या लाडक्या पुत्राला, सह्याद्रीची किर्त जगात गाजवणा-या छाव्याला, अभिषिक्त महाराजा झाल्याचा हा सोहळा पाहिल्यानंतर आता काहीही पाहू नये असंच झालं असेल... आणि म्हणुनच जिजाऊ माँसाहेबांनी अवघ्या १२व्या दिवशीच अत्यंत कृतार्थ आणि भरल्या मनाने इहलोकाचा निरोप घेतला असावा.

देवांनीही हेवा करावा असं स्वराज्यच नाहि तर सुराज्य घडवलेल्या, जगाच्या इतिहासातला सर्वश्रेष्ठ आणि रयतेचा राजा अशी दिगंत कीर्ती लाभलेल्या शिवछत्रपतींना राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त मानाचा त्रिवार मुजरा... 




२२ तासांचा हिमथरार. . .

स्वातंत्र्यवीर  सावरकर जयंती
                                                                                                           दिनांक  २८ मे  २०१८.

स्थळ  - स्वा. सावरकर  राष्ट्रीय  स्मारक,  दादर,  मुंबई . 


         २२ तासांचा हिमथरार... 


१९९७ साली हिमालयाचं प्रथमच दर्शन घेतलं. तेंव्हापासुन आजपावेतो माझ्यावर याचं हुकमी गारुड तस्संच कायम आहे. त्याचा अादेश आला कि अक्षरशः राहवत नाही. आजही अगदी झपाटल्यासारखाच त्याच्या अंतरंगी हरवून जायला तडफेने निघतो.

२०१४ च्या अाॅगस्टमध्ये अशीच त्याच्या भेटीची इच्छा अनावर झाली अन् तितक्यात "माऊंट नुन" या जगप्रसिद्ध हिमशिखरावरील चढाई मोहीमेची संधी देखील चालून आली. असा मस्त, फक्कड बेत जुळून आल्याने अजिबात दिरंगाई न करता मोहिमेत दाखल झालो.

मा. नूनच्या Camp I वर पोहोचण्यापूर्वी प्रचंड Icewall वर  करावी लागणारी जीवतोड मेहनत

लडाख हा जम्मु-कश्मीरचा अतिदुर्गम भाग. भारतीय सेनेच्या अद्वितीय पराक्रमाने पावन झालेल्या कारगीलपासुन नजीकच्या "सुरू" खो-यातील माऊंट नुन हे एक बेलाग हिमशिखर. ७,१३५ मी./२३,४०० फुट उंचीचा हा अत्त्युच्च पर्वत आरोहणाच्या दृष्टीने अतिकठिणच्याही वरच्या श्रेणीचा असल्याने देश- विदेशातील साहसी गिर्यारोहकांच्या नेहमीच पसंतीचा असतो.

गिर्यारोहणातील एकापेक्षा एक खडतर आव्हानांनी अगदी ठासून भरलेला मा. नुन, वेळ पडल्यास पट्टीच्या आरोहकाला भर बर्फातही घाम फोडतो. अटीतटीच्या प्रसंगी तर प्राणही कंठाशी आणतो.

तर अशा मा. नुनवरील आमच्या घनघोर चढाईचा शेवटचा अंक सुरू झाला होता. प्रगत तळशिबीरापासून ताज्या दमाने सुमारे हजारेक फुटांची ६० ते ७५ अंशाची खडी बर्फभिंत आम्ही सहज चढून गेलो. आणि वरच्या टप्प्यातील विशाल हिमनदीवर शिबीर क्र. १ उभारले. ईथून संपूर्ण नून दृष्टीपथात येत होता. आमची टिम चांगल्या दमसासाची होती आणि २-३ दिवसांचे खराब हवामान, थोडा टाईमपास यांमुळे खालच्या शिबीरांवर विश्रांतीचा रतीब जरा जास्तच झाला होता. त्यामुळे वरच्या शिबीरांवर लोड फेऱ्या न करताच थोड्याशा पारंपारिक आणि काहिशा अल्पाईन अशा हायब्रिड स्टाईलने डायरेक्ट अटॅकची एक संमिश्र योजना आकाराला आली. या जलद चढाईच्या योजनेमुळे उगाच पकपक करून डोक्याचं कडबोळं करणारे हरयाणाचे दोन नको असलेले मोहरे आपोआपच गळाले.

चढाईतलं अप्रतिम कसब दाखवत एका अणकुचीदार सुळक्याच्या माथ्यावर फक्त २ टेंट राहतील इतक्या धोकादायक जागेत उभारलेला कँप २ आम्ही पहाटेच्या भयंकर गारठयात सोडला. पुढे तर त्याहूनही खतरनाक बर्फ उतारावर शेवटचा कँप ३ उभारला. इथून त्याच रात्री अंतिम टप्प्याची चढाई करून पहाटेपर्यंत कोणत्याही परिस्थितीत शिखरमाथा गाठण्याचा अामचा मनसुबा होता. थोडक्यात काय तर खुशीतली गाजरं खाण्याचा अंक सुरु झाला होता.

मा. नूनच्या अगदी पायथ्याचा कँप-१ 

तांत्रिक दृष्टया कुशल आरोहणाची सर्व शस्त्रास्त्रं परजुनच आम्ही मैदानात उतरल्यामुळे तयारी तर जय्यत होती. नुन सारख्या नामांकित, अतिकठिण श्रेणीच्या शिखरावरील या मोहीमेत आत्तापर्यंत सर्वकाही सुरळीत झालं. बस्स... आता मध्यरात्री अंतिम चढाईसाठी निघायचं या विचाराने थकल्या गात्रांनाही चेव चढला होता. इतक्यात हिमालयात सर्वात महत्त्वाचा रोल निभावणा-या हवामानाने नेमक्या वेळी आमची साथ सोडली. एखाद्या फितुराप्रमाणे त्याने आमच्याविरुद्ध उभा दावा मांडला. अन् मिट्ट काळोख्या रात्री त्याची वेगळीच खेळी सुरु झाली. ती पूर्ण रात्र अन् २रा संपूर्ण दिवस प्रतिकूल हवामानाशी झोंब्या घेण्यात गेला.

या अनपेक्षित तांडवामुळे, आमच्या अगदी पुढ्यात शांतपणे पहुडलेल्या यशाकडे आशाळभुतपणे पाहण्याशिवाय आम्ही काहीच करू शकत नव्हतो. ललचावल्या नजरेने आम्ही पुढ्यात पहुडलेल्या यशाकडे पहात होतो... पण त्याचवेळी शिका-याचीच शिकार करण्यासाठी कोणीतरी दबा धरुन बसलेलं होतं याची आंम्हांला कल्पनाच नव्हती.

Camp I गाठल्यानंतर आनंद व्यक्त करताना ... पृष्ठभागी जगप्रसिद्ध हिमशिखरे मा. नून आणि मा. कुन ... 

जराही उसंत न देता वादळवारा रात्रंदिवस भरारत राहिला.  चारी बाजूंनी गरजणा-या वादळाने खिंडीत गाठुन आमची पूर्ण नाकेबंदी केली. तिस-या दिवशी मात्र मोहीम, शिखर, चढाईचा विचार दुर ठेवून शिबीर क्र. ३ वरील २१,५०० फुटांवरील त्या भयाण परिस्थितीत जीव वाचवण्याची आमची धडपड सुरू झाली. वादळी वा-याचा जोरच इतका होता कि आमचे टेंट आमच्या सहित उडणार तर नाहीत ना? या भीतीमुळे, दिवसाच नाही तर रात्री झोपताना देखील आम्ही पूर्ण तयारीनिशी, अगदी बर्फातील चढाईचे बुट देखील पायात चढवूनच होतो. सरतेशेवटी सर्वात अनुभवी सदस्य म्हणून मोहिमेबाबत निर्णायक मताची मागणी सर्वानुमते माझ्याकडे करण्यात अाली. माझ्याकडे तर भरपुर रजा शिल्लक असल्याने मला ती मोहिम अर्ध्यावर सोडणं तर जीवावरच आलं होतं... पण एकंदर सर्व बाबींचा सर्वंकष विचार करता ती मोहीम गुंडाळण्याचा कटु निर्णय  मलाच घ्यावा लागला. तो पर्वत तेथून अजिबात हलणार नव्हता, पण अाम्ही जगलो वाचलो तर पुन्हा येऊ अशा संपूर्ण सकारात्मक विचाराने यशस्वी माघारीचा निर्णय झाला.

हाता - तोंडाशी आलेला घास सोडताना ... जीवावर आले होते... पण जीव वाचल्याचे समाधान त्याहून मोठे होते...

चौथ्या दिवशी सकाळी उशिरा हवा थोडी पडल्याचे पाहून "जान बची तो लाखो पाये" म्हणत अगदी दाट धुक्यातच तो भया-भया पर्वत अगदी सावधपणे उतरायला घेतला. ग्लेशियरवरील सुरक्षीत टप्प्यावर येई पर्यंत कसलीच शाश्वती नव्हती. त्या दिवशी कसे बसे बेसकँपवर पोहोचून सुटकेचा एक भला, थोरला नि:श्वास टाकला. फार हायसं वाटलं.

मा. नून वरील हिमवादळाला तोंड देत परतीच्या वाटेवरील... Camp II गाठला... 

अचानक घोंघावत आलेल्या बदनाम हिमालयीन वादळाने आमच्या हाताशी आलेलं एक उत्तुंग यश अगदी सहज हिसकाऊन, अोरबाडून नेलं. मनातुन सर्वजण नाराज असलो तरी एका भयकांडातुन सदेह आणि सजीव परतण्याचं मोठ्ठं समाधान घेऊन परतीच्या मार्गावरील कारगील लगोलग गाठलं. नुनवर तडफेने लढलेली माझी थकली-भागली टीम तेथून अापापल्या घरट्यांकडे भुर्रकन उडून गेली.

मा. नून वर प्राणपणाने लढलेली टीम.... तंगोल गावातील रेस्ट हाऊसमधील वास्तव्यादरम्यान

माझी रजा अन् अंगातली मस्ती अद्याप पुरेशी जिरली नव्हती. त्यामुळे ... आणि अशा रीतिने माघारी फिरणं माझ्या पचनीही पडत नव्हतं. भरपुर विचाराअंती, काहीच नाही तर निदान लेह तरी भटकून घेऊ या विचाराने मी पीछेमुड करून मुंबई ऐवजी भटक्यांची पंढरी अर्थात लेहची वाट धरली.

कारगील ते लेह या सुमारे ८ तासांच्या गाडीप्रवासानंतर लेहमधे पाय ठेवताच भयंकर गारठयाने अगदी झोंबतच स्वागत केलं. उत्तम बोलबच्चनगीरीने कमी खर्चात एका   ब-यापैकी होमस्टेची सोय असलेल्या आतिशा या लाॅजवर मी बस्तान मांडले. दुस-या दिवशी सक्काळीच लेहमधील इंडियन माऊंटेनिअरिंग फाऊंडेशन अर्थात IMF चे कार्यालय गाठले. तेथे भारतीय गिर्यारोहणातील एक नामी हस्ती श्री. सोनाम वंग्याल यांची भेट झाली. १९६५ च्या पहिल्या यशस्वी भारतीय एव्हरेस्ट वीरांपेकी एक असलेले श्री. वंग्याल लेहमध्ये IMF चे प्रतिनिधी म्हणून कार्यरत होते.

हिरो आॅफ लडाख सोनाम वंग्याल यांच्या कार्यालयातील भेटीदरम्यान...

मी नुकताच मा. नुन मोहीमेहुन परतलो असुन मला लेहमधील मा. स्तोक कांग्री हे ६१२३ मीटर उंचीचे हिमशिखर सर करण्याची इच्छा आहे असे सांगताच त्यांनी १ कडक चहा देऊन अगदी आपुलकिने माझी विचारपूस केली. गप्पांच्या दरम्यान स्तोक कांग्रीवर मला एकट्यानेच जायचंय या माझ्या हट्टामुळे त्यांनी माझी सखोल चौकशी केली. अर्ध्या हळकुंडाने पिवळा झालेलो नाही याची खात्री पटल्यावरच मला त्यांनी IMF ची मंजुरी दिली. तसेच
मा. स्तोक कांग्री शिखराबाबत अत्यंत मोलाची सविस्तर माहिती आणि कच्चा रुटमॅप एका कागदावर काढून देऊन मला खुपशा शुभेच्छाही दिल्या.

गजबजलेल्या लेहमध्ये मी मात्र एकटा जीव सदाशिव होतो. अाणि माझी मोहीम सुद्धा एकल प्रकारची होती. मला अशा मोहीमांची सवय होती अशातला भाग नाही. पण हिमालयीन गिर्यारोहणाचे ४ खडतर प्रशिक्षण अभ्यासक्रम आणि हिमालयातील १०-१२ मोहिमांच्या अनुभवानंतर असा एखादा अनुभव मला नक्कीच हवा होता. आणि ही अगदीच एकल म्हणावी अशीही मोहीम नव्हती. इथं फक्त सोबतीला माझ्या अोळखीचं, अडचणीत मदतीला उभं राहणारं, काही दुखलं-खुपलं तर मायेने जवळ घेऊन दवापाणी करणारं कोणीही नव्हतं. गेलाबाजार मुंबई-महाराष्ट्रातलंही इथं कोणी नव्हतं. अशा परिस्थितीत मला मा. स्तोकचं आव्हान पेलायची वाढीव खुमखुमी अाली होती इतकंच.

एका स्वच्छ, निरभ्र सकाळी मला एकट्याला आरामात झेपेल इतकीच सॅक घेऊन मी सकाळी ९ वा. टॅक्सीने लेह सोडलं. निश्चित असं काहीच ठरवलं नव्हतं. अन् ३०-४० मिनिटातच स्तोक गावात येऊन थबकलो. टॅक्सीवाल्या जाकिरशी तेवढ्या कमी वेळेतही चांगला मेळ जमल्याने त्याला आग्रह करून एक मस्त चहा पाजला. तेथे काही स्थानिक गाईड मंडळी, विदेशी पथकांचे सामान घोड्यांवर लादून स्तोक मोहीमेकरीता निघण्याच्या तयारीत दिसले. त्यांच्याकडुन पुढील वाटेची, अडी-अचणींची माहिती घेऊन माझी पायगाडी चालू केली. ती माणसे चांगली होती. मला एकट्याला पाहुन त्यांना आश्चर्य वाटल्याने त्यांनी मला तासभर थांबून त्यांच्या सोबत निघण्यास सांगितलं. पण खरं तर मलाच सोबत नको असल्याने त्यांनी दाखवलेल्या आपुलकीबद्धल आभार मानून मी माझ्याच मस्तीत पुढे निघालो.

स्तोक गावातील नदीपात्राशेजारची, धुळभरली, खाचा खळग्यांची, दगडगोट्यांची पण तरीही मस्त अशी वाट. सकाळच्या दहाचा सुमार, अगदीच कोवळ्या उन्हातली सोनकिरणे, स्वच्छ हवामानातला मंद, हवाहवासा गारवा अन् अंतर्बाह्य उत्तेजित करणारं आल्हाददायक वातावरण. पहिल्या तासाभरात एक छोटासा थांबा घेऊन फ्रेश झालो. अन् दुस-या तासाला थेट चांगमा गाठलं.

स्तोक सोडल्यानंतर या मार्गावर पहिलं ठिकाण लागतं ते हे चांगमा. येथे वस्ती नाही. फक्त १ टपरीवजा कॅन्टीनचं खोपटं. त्यात चहा, मॅगी व बिस्किटे मिळायची सोय होती. मग क्काय १ मोठा मग भरुन आवडत्या काळ्या चहाशी खारी बिस्किटं घेऊनच मार्गस्थ झालो. पण माझं असं चहा घेऊन गरमा-गरम होणं कोणालातरी बघवलं गेलं नाही. अन् भर दुपारच्या उन्हात अचानकच हिमवर्षावास सुरूवात झाली. मी देखील त्याला न जुमानता तसाच बेगुमान चालत राहिलो. मी थांबत नाही हे बघून काही वेळाने तोच थांबला. अन् मला मात्र चांगलंच हसू आलं.

चांगमा पासुन वाट आणखी मस्त झाली. दोन्ही बाजूंनी लडाखचं वैशिष्ट्य असलेल्या रंगबिरंग्या ताशीव कडयांची तटबंदी अन् मधोमध वाहणाऱ्या लहान-मोठया ओहोळ-धारांची संगत. असे सुमारे पुढील २ तास मजेमजेत चालत मी मनकर्मो येथे येऊन पोहोचलो. या वाटेवरचा हा महत्त्वाचा टप्पा. उंची सुमारे ४५०० मीटर. येथे तंबू निवासाची रेडीमेड सोय आहे. पुढील अतिउंचीवरील हवामानात रुळण्याकरीता इथे १ मुक्काम करणं अनिवार्य अाहे. पण मला यावेळी हा नियम लागु नव्हता. कारण इथे येण्यापुर्वी मी २१,५०० फुटांवर अत्यंत बिघडलेल्या हवामानात काही दिवस चांगलीच झुंज देऊन अाल्यामुळे अतिउंचीवरील हवामानाला मी सरावूनच आलो होतो.

मनकर्मोला मी माझ्याजवळचा सुकामेवा, भरपूर पाणी अन् काळा चहा घेतला. घड्याळाने दुपारचे २ वाजून गेल्याचे बजावले. थोडा सुस्तावल्याने पाय निघत नव्हता. पण रेंगाळणेही परवडणारे नव्हते. तेथे टाईमपास करायचा मोह अावरुन मी पायगाडी पुढे दामटवली. इथून बेस कँपचे अंतर फार नव्हते. पण वाट चढणीची आणि दमछाक करणारी होती. आता थकवाही जाणवू लागल्याने माझा वेग आपोआपच मंदावला. पुढील २ तासांत हळूहळू का होईना सांजावण्याआधीच मी बेस कँपवर दाखल झालो.

बेस कँप म्हणजे चक्क ५००० मीटर उंचीवरील वाळूचं एक विस्तीर्ण मैदान होतं. इथेही व्यावसायिक तत्वावर रंगीबेरंगी तंबूंची जत्रा उभारली होती. मी खुप थकलेला असल्याने भाड्याच्या तंबूची चौकशी करण्यासाठी एका मोठया पसरट तंबूत डोकावलो तर ते तंबूहा‌ॅटेल असल्याचे दिसले. २ कळ्ळकट्ट स्थानिक तरूण ते चालवत होते. त्यातील एका मनकवड्याने मी आत शिरताच वाफाळत्या ब्लॅक टीचा मगच माझ्या हातात ठेवला. मग काय? कळकट-मळकट असला तरी तो चहा देणारा त्या क्षणाला माझ्यासाठी देवदूतच होता. अन् तो भरपूर चहा तर त्यावेळी मला जबर ताकद देऊन गेला.

लेह सोडल्यानंतर इथे पोहोचायला खाद्या सुदृढ व्यक्तीला किमान २ ते ३ दिवस सहज लागू शकतात. आणि मी मात्र सकाळचा चहा लेहमधे घेऊन सायंकाळच्या चहाला स्तोक कांग्रीच्या बेस कँपवर हजर होतो. याला "ग्रँड मस्ती" शिवाय काहीही म्हणता येणार नाही.

इतक्या कमी वेळेत बेसकँप गाठण्याची कसरत केल्यामुळे अंगातला इंच न इंच भाग रस-रसुन आला होता. शरीरातील एकूण एक स्पेअर पार्टस् ढीलावले होते. तिथल्या वाढत्या गारठ्यात थकवाही कमालीचा वाढत होता. पण मला गळपाटुन जमणार नव्हतं. किमान स्वतःची काळजी घेण्यासाठी तरी मला खंबीरपणे उभारणं गरजेचं होतं. चहाने आलेल्या तरतरीने लगेच पुढची अाखणी करून घेतली. अचानक आलेल्या सुमारे शे-दिडशे विदेशी पाहुण्यांच्या एका मोठ्या गटामुळे तिथल्या उपलब्ध साधनसामुग्रीवर जबर ताण आला होता. याचं पर्यवसान म्हणून  त्या जीवघेण्या गारठ्यात माझ्या वाट्याला नेमका फाटका तंबू अाला. पण मी इथं मजेमजेत तंबूतली रात्र काढायला आलो नव्हतो. माझं ध्येय अन् माझं आकाश मात्र वेगळं होतं.

गारठयाचा आणि एकंदर परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी पध्दतशीर जामानिमा करुन बेस कँपच्या तंबूजत्रेत एक फेरफटका मारला. त्यामुळे सडकून भूक लागल्याने तस्साच त्या विशालकाय तंबू हाॅटेलात शिरलो. तो तंबू हाॅटेलवाला मनकवडाच असावा. मला पाहताच त्याने इशारा केला. त्याची आज्ञा शिरसावंद्य मानून लगेच बैठकिवर फतकल मारली. पुढयातील गरमागरम टोमॅटो सुप आणि डाळभाताची मऊशार रेशमी खिचडी मी अक्षरशः मनसोक्त ओरपली. मी पूर्णपणे शाकाहारी असल्याने माझ्यासाठी त्या उंचीवर आणि प्रतिकूल परिस्थितीत तो बेत मेजवानीपेक्षाही सरस होता.

पोटोबाचा मोगँबो खुष होताच बाहेर आलो तो भयंकर गारठयामुळे तिथेच गोठतो की काय अशी अवस्था झाली. कसलाही विचार न करता तात्काळ माझा तंबु गाठला. पण या क्षणाला तोही माझ्यासारखाच फाटका. थंडी अडवण्यासाठी सॅकचा नीट आडोसा करुन घेतला. रात्रीच्या तयारीवर अन् घड्याळावर एक नजर फिरवली तर काट्यांनी ९ चा इशारा केला. ते पाहुन चुपचाप मस्त उबदार स्लिपिंग बॅगमध्ये शिरुन निद्रादेवीच्या आराधनेत व्यस्त होऊन गेलो.

मध्यरात्री उठून करावयाच्या कसरतींच्या उजळणीची  विचारचक्रं डोक्यात भयंकर वेगाने धावत होती. त्यामुळे झोप अशी लागलीच नाही. पण त्या ३ तासांत, मागील १३ तास शिणलेली पाठ सरळ करून घेतली. रात्री १२च्या आसपास मोठ्ठी गडबड एकुन बाहेर आलो तर अंधारातच अनेकांची तयारी चाललेली. काहिंनी तर पुढच्या वाटेवर रांग धरलेली. हेडटाॅर्चमुळे ते सर्व जण दूरवरुन, पतंगाला बांधलेल्या तरंगत्या दिव्यांप्रमाणे दिसत होते. फार वेळ न लावता धावतच मी किचनटेंट गाठुन माझा पॅकलंच उचलला. अर्धवट गरम चहा कसाबसा शरीरात ओतला. घाई-घाईने बाहेर येऊन सॅक पाठीवर लावत असतांनाच एका प्रेमळ आवाजाने माझं लक्ष वेधलं. तशा किट्ट अंधारातही माझ्या चेह-यावरचे गोंधळलेले भाव पाहून त्याने हातातल्या बाॅक्समधून केकचा एक भला थोरला तुकडा माझ्या हातात कोंबला. "मेरा भाई चराईके बखत पेट खाली नहीं होना चाहिये" नेकी अौर पुछ पुछ ? हा आदेश आणि तो केक हे दोन्हीही मी माझ्या पोटात लगेच कोंबले. उत्कृष्ट स्वादाच्या त्या केकसाठी त्या दिलदार शेर्पाचे आभार मानून मी लगेच वाटेला लागलो. गारठा अस्सा होता की बस्स्स... पुछोहि मत. वेगवान हालचाली करीत मी रात्री १च्या दरम्यान बेसकँप सोडला.

ग्लेशियरकडे जाणारी एक वाट सरळ बेसकँपवर उतरली असल्याने सार्यांनी तिकडेच मोर्चा वळवला होता. ते सगळे अापापल्या गाईडसह तर मी आपला "एकला चालोे रे" च्या नादात एकटाच. अर्ध्या तासातच मी ती चढणीची वाट संपवली. भराभर चढून आल्याने लगेच घामाघूम झालो. त्या टप्प्यावर बरीच मोकळी जागा होती. ते या मार्गावरील विसाव्याचं ठिकाण असावं. सर्व विदेशी मंडळींनी सोबत आणलेले गाईड त्यांची सेवा करीत होते. चहा-पाणी हवं नको पहात होते. त्यावेळी मला मात्र त्यांचा फारच हेवा वाटला.

अंधार खूपच दाट होता. पण लांब अंतरावर काही हेडटाॅर्च दिसल्याने मला पुढच्या वाटेची कल्पना आली. मी स्टार्टर मारला. मऊशार माती एवजी आता खडकाळ हिमालयीन मोरेन सुरु झालं. फार लांबवर दिसत नसल्याने जपून वाटचाल करत तासाभरात दगडखडकांचे गाव संपवून हिमनदीवरील बर्फनगरीत प्रवेश केला. तपमान शून्या- खालीच असल्यामुळे बर्फाची स्थिती उत्तम होती. पण हिमनदीचा तो भाग दगड, मातीयुक्त असल्याने चालण्या- साठी फारसा अनुकूल नव्हता. तरीही तासाभराच्या इकडम -तिकडम नंतर बर्फावरील चालही संपली. अन् खड्या चढाईवरील आरोहण सुरू झाले. हे अारोहण मात्र खरंच त्रासदायक होतं. पहाटेचे ३ वाजून गेले होते. अंधारयात्रा काही संपत नव्हती. हेडटाॅर्चच्या टिमटिमत्या उजेडातला कारभार सगळा. अचानक अंधार आणखी गडद झाला. भुरभुरता हिमवर्षावही उधाणाला आला. यालाच म्हणतात आधीच हौस आणि त्यात पाऊस.

एकतर बर्फाच्छादित खडकाळ उभा चढ. तशात त्या खडकांवर तयार झालेल्या व्हर्ग्लासने ( खडकाच्या पृष्ठभागावर तयार झालेला टणक बर्फाचा पातळ पापुद्रा)  जेरीला आणलं. अनेक विदेशी यजमानांनी त्याबाबत कुरबुरी सुरू केल्या. बर्फात वापरण्याचे विशेष बुट आणि त्यावरून घडवायचा खिळ्यांचा जोड (क्रँपाॅन्स) सर्वांकडेच नव्हते. त्यामुळे व्हर्ग्लासवरुन घसरून पडल्याने अनेकांचे खुप हाल झाले. अनेकांच्या स्नो / वाॅकिंग स्टिक्स मोडून पडल्या. तशातच बिघडलेल्या हवामानाचा नुर पाहून अनेक देशी/ विदेशी पथकांनी माघारी फिरण्यात धन्यता मानली.

मी एकटा असलो तरी माघार कधी घ्यावी याचे उत्तम भान व हिमालयातील लहरी हवामानाचा चांगला अनुभव गाठीशी होता. आणि मा. नुनवर याची रंगीत तालीम नुकतीच केली होती. सुमारे तासभर चांगलेच थैमान घालुन हवा शांत झाली. बोच-या वा-याचा सामना करतांना खूप शक्ती खर्च होते. बराच दमलो होतो. जरा बरी जागा पाहून बसकण मारली. सॅकमधून पाणी व ज्युस काढून घेतल्याने जीवात जीव आला. विदेशी लोकांबरोबर परतीचा निर्णय न घेतल्याबद्दल मी स्वतःच्या बेरडपणावर खुष होऊन शाबासकी दिली.

वातावरण काहीसे कुंद झाल्याने गारठाही कमी झाला होता. आकाशही निरभ्र झाले असावे म्हणून नजर वर केली अन् संमोहित झाल्यासारखा हरवून गेलो. नभांगणात रंगीबेरंगी टिमटिमत्या चांदणचु-याचा सडा पसरला होता. हात लांब केला की जणु मुठभर हाताशी येईल असा.

मनोवेधक  भावविश्वात हरवलेला असतानाच मी माझा विचार करू लागलो. इथं असं एकटयाने येण्याची काही गरज नसताना मी नाहक हे धाडस का करावं? अनेक जबाबदाऱ्या डोक्यावर असतानाही मी हे जे काही करतोय ते योग्य होतं कां ? एक ना अनेक प्रश्न माझ्यापुढे फेर धरून नाचू लागले. पण मीहि काही कच्च्या गुरुचा चेला नव्हतो. त्या सर्व नकारात्मक प्रश्नांचा हल्ला मी निकराने मोडून काढला. कारण अशा ठिकाणी त्यांनी माझा ताबा घेणं योग्य नव्हतं. मनात गुंतत चाललेली सर्व जळमटे झटकून दूर केली अन् भानावर येऊन पाहतो तर हवामानाचा पाठशिवणीचा खेळ सुरू झालेला. पुन्हा एकदा हवामानामुळे यश पाठ फिरवून जातं कि काय अशी परिस्थिती निर्माण झाली. पण मी डगमगणं सोडूनच दिलं होतं...

माझी लढाई अजून संपली नव्हती कारण मी अजून खंबीरपणे उभाच होतो. काहिसा, विचारतारांच्या छेड छाडीतच पण सावधपणे एका अरूंद धारेवर आलो. एकावेळी जेमतेम एकचजण तेही सावधपणेच चालू शकेल एवढीच तिची रूंदी. पलीकडे हजार फुटांचा खोल दर्रा. अंधुक धुकंभरल्या प्रकाशात निट निरखून पाहिले तर ती खडकाळ धार बरीच लांबलचक पण थेट शिखरमाथ्यावर नेऊन सोडणारी दिसली. त्या अरुंद धारेवर थोडं थांबून भरभरून घेतलेल्या काही सखोल श्वासांमुळे बरं वाटल्याने पुन्हा चढाई सुरू केली. मध्यरात्रीपासून ६ तास सतत चढाई सुरु असल्याने आता ती फार उरली नसावी असं वाटत होतं. त्याच वेळी शरीरात देखील फारसे त्राण उरले नव्हते याची पण जाणीव होत होती. जवळचे पाणीदेखील संपून गेल्याने मी नेहमीच्या सवयीने बर्फ उचलुन चघळू लागलो.

अर्ध्या - पाऊण तासांत त्या निरुंद धारेवरील सर्कस संपवुन सुमारे फुटभर खोल बर्फउतारावर येऊन पोहोचलो. उभ्या उभ्याच २ मिनिटे श्वास नीट केला. अन् जिवाच्या आकांताने सगळी शक्ती लावून त्या निसरडया मऊशार बर्फात न डगमगता बुटांवर सहज चढवण्याचे स्प्रिंगचे क्रँपाॅन्स रोवून पुन्हा थोडी उंची चढून गेलो असेन तोच काही परिचित  आवाजांमुळे मी सावध झालो. क्रँपाँनमुळे बर्फावर होणारा खर्रक खर्रक अावाज थांबवून कानोसा घेउ लागलो... अचानक मिट्ट धुक्याचे पट झरझर वितळू लागले अन् समोरचे दृश्य पाहून मला देखील जल्लोष करावासा वाटला.

२२ तासांची स्वप्नपूर्ती...
रात्री माझ्या २/३ तास आधी आरोहण सुरू केलेल्या विदेशी आरोहकांच्या तुकडीने मोहीम फत्ते करून कल्लाकारी सुरू केली होती. शिखरमाथा दिसल्यामुळे एका वेगळ्याच शक्तीने भारल्या सारखा माझाही वेग वाढला. अन् काही वेळातच मी देखील माथ्यावर होतो. थोडं हाश्श...हुश्श करुन सावरल्यावर शिखरमाथा न् परिसराच्या निरीक्षणास  सुरूवात केली.

स्तोक कांग्रीच्या त्या सर्वोच्च बिंदूवर लहान-मोठ्या दगडांची ४-५ फुट उंचीची मोठ्ठी रास रचली होती. त्यावर भुरभुरत्या बर्फाने छान सजावट केली होती. तीवर बौद्ध धर्माच्या रंगीबेरंगी ध्वज पताका, तोरणे लावून मस्तपैकी सजवलेले दिसले. वा-या -मुळे फडफडणा-या त्या धर्मपताका फुलपाखरांच्या थव्याप्रमाणे तिथल्या आनंदात भर घालत होत्या. नुकत्याच पोहोचलेल्या विदेशी चमुच्या गाईडने तेथे काही पुजाविधी केल्या. इतक्या बिघडलेल्या परिस्थितीतही शिखरचढाई सुखरुप आणि यशस्वी झाल्याबद्धल त्याने काही विधी करून, सुगंधी धुप जाळून त्या शांत, निरव वातावरणात आमचे आध्यात्माशी डायरेक्ट कनेक्शन जोडून दिले.

एव्हाना चांगलेच उजाडले होते. सूर्याच्या कोवळ्या सुवर्ण रश्मींनी परिसरातल्या सर्वच हिमशिखरांना न्हाऊमाखू घालून मस्त तजेलदार केले होते. जवळपासचा परिसर नजरेत येऊ लागला तरी दूरवर मात्र अद्याप धुक्याचेच साम्राज्य पसरले होते. त्यामुळे काही नामचीन शिखरांचे दर्शन होऊ शकले नाही. अगदी स्वच्छ हवामानात तर इथून पाकिस्तानातील जगद्विख्यात 'के२' हे मातब्बर हिमशिखरही दिसते असे मला वंग्याल साहेबांनी सागून ठेवले होते पण आज हवामानाच्या असहकारामुळे त्याच्या दर्शनाचा काही योग नव्हता.

मोहीम यशस्वी झाली यावर माझा विश्वासच बसत नव्हता. ज्या चिवटपणे मी माझं ध्येय पूर्ण केलं त्याला तोड नव्हती. या यशाकरीता मी स्वतःला मनापासून शाब्बासकी दिली. गेले अनेक दिवस मनावर दाटलेले उदास भाव या अनपेक्षित यशामुळे नाहीसे होऊन मी चांगलाच तरतरीत झालो. सहजच मी हातावरील घड्याळाकडे नजर टाकली तर सकाळचे ७ वाजत आले होते. सवयीनुसार काही आकडेमोडी मनातल्या-मनात आपोआप झाल्या. जो काही निकाल मिळाला त्याने मला हर्षवायुच होणे बाकी राहिले. कारण लेह सोडल्यापासुन अनेक लहान-मोठ्या अडचणींना तोंड देत स्तोक कांग्री हे ६१२३ मी. उंचीचे हिमशिखर, अगदी वाईट हवामानातही अवघ्या २२ तासांत माझ्याकडून यशस्वीरीत्या सर झाले होते. म्हणतात ना हिंमत ऐ मर्दा, तो मदद ऐ खुदा.


विशेष बाब म्हणजे हे ठरवून केलेले नव्हते. तर शांत राहून, निडरपणे व प्रसंगावधान राखून केलेल्या अथक प्रयत्नाला निसर्गाकडून मिळालेली पोचपावती होती ती. निसर्गाला अन् शिखरमाथ्याला लाख-लाख धन्यवाद देत माझ्या थकलेल्या पायगाडीला बेस कँपच्या दिशेने पिटाळले. पुढची मोठी गंमत म्हणजे त्या दिवशी सायंकाळचा फक्कड मस्सालेदार काळा चहा मी लेहमधेच येऊन घेतला अन् एका छान, सर्वांगसुंदर मोहीमेचा मस्त, गोड समारोप केला.

जय हिंद!!!


किल्ले हरिहर - दिगंताच्या छायेत... दिग्गजांसमवेत - भाग १


                                                        प्रजासत्ताक दिन  
                                                                                    शुक्रवार, दिनांक - २६  जानेवारी  २०१८ .

किल्ले हरिहर - दिगंताच्या छायेत... दिग्गजांसमवेत... - भाग १

प्रास्ताविक ....



र्दी आणि माझं फार वितुष्ट. त्यामुळे गर्दीत मिसळणं मला कधी जमलंच नाही. खूपदा चांगले, कौटुंबिक, सामाजिक, कार्यक्रम, सोहळे निव्वळ गर्दीपायी टाळून मी अनेकांच्या शिव्या-शापांचा धनी झालो आहे.

मुंबापुरीसारख्या अखंड धावत्या आणि गर्दीच्या माहेरघरातील अष्टौप्रहर वास्तव्यामुळे असेल असं. दैनंदिन शहरी जीवनात तर गर्दी टाळायचा मी आतोनात प्रयत्न करतो. पण पाण्यात राहून... म्हणतात ना अगदी तस्संच या गर्दीचे अन् माझे संबंध आहेत. आणि मग…. या गर्दीत हरवलेल्या आत्म्याशी, माझ्या हक्काच्या स्व'शी, पुन्हा एकरूप व्हायला मी गडकिल्ल्यांचा 'बेमिसाल याराना बडे सुकून के साथ' जवळ करतो. त्यांच्या भेटीला जाताना मात्र मोजकेच गिने-चुने सवंगडी सोबतीला, नाहीतर "हा माझा मार्ग एकला..." च्या धर्तीवर सरळ चालू पडतो. अनेक वर्षांचा हा शिरस्त्याचा नियम.

पण शेवटी काय तर... नियम हे अपवादानेच सिद्ध होतात. होय ना ? असेच काही गडकोटांइतकेच भव्य अन् दिलदार अपवाद माझ्या वाटेला आलेत. त्यापैकी एक प्रमुख म्हणजे चारकोपला राहून दैदीप्यमान इतिहासाचा चौदिशांनी ठाव घेणारा परममित्र आणि जाणता मार्गदर्शक म्हणजे संजय तळेकर. वाहत्या झऱ्यासारखा तळनितळ माणूस. तरीही अजब वल्ली असलेला हा गिरीचर गिर्यारोहणातील माझ्या जन्मापासूनच माझ्या राशीला आहे.

गडकोट आणि त्यांचा प्रज्वल इतिहास खोलातून जाणुन घेणे, इतरांना त्याची सखोल जाणिव करुन देणे, अन् त्या अमाप धगीवर माणसं "चेतवणे" हा याचा धंदा. बाकी याची नोकरी-बिकरी हि सारी... अंधश्रद्धा.

या पुरातन माणसाच्या वयाबद्दल एक अघोरी शंका मला नेहमीच येते. याच्या उच्चविद्याविभुषित संगिनीबरोबर (रायफलीची नाही) माझा यावरून कैकवेळा वादही झालेला आहे. लौकिकदृष्ट्या याच्या वयाचा अंदाज लावायचाच झाला तर शिवनेरी, नाणेघाट परिसरातील गुंफा खोदल्या जात असतांना हा तिथल्या कुशल कारागीरांचा खमक्या मुकादम असणार. किल्ले शिवनेरीपेक्षा हा किंचीतसा लहान तर रायगडापेक्षा २-४ वर्षांनी थोराडच असावा.

आम्हां भटक्यांसाठी प्रातःस्मरणीय अशा गोनिदांबरोबर भटकंती केलेल्या संजयवर बाबासाहेबांचा जीव इतका कि शिवशाहिर याच्या घरी चहापानाला येतात. दिवंगत निनादकाका बेडेकरांशी याचं मोठं सख्य. इतिहासाचार्य सरदार बलकवडे यांचा तर हा जीवश्च-कंठश्च. चालता-बोलता इतिहास कोष म्हणजे आप्पा परब, ईतिहास तज्ञ तु.वि.जाधव, ऐतिहासिक शस्त्रांचे संग्राहक आणि विशेषज्ञ गिरीश जाधव अन् इतिहासाला  बोलायला लावणारे रवींद्र लाडांच्या हा खाजगीतला. आता बोला... याच्याबद्धल  आंम्हांला असूया का होऊ नये? असो.

तर, अशा तळेकर कुलोत्पन्न राजे संजयजींनी ऐनवेळी हुकुम सोडला ... हर्षगडला जायचं... बस्स्स... वनीं आनंद, भुवनी आनंद अशीच साऱ्यांची अवस्था होऊन गेली. झाडून सारे (कामा) धंद्याला लागले. आमच्या पक्षिमित्र मनिष नाखवा साहेबांनी थेट एक खाजगी बसच आरक्षित केली. वर्षाच्या सुरुवातीलाच अशी रांगड्या गडोत्तमाची भेट नाकारण्याचं महापाप कोण करेल?

जाणता राजा या महानाट्यातील कलाकारांच्या नसा-नसांत सह्याद्रीचा भर्राट वारा आणि गडकोटांचं भन्नाट पाणी भिनवून त्याचा विशुद्ध अर्क त्यांच्या अभिनयात उतरवण्याकरीता संजयने “जाणता राजा ट्रेकर्स” या दुर्गभ्रमण पथकाची निर्मिती केली. संजयच्या फुकट फौजदारी अर्थात् लष्कराच्या भाकऱ्या असलेल्या ( गिर्यारोहण साहित्य तयार करणे, मंडळांचे हिशेब तपासणे, सार्वजनिक देवादिकांना वस्त्रं नेसवणे, उत्सवांची सजावट करणे ) अशा अनेक उद्योगांपैकीच हा एक. त्या पथकातील कलाकारांच्या या मोहिमेवर अक्षरशः उड्या पडल्या. ऐनवेळी अनेकांना नकार द्यावा लागला. अन् लगोलग ३० धारकऱ्यांची एक मोहिम हर्षगड उर्फ किल्ले हरिहराच्या दिशेने क्षेत्र नाशिककडे रवानासुद्धा झाली.

शनिवार, दि. ६ जानेवारीच्या रात्री उशिरा ठाण्यातून निघालो तोपर्यंत सारंकाही आलबेल होतं. पण जसं आमच्या खाजगी बसने कल्याण सोडलं तसं पुढ्यातल्या संकटाची चाहूल लागली. नाशिकमध्ये तपमान ९ डिग्री सें.ग्रे. पर्यत घसरल्याच्या माहितीने पोटात गोळाच आला. पुरेसा जामानिमा सोबतीला असूनही मध्यरात्री कसाऱ्याला चहापान करतांना थंडीचा आवाका जाणवला.

मोहिमेचा शुभारंभ… क्षेत्र नाशिक येथे आगमन आणि देवदर्शन...



पहाटे साडेचाराच्या सुमारास त्र्यंबकेश्वर गाठलं. पण त्या चिवट गारठ्यात, उबदार बसच्या कुशीतून बाहेर पडण्याची हिंमत काही होत नव्हती. शेवटी काही हौशी कलाकारांना भरीस घालून संजयने वाहनतळाच्या कोपऱ्यात मस्त शेकोटी पेटवून घेतली. तेंव्हा कुठे मेहेरबानी केल्यासारखे.... लोक खाली उतरले... तेही... स्वतःच्या प्रातःविधिसाठी.

शेकोटीची ऐश चालू असतांनाच ब्राम्हमुहुर्ताच्या त्या अकलंक, निरव शांततेत, एका नादमधूर लकेरीने भान वेधून घेतलं. खेचल्यासारखा शेजारच्या मैदानात गेलो. तर तेथे एका मिनीबसच्या बाहेर १०-१२ दाक्षिणात्यांचा जत्त्था दिसत होता. घनघोर गारठ्यात आंघोळी (छटट यार ... मला तर कल्पनाच सहन होत नाहिये) उरकून ओलेत्यानेच त्या भक्तांनी कमरेला फक्त पंचा गुंडाळून अय्यप्पा स्वामींचे गुणगान आरंभले होते.

त्यांतील एका वयोवृद्ध स्वामीभक्ताने अय्यप्पां स्वामींना जागविण्याकरीता त्यांच्या प्रौढ पण कमावलेल्या गळ्यातील परिपक्व सुरांचा सुरेल साज चढवून आळवणी चालवली होती. पाठोपाठ भक्तगण कोरसमध्ये त्यांना साथ करत होते. त्यातील मंगलम्... मंगलम् शिवाय काहीही आमच्या पल्ले पडत नव्हतं. पण त्या मंगलम आळवणीने  समां बांधला होता. तरल सुरावटींनी एक उंची लय गाठली होती. मंत्रोच्चारणाच्या नादमाधुर्याचा ठेका तर असा खुब होता कि सारे भक्तगण एका संथ लयीत नाचू लागले होते.

नादब्रम्हाच्या तालावर भक्तांच भान हरपलेलं ते दृश्य इतकं लुभावनं कि माझं थट्टेखोर अागाऊ पोर आणि त्याचा डब्बल आगाऊ अस्मादिक बाप... आम्ही दोघांनीही त्या ठेक्यावर कधी ताल धरला ते कळलंच नाही. सुमारे दहाऐक मिनिटांच्या कर्णमधुर सोहळ्याने अंतर्बाह्य तृप्त होऊन अाम्ही एका अपूर्व एनर्जीने चार्ज्ड होऊन गेलो. भानावर आलो तेंव्हा मंत्रपठण संपून प्रसादाचे वाटप सुरु होते.

प्राचीन तिर्थक्षेत्रांचा आणि त्यातही जागृत ज्योतिर्लिंगाचा महिमा हा असा अगाध असतो. पहाटे-पहाटे खरंच जाग आली होती... भक्तिरसात चिंब होऊन पर्वतप्रिय, शंभूमहादेव अर्थात् त्र्यंबकेश्वराच्या दर्शनाकरीता आम्ही प्राचीन आणि अद्वितीय असं शिवालय गाठलं.

झिम्माड थंडीचा कडाका अस्सा आशिकाना होता कि मी मंदिरात, शिवाय "तसा एकटाच" आहे हे विसरून जनाब गालिब साहेबांच्या बेभान, प्रणयरंगी शायरीच्या, भावभोर दुनियेत काही क्षण मुशाफिरी करून आलो. "इश्कने (भटकंतीच्या) हमको निकम्मा कर दिया, वरना आदमी हम भी थे कामके".

हिमालयाच्या ओढीने आतुरले होऊन त्याच्या भेटीला नेहमीच जातो. पण यंदा, हिमालयच अपल्या भेटीला  येतोय कि काय अस्संच गोठवणारं वातावरण होतं. भव्यदिव्य मंदिराच्या प्रांगणातील फरसबंदीवरील उघड्या पायांमुळे थंडी थेट हाडांपर्यंत पोहोचत होती. माझ्या 'सायंटिफिक वांड' लेकाने तर हिमालयाशी नेहमीच पंगा घेणा-या बापालाही  'फ्राॅस्टबाईटची' भिती घालून टाकली.

महाखट पुजारीवर्गाच्या 'कृपे'मुळे झटापटीचं दर्शन उरकून बाहेर फेकला गेलो. तसा मंदिरासमोरच्या टपरीवरून मिसळीच्या ठसक्याचा गंध सुरसुरत्या नाकातून थेट मेंदूपर्यंत पोहोचून डोक्याचं भजं घालू लागला. मग आव देखा ना ताव ... त्या टपरीवर जोरदार हल्लाबोल केला. सक्काळी सक्काळी ६-७च्या गारेगार गारठ्यात कानातून धुर निघेल अश्शा... आगजाळ, 'तर्री मारके' गर्मा-गर्म मिसळीबरोबर काहि लाद्या पाव चेपून व डब्बल अद्रक मारके कोरा करकरीत टमरेलभर चहा नरड्यात ओतून पुढच्या अतिमहत्वाच्या कामगिरीला सज्ज झालो.

किल्ले हरिहराच्या रोखाने...


सामीये अय्यप्पा, त्र्यंबकेश्वरीचा महादेव आणि खमंग मिसळ, चहाने चित्तवृत्ती बहरुन आल्या होत्या. अनेक वर्षांपासून हुलकावणी देत हुकलेल्या हर्षगडाचे वेध आता थांबू म्हटलं तरी थांबू देत नव्हते. लगोलगीने तिथून सुमारे २०-२२ कि.मी. वरच्या हर्षवाडीला पोहोचलो तर गावात अनेक गाड्यांनी गर्दी केलेली.

एव्हाना चांगलंच फटफटल होतं. थंडीची तिव्रताही बरीच अोसरली होती. गावातील एका छोट्याशा खळ्यातच ओळखपरेड उरकून घेतली त्यावेळी संजय आणि इतिहास प्रेमी अरुण गवेकर यांनी खूपच छान माहिती दिली.

अरुण गवेकर हे आणखी एक मस्तमौला व्यक्तीमत्व आमच्यात होते. नाही.... असं म्हणणं योग्य होणार नाही, तर आम्ही त्यांच्यासोबत गड भटकंती करीत होतो हे जास्त सयुक्तिक होईल. कमालीची व्यस्त आणि तणावपूर्ण अशी उच्चपदस्थ शासकिय नोकरी आणि पंचावन्नाच्या पुढे-मागे वय असलं तरी हा माणूस, वेळ उपलब्ध होतोय असं दिसलं कि त्याच्या सदुपयोगाकरीता एखाद्या गडकिल्ल्यावरच आढळून येईल... मजबूत शरीरयष्टी राखून असलेले अरुणजी सह्यांगणातील रानवा-यासारखे भिरभरत असतात. लेखनाचं उत्तम अंग असलेले हे साहेब लिहायला मात्र जाम कंटाळा करतात ही एक यांच्याविरूद्ध माझी कायमची तक्रार. अशा चांगलं लिहिणाऱ्यांनी लेखण्या म्यान केल्यामुळे माझ्यासारख्यांना हे असं काहीतरी खरडावं लागतं.

सह्याद्री आणि गडकोटांशी नातं जुळलेले अरुण गवेकर इतिहात चांगलेच रमतात. सह्याद्रीतीलच नाही तर शिवरायांच्या पावन पदचिन्हांचा त्यांच्या अमोघ कर्तृत्वाचा ठसा जिथं-जिथं म्हणून उमटला असेल तिथं-तिथं जाऊन ते सारसर्वस्व न्याहाळणे हा त्यांचा प्रमुख छंद. बरं हे सारं फिरतांना आपला कुटुंब कबिलाही सोबत ठेवण्याकडे यांचा कटाक्ष असतो.

अस्सल कोल्हापूरकर असलेल्या गवेकरांचं नरकेसरी सुभेदार तानाजीराव मालुसरे यांच्या घराण्यात चांगलीच जानपछान. जंजी-याच्या नबाबाकडे यांचा वशिला. आता बोला...  या अडनिड्या वयातही ते नुकतेच कुलंग-मदन-अलंग या सर्वांत अवघड दुर्गत्रयींच्या भेटीला जाऊन आले. त्यांच्या सोबत, गडफेरीदरम्यान इतिहासाची पानं उलटणे हि एक वेगळीच अनुभूती असते. आणि का असू नये? अहो, श्रीमान योगी, स्वामी अशा दिग्गज ग्रंथांची श्रीमान रणजित देसाई यांनी ज्या वाड्यात रचना केली, तिथंच आमच्या अरुणजींचं बालपण गेलंय. आता बोला?

या ट्रेकला, वाटलं होतं कि एका नव्या टिमबरोबर जातोय, त्यातून गड असा हा कस लावणारा. त्यामुळे मी चांगल्या तयारीनेच आलो होतो. प्रस्तरारोहणाचं ब-यापैकि साहित्य मी सोबत नेलं होतं. गेल्या दोन-अडीच दशकात विपुल प्रमाणात केलेल्या भटकंती आणि आरोहणादरम्यान असं एक एक पाहिलंय, अनुभवलंय कि अगदी डोंगरातल्या १००% सुरक्षित ठिकाणी जातांनाही माझ्याकडे थोडीफार सुरक्षासाधनं मी ठेवतोच. (इतकंच काय लग्नाच्या वाढदिवसानिमित्त जोडीने करावयाच्या भटकंतीच्यावेळी सोबत घेतलेल्या या साधनांमुळे मी सालाबादप्रमाणे बोलणी खातो… कुणाची हे सांगायलाच हवं का? ) 

साधारण तीस लोकांचा भक्कम जमाव सोबत आहे म्हटल्यावर यावेळी त्याचं ओझं जरा जास्तच झालं. आमच्या जमावात असा एक अत्यंत उत्साही मावळा मला सापडला. त्याला या साधनांची गरज आणि महत्व समजावून सांगीतल्यावर जबराट उत्साहाने मुसमुसलेल्या आमच्या कृणाल जांभळनेे संपूर्ण मोहिमेत ती जडशीळ जबाबदारी शेवटपर्यंत अगदी नेटाने वागवली.

करारी कारवीची करुण कहाणी...

हर्षवाडीतील ठळक पायवाटेने गडाचा रोख धरुन पुढे निघालो असता, सपाटीवरील अंतर पार करून गडचढाईवरील झाडीत शिरण्यापुर्वी एका दृश्यामुळे जगीच थबकलो. काही गावकरी तेथे ढिगावारी पडलेल्या काटक्यांच्या सुबक पद्धतीने मोळ्या बांधायचं काम करीत होते. निरखून पाहिलं असता, त्या बांधेसूद काटक्या कारवीच्या होत्या. शेणा-मातीत लिंपून घेऊन वनचरांच्या घरभिंतीत चिणल्या जाण्याबरोबरच, धनदांडग्यांच्या शेतशिवारातील टोमॅटो, शिराळी, पडवळांच्या वेला-रोपांचा आधार होणारी कारवी, थोड्याफार अर्थप्राप्तीमुळे निष्कांचन गिरिजनांच्या संसारवेलीच्या मांडवाचाही आधार होते हे पाहून माझं कारवीवरचं प्रेम आणि आदर दुणावला.

७-८ फुट लांब एका रेषेतल्या सरळसोट इंचभर जाडीच्या काठ्या बुंध्यापासून तोडून त्यावरचं पान न् पान छाटून तासलेल्या ताज्या-ओल्या कारवीची ती कलेवरं पाहून आत, कुठंतरी खोलवर गलबलून अालं. कारवी आणि माझं नातं आता लपून राहिलेलं नाही. या अनवट, अनकही नात्यात डोकवायचं असेल तर पुढील लिंकवर अगदी प्रेमाने एक टिचकि माराच. ( पर्वतकन्या कारवी http://anandvaari.blogspot.com/2017/06/blog-post_5.html )



गडसोपान... एक अद्भुत, उत्तुंग पाषाणशिल्प...


हर्षवाडी लगत गडवाटेवरील कारवीच्या बनात एक छान, मंदसा सुगंध आस्मंतात भरून राहिला होता. याच वाटेवरून अोझरता दिसणारा हर्षगड आता चांगलीच जवळीक साधू लागला. चोरट्या अन् बेजबाबदार तोडीमुळे कमालीच्या विरळ होत चाललेल्या गडपायथ्याच्या झाडीतून तासाभरातच पांढऱ्या मुरमाड अशा नागव्या चढाई धारेवर येताच ते जगद्विख्यात अफलातून पायऱ्यांचं दृश्य अक्षरशः मोहिनी घालतं. काय, कसं, कधी, का? कश्शा कश्शाचं भान म्हणून उरत नाही. त्याची ती अप्रतिम सुंदरता सौंदर्यासक्त, आशिकमिजाज प्रकृतीच्या मनावर अघोरी जादू करतं.

दिलोदिमागकि बत्तीयाँ गुल हो जाती हैं... तिथल्या कातळी भानामतीचं भल्या-भल्यांना लागिरं होऊन जातं. त्या नशेमन नजाऱ्याच्या खुबसुरत गारूडातून बाहेर पडणं मात्र सोपं नाही.

वेळीच सावध होऊन भानावर येणंही क्रमप्राप्त होतं. कारण हरिहरच्या त्या दिव्य स्वर्गसोपानावर बरीच गर्दी झाली होती. जमलेल्या सर्व हौशा-नवशा-गवश्यांना स्वर्गात जाण्याची घाई झाली होती. आमच्या सर्व जाणत्यांना पुन्हा एकदा सावधगिरिच्या सुचनांचा एक हेवी डोस दिला गेला. कारण या स्वर्गसोपानावर शिस्त मोडणं म्हणजे खऱ्या-खु-या स्वर्गदर्शनाची हमखास गॅरंटी.

सावधपणे पुढे सरकत असतांना अचानक गर्दितला एक आवाज अोळखीचा वाटला. अरुण सावंत... हा आणखी एक अवलिया तेथे हजर होता नजरा-नजर होताच अरुण दादाने नेहमीप्रमाणे एक घट्ट मिठी मारली. त्याच्या भेटीची हि नेहमीची पद्धत मला खुप आवडते.

महाराष्ट्रातील ज्येष्ठ गिर्यारोहकांच्या आघाडीच्या फळीतला हा "नवतरुण" नुकताच ६० वर्षांचा होऊन त्याच्या 'अंशकालीक' नोकरीतून निवृत्त झाला अन् सह्यसेवेच्या चाकरीत पूर्णकालीक रुजू झाला आहे. सह्याद्रीचं बारसं जेवलेल्यांपैकि एक (असं कौतुकानं) म्हणता येईल अशा अरुणदादाकडे बघून त्याच्या वयाचा अंदाज येणे शक्य नाही. उच्चपदस्थ नोकरीत जखडलेला असतांना या माणसाने सह्याद्री उभा-आडवा खंगाळून काढला आता 'मोकाट' सुटल्यावर काय करेल काहि नेम नाही.

अरुणदादाबद्धल बोलावं तितकं कमीच. सह्याद्री, प्रस्तरारोहण, गडकोट, सागरसफरी, गुहासंशोधन, हिमालयीन मोहिमा, पाकसंशोधन, आणि इतर अनेक साहसी क्रीडाप्रकारांचं त्याने कधीच लोणचं घातलंय. आणि आत्ता कुठे ते मस्त मुरू लागलंय. या हुन्नरी व्यक्तिमत्वाची अशा झुंजार ठिकाणी भेट झाल्याने आमच्या या भटकंतीला  मात्र चार चांद लागले.


एकंदर झालं काय? तर २-२ सिनियर अरूण आणि नभांगणातील सर्वांनाच सिनियर अरुणरावांमुळे आमच्या या मोहिमेत खणखणीत अरुणोदय होऊन सबंध गड अपुर्व प्रकाशाने न्हाऊन निघाला. दिलखुश हवामानाच्या साथीनं हरिहराचं असं अपरंपार तेजाने निथळण्याचा सोहळा पाहून तबियत खुष होऊन गेली.

दरम्यान गडाच्या स्वर्गीय सोपानावर गर्दी वाढू लागली होती. गडाच्या त्या कातळकोरीव जिन्याला भिडण्यापुर्वी मी तेथे माथा टेकवला. तो मान या गडाचा तर होताच पण त्याचबरोबर मानाचे मानकरी होते ते कुशल हात ज्यांनी हे काळ्या फत्तरातील हे अद्भुत शिल्प घडवलं. मनोमन त्यांच्या या बेमिसाल कलाकारीस लाख-लाख दुवा देत गडचढाईला सुरूवात केली.


अशा थरारक वाटेवरही कर्कश्श्य आवाजात पोर्टेबल ब्लुटूथ स्पिकरवर बाजारू संगीताच्या तालावर माकडचाळे करणा-या जमातीचा तेथेही सुळसुळाट होता. ते माझ्या गडनिरीक्षणात अकारण व्यत्यय आणत होते. काहींना प्रेमाने तर काहींना "विशेष प्रेमाने" त्यांची 'ईंपोर्टेड' डबडी  बंद करायला लावली.

गडकोटांवर यायचं ते इथल्या खडका-मातीत झिरपलेला अभिमानास्पद इतिहास टिपायला, टिपकागदासारखं स्वच्छ, हळुवार मन घेऊन. यांना चांगल न् वाइट यातला फरक कधी समजणार आहे कोण जाणे? खऱ्या थ्रिलभऱ्या अॅडव्हेंचरची न् यांची कधी गाठच पडली नाही. इन्स्टंट फुडवर पोसलेली ही पिढी. एक गावरान झटका द्यायचा विचार होता पण थोडक्यात आवरतं घेतलं.

या धुरंधर गडाच्या हर्षगड, हरीष अशा अनेक नावांपैकी हरिहर हे नांव मला खुप आवडतं. याच्या इतिहासात थोडं डोकावलं तर दिसून येतं कि, सन १८१८ मध्ये मराठेशाहीचं विधीवत् विसर्जन केल्यानंतर टोपीकरांनी त्यांचे शेंडे-बुडखे ओले करणाऱ्या अशा अनेक बळवंत गडकोटांच्या निर्घृण शिरकाणाचं काळंकुट्ट काम सुरु केलं होतं.

प्राचिन स्थापत्य शास्त्राचा उत्तुंग आविष्कार असलेल्या या गडोत्तमाच्या मुळाशी सुरूंग लाऊन ठिक-या-ठिक-या उडवण्याच्या कामगिरीवर गोरा कॅप्टन ब्रिग्ज निघाला देखील. अशा अघोरी कामावर नेमणूक झाली असली तरी त्याच्या कलासक्त वृत्तीला खरंतर आपण भटक्यांनी सलामच केला पाहिजे. हे येडपट त्यावेळी या पायऱ्यांच्या नादाने खुळावलं नसतं तर आज हरिहराचा उध्वस्त सांगाडा पाहून आपल्याला वेड लागायची वेळ नक्कीच आली असती.

किल्ले हरिहरानेही त्यावेळी केलेली लबाडी तर पहा. आपल्या अमोघ मोहिनी अस्त्राच्या लपेट्यात टोपीकर कॅप्टन ब्रिग्जला अस्सा काही लपेटला कि हा गड मुळापासून उखडून टाकायला आलोय हे विसरून ते खुळं गडाचं गुणगान करत परत गेलं. एका फाकड्या लष्करी अधिकाऱ्याची हि कथा... तर तुम्ही आम्ही किस झाडकि पत्ती?

विश्ववंदनिय ज्ञानेश्वरीची एक तरी अोवी अनुभवावी असं हरिभक्तपरायणांकडून सांगीतलं जातं. त्याच धर्तीवर या हरिहराची एकतरी पायरी प्रत्येक भटक्याने, दुर्ग अभ्यासकाने बारकाईने अनुभवली पाहिजे असं आवर्जून सांगावंसं वाटतं. राजेहो... काय त्याचा आब अन् काय तो दरारा, काय त्याचं सौष्ठव अन् काय ते बेमिसाल सौंदर्य याच्यापुढे तर प्रत्येक दुर्गयात्रीने साष्टांग दंडवतच घातला पाहिजे.


काळ्याकुट्ट, दगडातून खोदलेल्या ओबड-धोबड पायऱ्यांनादेखील कमालीचं सौंदर्य असतं हे इथं आल्यावर कळतं. खडक फोडून तराशलेल्या या पायऱ्या... बलाकि खुबसुरत आहेत. यांच्या नजाकतीपुढे तर एखाद्या अय्याश, गुलाबी रंमहालाच्या, बारीक, नक्षीदार कलाकुसरीच्या संगेमरमरी तेजाच्या महालांनीही झक्कत मान खाली घालावी. असा हा गडसोपान गर्दिनं अोसंडत असला तरी माझी बेकल नजर प्रत्येक पायरी न पायरी बारकाईने न्याहाळत होती.

चढून येणाऱ्या प्रत्येकाच्या मनाची विलक्षण भयावह घालमेल लक्षात घेऊन पायऱ्यांच्या दोन्ही बाजूंना हाताची बोटं मजबूतीनं रुतवण्यासाठी खोबण्यांचे खोल आधार ईथे कोरुन ठेवलेत. या जिन्यावर हाता-पायांचा भरपूर वापर झाल्याने हा खट्याळ गड आपल्याला पुन्हा एकदा उत्क्रांतीच्याही आधीच्या काळात पाठवून नराचा पुरता वा'नर बनवून सोडतो.

आमच्यासारखी खडकांशी धडका घेण्याची सवय असलेल्यांचं एक ठिकंय, पण कुणाचंतरी ऐकून फुकाचा माज करण्यासाठी आलेले अन् भितीने हात पाय गाळून सैराट खाली उतरणारेही काही महाभाग दिसले. कमजोर हृदयाच्या गड्यांनी तर याच्या नादाला न जाणंच चांगलं. अर्थात् त्यांनी आपल्या 'पायरीनेच' राहिलेलं बरं...

येक येक पायरी शांतपणे अनुभवत गडाचं महाद्वार गाठलं. छोटेखानीच पण मोठ्या मानाचा मानकरी असलेल्या महाद्वाराच्या दर्शनाने उर भरून आला. पायऱ्या न तोडण्याचा निर्णय घेतलेल्या फिरंगी कॅप्टन ब्रिग्जला जाता-जाता गडाचं हे एकमेव प्रवेशद्वार सहज उद्ध्वस्त करता येण्यासारखं होतं. पण हा गोरा साहेब जसा या सोपानाच्या प्रेमात पडला होता तस्साच तो या महाद्वारातही गुंतला होता. त्याच्या रसिक मनाने हे पक्कं जाणलं होतं कि या पायऱ्यांशिवाय महाद्वाराला आणि महाद्वाराशिवाय पायऱ्यांना शोभा नाहीच. म्हणूनच तो उदार फिरंगी कॅप्टन, तृप्त होऊन आल्या वाटेने परत गेला.

गडाचं हे महाद्वार असलं तरी इतरांसारखं हे अवाढव्य अन् प्रशस्त नाही. तर आत झुकूनच प्रवेश करावा लागतो, इतकं हे लहान आहे. हि गोष्ट मात्र मला चांगलीच भावली. प्राचीन मांदिरं, लेणी आणि गडांचे दरवाजे कमी उंचीचे ठेवण्याची हि पद्धत मला खूप आवडते. दुसरं काही नाही हो ... वाकून गेल्यामुळे त्या महान वास्तूदेवतेला, त्यांच्या रचनाकारांना नकळत नमस्कार तर घडतोच पण आपलीही 'उंची' समजते .

बिकट ही वाट... गडाची... 

महाद्वारातून अंतर्भागात प्रवेश करताच समोरच्या खडकातील लोभस गणेशमुर्तिचं दर्शन घडतं. गणपती बाप्पा मोरया म्हणून लगेच वाटेला लागायचं. पुढची वाट इथं डावीकडे वळते आणि एका अद्भुत सज्जात आणून सोडते. या सज्जात अापण डोकं आणि तोल सांभाळत गडपायथ्याच्या रहाळावर एक राजेशाही नजर फिरवायची आणि पुढे व्हायचं. या गॅलरीला गोऱ्या साहेबाने सन्मानपूर्वक "राॅक कट गॅलरी" असं भारदस्त नांव दिलंय.

एखाद्या भ्रमर भुंग्याने मजबूत लाकूड पोखरून आपल्या पिढ्यांची वहिवाट सुकर करावी अगदी तश्शाच  पद्धतीने ईथून पुढची गडवाट त्या बेनाम शिल्पकारांनी जीव अोतून कोरलेली दिसते. या वाटचालीत आपण त्यांच्या या अजरामर कलाकृतीची तारीफ करण्यात कंजुषी मात्र करायची नाही.

गॅलरीच्या शेवटी वाट उजवीकडे उभ्या कड्यात बेधडक घुसते. आपणही अनमान न करता पाऊले चालतीच्या चालीवर मनोभावे चढत-चालत रहायचं. पुढच्या टप्प्यात तर मोठमोठया महालांमध्ये विशेषतः पाश्चिमात्य वाडे-बंगल्यांत असतो तसा अर्धगोल, सर्पिलाकार जिनाही इथं तपशिलाने खोदून काढलेला आहे. आता लावा हिशेब, कि तो गोरा साहेब इथून जाताना काय-काय घेऊन गेला ?


हा जिना सांभाळून चढून जायचं आणि चक्क लहानशा विटांनी बांधून काढलेल्या मोडक्या घुमटीचं छत असलेल्या दरवाजातून खालून वर चढत गडावर थाटात प्रवेश करायचा. या मोडकळीस आलेल्या घुमटीची रचना आपल्याला दाद द्यायलाच लावते. तीच्याकडे निरखुन पहात असतांनाच एक उर्दू शेरवजा कहावत आठवली. अर्ज है... “खंडहर बयाँ कर रहें हैं, के इमारत कभी बुलंद थी”... पुढच्या पावसाळ्यात हि असेल याची का… ही शाश्वती नाही.

एका मोठ्या भुलभुलय्यातून सहीसलामत सुटून जग जिंकल्याचा आनंद चेहऱ्यावर घेऊन आपण गडमाथ्यावर अवतरतो. इथंपर्यंत पोहोचल्यानंतर स्वतःला एक मस्त शाब्बासकि बिनधास्त देऊन टाकायची. शांतपणे बसून धपापणारा श्वास एकसुरी करून घ्यायचा. थोडं पाणी तोंडावर मारायचं आणि थोडंसं आतही सोडायचं. पूर्व-पश्चिम पसरलेला चिंचोळ्या माथ्याचा गड उभा-आडवा नापायला फार वेळ लागत नाही.






गडावर प्रवेश केलेल्या उगवतीच्या दिशेने तसंच सरळ रेषेत पुढे गेलं कि सुबकरीत्या बांधून काढलेल्या एका पुष्करणीच्या काठचा शेंदूरचर्चीत हनुमान आपली वाट अडवतो.


त्याशेजारीच एका चौथऱ्यावर शिवलिंग स्थापलेले आहे. दोघांनाही वंदन करून तसेच सरळ रेषेत पुढे नीघायचं. त्या विस्तीर्ण पठारसदृश माथ्यावरील अनेक  लहान-मोठ्या कोरीव टाक्यांमध्ये डोकावत इकडम-तिकडम करत गडावरील एकमेव सुस्थितीत असलेली वास्तू अर्थात् धान्याच्या  कोठीकडे आपला मोर्चा न्यायचा.





गडावर मुक्काम करणे आवश्यक असल्यास एकतर "निली छत्री" किंवा या कोठीशिवाय पर्याय नाही. बुलंद गडावरचं हे एकमेव सहिसलामतीचं बांधकाम. आतापासूनच संवर्धनाची पुरेशी काळजी न घेतल्यास कालाय तस्मै नमः म्हणण्यशिवाय आपल्याला काहीच करता येणार नाही. आणि तसंही... आपण दुसरं काय करतो म्हणा.

याच दिशेने पुढ्यात दिसणाऱ्या अगदी शेवटच्या टोकापर्यंत सहज जाता येतं. इथून बैजवार परिसर न्याहाळण्याची मजा बाकी जब्बरदस्तच आहे. हरिहरापासून एका खिंडीमुळे वेगळा झालेल्या, अगदी शेजारच्याच डोंगरातील एका निरूंद, खड्या घळीतून काही गावकरी चढून जातांना दिसले. अधिक चौकशी करता तेथे परिसरातील स्थानिक  ग्रामस्थांचं दुर्गम देवस्थान असल्याचं समजलं. त्या 'देवाच्या डोंगरामागे' भंडारदुर्ग लपल्यासारखा दिसत होता. तर थोडं उजवीकडे खेटून उभा असलेला आणि स्वतःचं अस्तित्व ठळकपणे दर्शवणारा ब्रम्हगिरी अर्थात त्रिंबकगड मोठ्या दिमाखात भाव खात होता.

घड्याळाच्या दिशेने थोड्या उजवीकडे नजर फिरवली तर वैतरणेच्या प्रचंड जलाशयाने समृद्ध झालेलं विस्तीर्ण खोरं दिसतं. तसंच नजरेचा फेरा आणखी उजवीकडे अर्थात् पश्चिमेकडे फिरवला तर बसगड, उतवड दिसतात.फण्या डोंगर तर तोंडाचा चंबू करून आपल्याकडे पहात असतो. "तुम्ही सगळे हरिहरलाच भेटता, मी काय कुणाच घोडं मारलंय व्हंय?" अशा रुसलेल्या अविर्भावातच तो कायम असतो. असो बापडा.


तसं म्हटलं तर खडकाळ माथ्याचा हा गड उजाड बोडकाच. पण शांत जळाने भरलेली छान पुष्करणी, आध्यात्माशी आपलं एक वेगळं नातं जोडणारी तिच्या काठची देवालयं, वा-यावर फडफडणारा रेशमी भगवा आणि एक भारदस्त  पर्णसंभाराचा, विशाल छायेचा वृक्ष इथल्या सा-या कमतरतेवर पांघरुण घालून "कमी तिथे आम्ही" म्हणत पैसावसुल भरपाई करुन जातात.

गडपुष्करणीच्या नितांत सुंदर परिसराची ती अफलातून फोटोजेनिक फ्रेम पाहून तिथे क्षणभर विश्रांतीचा मोह अनावर झाला. त्याच छान ठिकाणी आमच्या अरुणदादाचा एक छोटेखानी सत्कारसमारंभ घडवण्यात आला. त्यावेळी आजवरच्या गिर्यारोहणातील यशस्वी वाटचालीचं आणि साठीतल्या उत्तम आरोग्याचं रहस्य त्यांनी थोडक्यात उलगडलं. नवोदितांसाठी मार्गदर्शनाचा एक उत्तम धडा आमच्या सावंतगुर्जींच्या वर्गात इथं चांगलाच रंगला.

पाठोपाठचा प्रायोजित कार्यक्रम म्हणजे आमच्या रा.रा.श्री.संजय तळेकरांची एक खासियत. अर्थात् प्रत्येक ट्रेकसदस्याला त्यांच्याकडून मिळणारी एक अपुर्वाईची भेट. ट्रेकपुर्वी संजय स्वतःच्या सुवाच्च्य हस्ताक्षरात भेटीला जात असलेल्या किल्ल्याच्या संपुर्ण माहितीचं, ढोबळ नकाशासह एक हस्तलिखीत काढतो. त्या बेशकिमती हस्तलिखिताच्या प्रतिचं प्रत्येक सदस्याला वाटप केलं जातं. इतकंच नाही तर गडभुमीवर त्याचं जाहिर वाचन-विवेचन करुन चर्चासत्राची मस्त फैर झडते.

काही वर्षांपूर्वी थोर दुर्गसाहित्यकार सर्वश्री आनंद पाळंदे आणि समकालीन जेंव्हा भ्रमंतीच्या गडघाटवाटा धुंडाळू लागले होते तेंव्हा पुण्यातील विख्यात गिर्यारोहक डाॅ. जी. आर. पटवर्धन अर्थात् बापूकाकांनी अशी प्रथा सुरू केली होती. अशा माहितीपूर्ण हस्तलिखितांची त्यावेळी अत्यंत मौलिक मदत व्हायची. बापूकाकांचं ते कार्य आणि साहित्य इतकं परिणामकारक होतं कि त्यावर पिढ्या पोसल्या गेल्या. आमच्या संजयचं हे कामदेखील असंच  निखालस, निगर्वी अन् मार्गदर्शनपर आहे.

आजच्या इंटेरनेटच्या जगात, एका क्लिकवर सर्वकाही उपलब्ध असतांना त्याच्या या कार्याचं महत्व फारसं जाणवणार नाही. पण शेवटी आभासी जग ते आभासीच असणार. हस्तलिखितांच्या पुढे त्याचं महत्व ते काय? अशा अनेक हस्तलिखितांचं आता त्याच्याकडे एक चांगलंच बाड तयार झालंय. त्यावर एक वजनदार माहितीचा ग्रंथ कधी तयार होतोय? याची मी आतुरतेने वाट पाहतोय.

संजयची, उच्चविद्याविभुषित वज्रचुडेमंडीत सकल सौभाग्यसंपन्न सहधर्मचारिणी सौ. शरयुराजे अर्थात् नीता तळेकर उर्फ आमच्या ताईसाहेब यांनी त्यांच्या सुस्पष्ट स्वरात हस्तलिखिताचं वाचन करून गडदर्शनाची लज्जत चांगलीच वाढवली. प्रोफेसरकी करुन या मॅडम थकत नाहीत मग त्यांचा वर्ग अशा पद्धतीने गडकिल्ल्यांवरही भरतो.

गेल्या २५ वर्षांहुनही अधिक काळ मी नीताराजेंना सह्याद्रीच्या कडेकपारी पिंजून काढतांना पहात आलोय. वाढतं वय असो कि नोकरी, संसाराच्या अनुषंगाने आलेल्या संकटांची भरमार असो शिवछत्रपती, किलेकोट आणि आमच्यासारखा चाहतावर्ग यांच्यावरच्या प्रेमात तसूभराची उणीव म्हणून दिसली नाही. झालीच तर यात दिवसेंदिवस वाढच होतांना पहातोय.

आता तर वैद्यकिय उच्चशिक्षण घेत असलेलं त्यांचं एकमेवाद्वितीय, अनेक खेळात पारंगत कन्यारत्न प्रांजली हीसुद्धा सह्यसेवेत रुजू झालीय. अगदी लहान असल्यापासून माता-पित्यांसह भटकंती करतच वाढलेली प्रांजली आता पालकांप्रमाणेच दुर्गाभ्यासी होतांना दिसतेय. थोडक्यात सांगायचं तर संपुर्ण कुटुंबच त्यांच्या 'तळेकरवाड्यातून' सह्यशिवाराधनेत कायम व्यग्र असतं. त्यांच्या वाड्यात' निगुतीने जपलेल्या ऐतिहासिक ऐवजांचा ठेवा याची साक्ष पटवायला पुरेसा आहे.

आमच्या किल्ले हरिहर दर्शनाचा मध्यांतर झालेला असूनही आमच्या मावळ्यांनी चांगलाच धीर धरला होता.आक्रमणाची इशारत होताच भाजी-भाकरी, धपाटे, चटण्या, मेथीचे लाडू अशा खास मराठमोळ्या खाद्यान्नांचे डबे खणखणू लागले. तलवारींचा खणखणाट ऐकण्याची सवय असलेला गडपुरुष या आवाजाने नक्कीच चकित होऊन गेला असणार.

वर्षारंभीच या मोहिमेच्या निमित्ताने अाम्ही "प्लॅस्टिकमुक्त सह्याद्री" या आणखी एका मोहिमेचाही शुभारंभ केला. यापुढे हि मोहीम अधिक व्यापक स्वरूप धारण करेल अशी खात्री आहे.

मोहिमेवर निघण्यापूर्वीच सर्वांना याची सविस्तर माहिती देण्यात आली होती. प्लेट चमचे, वाट्या, डबे यातलं काहीही प्लॅस्टिकचं असणार नाही अन् तसं काही आणलंच तर त्याच्या योग्य पद्धतिने विल्हेवाटीची सर्वांना तंबीच दिली होती. अनेक वर्षांनी या वेगळ्या खणखणाटाने गडपरिसर नक्कीच सुखावला असणार. सविस्तर पोटपूजा आवरल्यानंतर दुर्गजागराचा एक फक्कड फड "त्या तरूतळी" छानच रंगला.

मोहिमेत छायाचित्रकार हा घटक खुप महत्वाचा असतो. पण आपल्याकडे अजून त्यांना हवं तितकं महत्व दिसून येत नाही ही एक मोठी खंत आहे. आमच्या पथकातला देहेरकर असं वजनदार आडनांव असलेला अवधूत एक गुणी भटक्या. आणि होऊ घातलेला एक उत्तम छायाचित्रकार. मोहिमेत जिथं आपला जीवही आपल्याला जड झालेला असतो तिथं हा पठ्ठ्या सर्वांना आग्रहाने थांबवून त्यांचे फोटो घेत होता. आमच्यातल्या निखील हळबे या गोंडस बाळाने आणि नारायण बेबले या गुंतवणूक तज्ञाने त्याच्या कॅमे-यात स्वतःच्या छबींची भली भक्कम गुंतवणूक केली. आणि महिला आघाडीने तर याचा मामा बनवून भरपूर फोटो काढून घेतले. छायाचित्रणावरचंं त्याचं निरतिशय प्रेम त्याला आयुष्यात खुप काही मिळवून देईल यात मात्र शंका नाही.

धार्मिक बाबतीत जगभरात आपलं वर्चस्व राखणारी नाशिकनगरी, नैसर्गिक आणि ऐतिहासिकदृष्टयाही परमवैभवसंपन्न आहे. एकट्या नाशिक परिसरात सह्याद्रीच्या पहाडी बाण्याचे ५०हुन अधिक आणि एकापेक्षा एक रौद्र-बळवंत अशा दुर्गम गडकोटांचं वास्तव्य आहे. त्यामुळे नाशिकला मी तर कौतुकाने “किल्ल्यांचा जिल्हा” असंच म्हणतो.


सुखद हवामान आणि महामुर पावसामुळे बारमाही ताजातवाना निसर्ग, पूजनीय नद्या, प्राचीन मंदिरे, सरोवरे अन् प्रचूर मात्रेतील पाषाणसौंदर्य अशा विविधतेने नटलेला हा प्रदेश भटक्यांसाठी स्वर्गासमान आहे. याच स्वर्गातल्या किल्ले हरिहराच्या भेटीमुळेे खूप काही मिळवल्याचं एक वेगळंच चमकदार समाधान गडावरील प्रत्येक चेह-यावर दिसत होतं.                                                                                                                  


क्रमश: