मोहीम शिखर सावरकर ... एक ध्यासपर्व अंतिम भाग ४

राजमाता  जिजाऊसाहेब  पुण्यस्मरण.  

रविवार , दिनांक - १८  जून  २०१७.



मोहीम शिखर सावरकर ... एक ध्यासपर्व : अंतिम  भाग  ४ 





निर्णायकी झुंज सुरू....






त्या घनघोर आरोहणाच्या पहिल्या तासाभरातच आंम्हांला कळले की आम्ही काय पेलायला निघालो आहोत ? ... तेथील एकंदर परिस्थिती पाहून माघारीचा एक विचार देखील डोक्यांत काहूर माजवू लागला होता... पण आता माघार नाही... आणि का घ्यायची माघार?... भ्यायचे कुणाला?... ज्या शिखराचे नामकरण स्वा. सावरकरांच्या नांवाने होणार आहे त्याला?... छे... छे....ते शक्य नाही... मान उंचावून, एक दिर्घ श्वास घेऊन त्या शिखरराजाचे दर्शन घेतले. मनोमन स्वा. सावरकरांचे, त्यांच्या साहसी कारनाम्यांचे स्मरण केले... शरीराच्या अणूरेणूंना आदेश दिले गेले आणि सुरू झाला एक झुंझार रणसंग्राम....






हे कसलंही युध्द नव्हतं की स्पर्धा.... हे एकप्रकारचं द्वंद्व होतं... स्वतःचं स्वतःशी... इथं कोणी जेता वा पराजित होणार नव्हता... आणि गिर्यारोहण म्हणजे तरी काय हो ?... डोंगरावर चढून... मी चढलो...मी चढलो असा डिंडीम बडवणे ?... मी जेता... मी विजेता असा डांगोरा पिटणे ?.... नाही.... मी तर म्हणेन, अद्भूत निसर्गाच्या अधिक जवळ जाण्याचा, निसर्गाला अधिकाधिक जवळून अनुभवण्याचा, त्याला आपल्या कवेत घेऊन गुजगोष्टी करण्याचा तो एक सर्वात शिस्तबध्द आणि सोपा मार्ग आहे.



इथं आपला प्रतिस्पर्धी जरी निसर्ग आहे. त्याला आपण जिंकू शकतच नाही... पण त्यालाही जिंकता येतं ते त्याच्या जवळ जाऊन, भरभरून त्यसच्यावर आभाळाएवढं प्रेम करून. अनादि काळापासून त्यानं आपल्याला फक्त दिलंय आणि आपण? त्याला ओरबाडण्याशिवाय काहीही केलेलं नाहीये.


अपरिमित श्रमाला पर्याय नाही...


आरोहणाच्या खडतर वाटेवर आता सुमारे ६ तास उलटून गेले होते.... काहीही दृष्टीपथात येत नव्हते.... छातीचा भाता आता फुटायला आला होता... या चढाईत फक्त दगड.. दगड आणि दगड... फरक एवढाच काही छोटे काही भले मोठे.... काहींचे बूड तळातील बर्फात घटट् रोवलेले तर काही उथळ... थोडयाशा सूर्यप्रकाशाच्या उबेने देखील बूड सोडून खाली झोकून द्यायला आणि वाटेतल्यांचा कपाळमोक्ष करायला सदैव तयार... या सर्व वेगवान धबडग्यात राहूलच्या छायाचित्रणाच्या आवडीचं आणि कौशल्याचाही कस लागत होता. प्रस्तरारोहण म्हणजे जीव की प्राण असलेला मी देखील चांगलाच एग्झाॅस्ट झालो होतो. कित्तीही थकलो असलो तरी... नो वरी... आमची ध्यासमुर्ती आमच्या समक्ष होती.


दुपारचे १२ वाजून गेले होते. तापमान अद्यापही शून्याच्या आसपास असावं... त्यामुळे आमच्या कॅमलबॅगमधील पाण्याचा संपूर्ण साठा गोठल्याने साधं पाणी देखील आता खूप महागलं होतं. क्षणभर थांबून सॅकमधील काही तरी तोंडात टाकावं म्हटलं तरी तेही शक्य नव्हतं. त्या अस्थिर दगडराशींतून सर्व जामानिमा आणि तोल सांभाळत असतांना अनवधानाने जरी एखादा दगडोबा सुटला तर जो काही कहर होईल त्याची कल्पना न केलेलीच बरी... आयुष्याचा तोल जाणे.... पाय घसरणे.... म्हणजे नेमके काय याचा, याची देही याची डोळा अनुभव घेत होतो. सुमारे दोन हजार फुट उंचीवरून खालच्या दरीतील दृष्य पाहणे नकोसे होत होते. एवढ्यात एक कलिंगडाएवढा दगड सुटावून दरीत झेपावलाच. त्याच्या पडण्याचा आवाज कित्तीतरी वेळ येत होता. सारं खोरं दुमदुमलं.



हिंमतीची परीक्षा अजून चालूच होती... पुढील तासाभरात अचानक प्रस्तरखंडांमधील तो जीवघेणा चढ संपून क्षितीजावर काही हवंहवंसं दिसू लागलं... थकलेल्या गात्रांनीही वेग घेतला... इप्सीत जवळ येवू लागलं.... तसं रात्रीपासून रूसलेल्या हवामानानेही साथ द्यायला सुरूवात केली.... आणि मग कळलं की, आजूबाजूची धुक्यात डोकं खुपसून बसलेली शिखरं आमच्या हालचालींकडे निरखून पहात होती... पश्चिमेकडील विख्यात बडा शिगरी हिमनदीवरील नामांकित शिखरांपैकी सेंट्रल, टायगर टूथ, पापसूरा, धर्मसूरा आणि इतर अनेक पर्वतशिखरांनी आमच्यावर रोख धरला होता... अंतिम टप्प्यातील चढाई सुरू असतांनाच उत्तर पूर्वेला, अगदी शेजारीच एक शिखर तर आनंदाने टाळया पिटण्याच्याच तयारीत दिसून आलं... इतक्यात तो क्षण जवळ आला आणि अघटीतच घडलं... आमचा दोर संपला... पण काही झालं तरी आता माघार नाही... आता आम्ही देखील चांगलेच पेटलो होतो...



आणि मेहनत सफल झाली.....

हीच वेळ होती... आमच्या साहसी कौशल्याच्या प्रदर्शनाची... इतक्या वर्षात कमावलेल्या अनुभवाच्या आजमावण्याची... शेवटचे सुमारे २०० फुटांचे अंतर एकावेळी एकच जण चालू शकेल अशा त्या चिंचोळया, धारेवरील सैलसर चपटया दगडी चिपांवरून तोल सावरत... थकल्या-भागल्या शरीराने चालायचं होतं... आमचा बंगाली सहोदर दिलीप साहू थोडासा गोंधळला... त्याला देवेंद्र आणि मी आमच्या दोघांच्या मध्ये घेऊन ती धार आक्रमण्यास घेतली... गेली ७ तास सोबत करणारी ती विशाल प्रस्तरधार बर्फाळ शिखरमाथ्याच्या कुशीत अचानक बेमालूमपणे लुप्त झाली होती.... सरतेशेवटी तीच्याच सोबतीने दुपारी १ वाजून १० मिनिटांनी देवेंद्र गंद्रे, राहुल दंडवते, दिलीप साहू, संदीप शेट्टी, प्यारेलाल चाचा, नामग्याल नेगी, अमर नेगी, प्रविण, अशोक आणि मी अशा दहा जणांनी शिखरमाथ्यावर पोहोचण्याचा सुलतानढवा केला .... या साहसाची पूर्तता करू दिल्याबद्दल त्या आजवर अजिंक्य, अनामिक अशा शिखरमाथ्याला सामूहिक साष्टांग दंडवतच घातला गेला.



अशा वेळी डोळयांनी शांत रहायचं नसतं. त्यांनी दाटलेल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आणि उष्ण अश्रुधारांनी माथ्यावरील त्या मऊशार, शुभ्र बर्फावर रांगोळी काढायला सुरूवात केली... स्वा. सावरकरांच्या मार्गदर्शक विचारांची द्वाही जगभर फिरविण्याकरीता हा साहसरथ आता हिमशिखरांवरूनही दौडू लागला होता... लवकरच तो पृथ्वीच्या सर्वोच्च बिंदूवरही जाऊन पोहोचला तर नवल वाटायला नको.



लहरी वातावरणावर विसंबून चालणार नव्हते... फटाफट कॅमेरे चमकू लागले... शिखरमाथ्याला विधीवत श्रीफळ अर्पण केले गेलेेे आणि विविध ध्वज त्या अकलंक, अनाघ्रात शिखरमाथ्यावर सन्मानाने फडकू लागले.... स्वा. सावरकर संकल्पीत मादाम कामांचा पहिला भारतीय ध्वज, प्राचीन वैभवशाली हिंदुत्व आणि शिवरायांचा भगवा.... जनसामान्यांच्या सेवेत अहोरात्र कर्तव्यावर असलेल्या महारा़ष्ट्र पोलीसांचा निळा ध्वज, त्याचबरोबर देशाच्या अस्मितेचा मानबिंदू राष्ट्रध्वज तिरंगा.... सन्मानाने फडकवण्यात आले... हाकेच्या अंतरावरील भव्य असा मा. कर्चा पर्वत, मा. चेमा आणि परिसरातील इतर शिखरेही आमच्या जल्लोषात सामील झाली होती. शिखर सावरकर असं उंची नामाभिधान प्राप्त होणार या आनंदात अनादी काळापासून अनामिक राहिलेला तो शिखरपुरूष देखील नक्कीच गहिवरला असेल.


अत्यंत आनंदाच्या या क्षणी देखील काही विचार मनात उगाच डोकावू लागले... आजची तरूण पिढी आणि साहस यांच्यातील दुरावत चाललेलं अंतर... तरूण हा साहसी असलाच पाहिजे ... आजच्या तरूणांच्या साहसाची परिभाषा मात्र खूप वेगळी आणि नकारात्मक असल्याचे जाणवते... व्यसनांमध्ये थ्रिल शोधणा ऱ्या या माॅडर्न जनरेशनची मात्र किव येते.... गिर्यारोहणच केले पाहिजे असे काही नाही... तरूणाईची रग आणि रेटा प्रचंड असतो, ताकतीचा महापूर असतो... पण ती खरंच चांगल्या, विधायक कामांसाठी वापरली जाते का? हा प्रश्न मोठा आहे... गिर्यारोहण म्हणजे काय? हे ध्यानात न घेता, केलेल्या, घडलेल्या किरकोळ चुकांमुळे होणारे अपघात, होणारी जिवीत हानी .... याला जबाबदार कोण? गिर्यारोहण हे डोंगरात करायचं असलं तरी याला शिकारीचा एक साधा नियम तंतोतंत लागू होतो... ”सशाच्या शिकारीला वाघाची तयारी“ या संकेताचं तंतोतंत पालन व्हायला हवं.... शासन दरबारी देखील गिर्यारोहणासारख्या साहसी खेळांची सतत उपेक्षाच केली जाते.... आता तर दहिहंडीला खेळाचा दर्जा द्यायचा विचार सुरू आहे म्हणे... आनंदी आनंद आहे... आपण मात्र चांगलं तेवढं घ्यावं आणि मस्त डोंगरात फिरून यावं.


शिखरमाथ्यावर बसून, साऱ्यांच्या चेहऱ्यांवरचे भाव आणि मागील ४-६ महिन्यांच्या खडतर सरावाची, अथक तयारीची मेहनत आज फलद्रुप होतांना पाहणे खूपच आनंददायी होते. मोहीम जाहिर झाल्यापासून जीवा-सखा सहयाद्रीच्या पर्वतरांगांमध्ये मुंब्रा, माहुली आणि नाणेघाटात सरावाकरीता मारलेल्या फेऱ्या.. अनेक हितचिंतकांनी केलेल्या प्रार्थना, त्यांचे आशिर्वाद, कुटूंबियांना वाटणारी काळजी.... मोहिमेत १२ ते १५ किलो वजनासह रोज ८ ते १० तासांची प्राण कंठाशी आणणारी अतिउंचीवरील भटकंती, सहायक सहकाऱ्यांचे अपरिमित कष्ट हे सारं... सारं... डोळयासमोर चलचित्रपटासारखं दिसू लागलं.... त्याचवेळी तिन्ही सांजेला, घरटयाची ओढ लागलेल्या पक्ष्यासारखी आमची स्थिती झाली होती.


शिखरमाथ्याला पुन्हा एकदा वंदन करून माघारी फिरत असतांनाच अचानक क्षणभरच का होईना हिमपुष्पांचा वर्षाव झाला. या वृष्टीमुळे, आमच्या या दुर्दम्य साहसाला साक्षात स्वा. सावरकरांनीच शुभास्ते पंथानः असा आशिर्वाद दिल्याचा भास झाला... आणि ”ने मजसी ने....परत मातृभुमीला“ या ओळींतून महाकवींनी अनुभवलेल्या आर्ततेच्या नादातच आम्ही परतीच्या दिशेने मार्गस्थ झालो....



                                                                                                                                                                                                             धन्यवाद ---- 



मोहीम शिखर सावरकर ... एक ध्यासपर्व :- भाग ३

राजमाता  जिजाऊसाहेब  पुण्यस्मरण  

रविवार , दिनांक - १८  जून  २०१७

मोहीम शिखर सावरकर ... एक ध्यासपर्व : भाग ३



शिखर सावरकर दर्शन.... आणि शिबीर क्र. १ ची उभारणी ....

तळशिबिर उभारण्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे १७ आॅगस्टला आंम्हांला धीर धरवला नाही. नियोजित शिखर सावरकर दर्शनार्थ आम्ही लगेच सरसावलो. तळशिबिरावरून आरोहण आयुधे आणि आवश्यक खाद्यसामुग्री पाठीवर लादून आम्ही प्रचंड उत्सुकतेने पहिल्या लोडफेरीकरीता कूच केले. 


लोडफेरी म्हणजे मोहिमेच्या पुढील वाटचालीकरीता आवश्यक शिधा व साधन-सामुग्रीची मोहिमसदस्यांकडून होणारी वाहतूक. अतिउंची आणि तेथील प्रतिकूल हवामान यांच्याशी एकरूप होण्याकरीता ही एक आवश्यक प्रक्रियादेखील मानली जाते. या पहिल्याच लोडफेरीदरम्यान कर्चा पर्वतकडून येणाऱ्या नाल्याच्या सोबतीने सुमारे तासभर चालल्यानंतर तो नाला दोन भागांत विभागला गेला. त्याचे डावा आणि उजवा असे दोन भाग झाले. ही विभागणी केली होती एका महाप्रचंड शिखरधारेने. या दोन नाल्यांना विभागून त्या घोंघावत्या प्रवाहात पाय सोडुन ती मस्तपणे पहुडली होती. आणि याच शिखरधारेचे उत्तरेकडील टोक म्हणजे आमचे नियोजित ”शिखर सावरकर“. 





समोरील डाव्या नाल्याशी आता आंम्हांला काही देणेघेणे उरले नव्हते. त्यामुळे उजव्या नाल्याच्या उजव्या तीराने आम्ही हळू-हळू एक वेगळीच उंची गाठत पुढे निघालो. त्या उंचीवर आम्हीच नाही तर आमचे सखेसोबती मार्गदर्शकांची देखील चांगलीच फॅ....फु... होत असल्याचे दिसून आले.





लोडफेरीच्या पहिल्या तासांभरातच अपेक्षित हिमशिखराचे दुरून का होईना अचानक दर्शन झाल्याने मंत्रमुग्ध झालेले आम्ही साडेचार तासांची पायपीट करून सुमारे ५००० मीटर उंचीवरील शिबीर क्र. १ कधी गाठले ते कळलेच नाही. पूर्वनियोजित शिखर दृष्टीपथात आल्याने आणि शिबीर क्र.१ उभारल्याने मोहिमेचा रथ विजयपथावर आता वेगाने दौडू लागला.



तळशिबिरापासून शिबिर क्र. १ ची ही वाटचाल हा एक मोठा छळ म्हटल्यास वावगे ठरू नये. महायुद्ध काळात हिटलरला जर याची कुणकुण लागली असती तर त्याने छळछावण्या उभारल्याच नसत्या. अगदी चार आण्याच्या नाण्याएवढया आणि त्याहूनही चपटया आकारापासून ते मोठ-मोठाले अवाढव्य शिलाखंड सुद्धा नखशिखांत धार लावून पहुडलेले आणि अस्थिर देखील. त्यांच्यावर चालतांना पाठीवरच्या ओझ्यासह स्वतःचा तोल सांभाळण्याची कसरत करणे हे एक दिव्यच होते. चुकूनही तोल गेला तर एखादया कोळीणीने उभा-आडवा मासा चिरावा त्याप्रमाणे कापले जाणे नक्की होते. एकदोन वेळा अशी वेळी देखील आली पण किरकोळ दुखापतींवर निभावून गेलं हे नशिब.






या दिव्यातून सहीसलामत पार पडावं तर एक खूप मोठा प्रश्न तेथे आवासून उभा होता... पाणी.... हो शिबिर क्र. १ वर पाणीच नव्हतं... अथांग पसरलेल्या या दगडराशी जशा वरून कोरडया तसेच त्यांच्या खालीदेखील पाणी उरले नव्हते. 





हा प्रदेश तसा कोरडाच. इथे पावसाचे प्रमाण अगदी अत्यल्प. हवामानात देखील एक कोरडेपण सतत जाणवतो. इथला भुरभुरता बर्फ देखील कोरडाच असतो. कपडयांवर पडला तरी कपडे भिजत नाहीत हे विशेष.. पाण्याचा खूप शोध घेवूनही ते न मिळाल्याने शेवटी अगदी उंचावरून बर्फ आणून त्यांपासून पाणी मिळवले.... आमचे इंधन संपण्याचा एक मोठाच धोका इथे पत्करावा लागला... वरच्या शिबिरांकरीता वेगळे इंधन आरक्षित ठेवूनच ही रिस्क घेतली गेली... तसेच अनेक सदस्यांनी पिण्याकरीता गरम पाण्याचा त्याग करून या प्रश्नावर अंशतः का होईना मात केली.



पहिल्याच लोडफेरीत अतिरिक्त सामानासह केलेली मजबूत तंगडतोड, भयंकर कोरडया हवामानातील दगदग, पाण्याची कमतरता अशा कसरती काहीशा जास्त झाल्याने मोहिमसदस्यांना विश्रांतीची नितांत गरज होती. तसेच मोहिमेचे एक ज्येष्ठ सदस्य श्रीरंग नाडगौडा यांचे आजच तळशिबीरावर आगमन होणार होते. या दोन्हीं महत्वाच्या बाबी पाहता मोहिमनेता देवेंद्र याने आज तळशिबीरावर राष्ट्रीय सुटी जाहिर केली. देवेंद्र नांवाचा अगाध महिमा दुसरं काय ? 




१८आॅगस्ट रोजी मोहिमेची कुमक वाढली. मुंबई पोलीस दलातील सहायक पोलीस आयुक्त श्रीरंग नाडगौडा म्हणजे आमचे रंगासर मोहिमेवर रूजू झाले. दिवसभरात मोहिमेच्या पुढील हालचालींवर सल्लामसलत घडून दुसऱ्या  दिवशी म्हणजे १९ आॅगस्टला आणखी एका जादा लोडफेरीचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.






अतिशीत हवामानातही मोहिमेचं वातावरण आता चांगलंच तापू लागलं होतं... एक वेगळं गांभीर्य आमच्यात भिनू लागलं होतं... तरी शिबिरांवरील थट्टा मस्करी काही केल्या कमी होत नव्हती... रोज रामप्रहरीच उठून राहूल किचनमधील विकी, अशोक आणि प्यारेलाल चाचा यांना पिडायला एकदम तय्यार असायचा... नाश्त्यापासून दिलीप आणि संदीपची एकमेकांवरील शेरेबाजीच्या बेफाम जुगलबंदीला सुरूवात व्हायची... त्यात देवेंद्र आणि मी असे दोन निष्पाप जीव मात्र उगाच भरडले जात असू... 




मोहीमेतील मोठया प्रमाणातील खाद्यपदार्थांची चंगळ आणि सतत त्यावरील रेसिपिंची अनावश्यक बकवास यामुळे हाडाचा आरोहक असलेला बंगाली बाबु दिलीप वैतागून जायचा... ”तुम लोगोंको खाने के सिवा और कुछ दिखताही नहीं क्या?“ संदीप म्हणजे बेंगलोर की चटणी आणि देवेंद्र हा पुण्याचा लाडू असे त्याने नामकरणच केले होते... त्यातही सगळयाच बाबतीत तपशीलवार माहिती सांगण्याच्या सवयीमुळे त्याने संदीपला कुत्सितपणे सांयटिस्ट देखील ठरवून टाकलं होतं... या सगळयातून सतत हास्याचा एक हलकल्लोळ शिबिरांवर तयार व्हायचा... 



कितीही वादावादी, चिडाचिडी झाली तरी शेवटी दिलीपचा एक मायेचा हात मात्र सगळयांवरून अलगद फिरायचा... त्याच्या हातात खरंच जादू होती... तो अगदी आवडीने सगळयांची मालीश करून दयायचा... 


आंम्हांला एकत्र नांदतांना पाहून, आम्ही सर्वजण पहिल्यांदाच भेटत होतो यावर कोणीही विश्वास ठेवला नसता. इतकं छान आमचं मेतकुट जमलं होतं... तळशिबिरावर हा लेख लिहित असतांना देखील या सर्व चाळीशी उलटलेल्या बालकांच्या गमती-जमती पाहून मला देखील त्यांत सामील होण्याचा मोह आवरत नव्हता... पण या सर्वांगसुंदर अनवट मोहिमेवर लिहिण्यातला आनंद देखील खूप मोठा होता.


मोठी कामगिरी.... शिबिर क्र. २ उभारले....

मोहीमेतील सुरुवातीचे मजे-मजेचे दिवस मावळतीला आल्याने आता संगराचा अंदाज येऊ लागला होता. अजिंक्य शिखराचा मान-मरातब काय असतो, त्यातील आव्हानांची प्रतवारी काय असू शकते ? याची चाहूल एव्हाना आंम्हांला लागली होती. दुसऱ्या लोडफेरीने याची जाणीव आंम्हांला चांगलीच करून दिली. 





अतिउंचीवरील अतिश्रमाने आता मोहिमसदस्य जेरीस येवू लागले, पण म्हणतात ना ”हिंमत-ए-मर्दा तो मदद-ए-खुदा“ या न्यायाने आम्ही २० आॅगस्टला सर्व चंबूगबाळं आवरून शिबीर क्र. १ वर शिफ्ट झालो. इतकेच नाही तर पुढील चढाईचा आढावा घेण्याच्या दृष्टीने त्याच दिवशी तात्काळ सुमारे ५४०० मिटर उंचीवरील शिबीर क्र. २ ची काहीशी दुरून का होईना पण पाहणी देखील केली. 



या पाहणीतच पुढच्या सुलतानढव्यामुळे एकिकडे मन कातरणीची सुरुवात तर दुसरीकडे चांगल्या, दर्जात्मक आरोहणाची भुक उत्तमप्रकारे भागण्याचा बहारदार कार्यक्रम पुढ्यात दिसू लागला.




दुसऱ्या लोडफेरीहुन तळशिबीरावर परतल्यानंतर झालेल्या चर्चेदरम्यान असं ठरवण्यात आलं की, मोहिमेच्या तळशिबीरावर आता एक आणीबाणी कक्ष उभारावा. कारण आता वरच्या शिबीरांवर कधी काय होईल? याची काहीही शाश्वती नव्हती. आणि तळशिबीरावरील या आणिबाणी कक्षात दोन निधड्या हिंमतीच्या, अनुभवी, तरबेज शिलेदारांची आवश्यकता होती. 




मोहिमेची ही अतिमहत्वाची बाजू लक्षात घेवून अनेक मोहिमांचा अनुभव असलेलेल्या श्रीरंग नाडगौडा आणि राजेंद्र वराडकर यांना ही जबाबदारी देण्यात आली. मोहिमेच्या यशाकरीता या दोघांनीही ही जबाबदारी मोठया आनंदाने स्विकारली आणि अहोरात्र इमानेइतबारे निभावली देखील.


शिबीर क्र. १ वरील दोन लोडफेऱ्यांमुळे  यशासमिप पोहोचलेल्या संघाला आता लक्ष्य खुणावू लागले होते. त्यामुळे २१ आॅगस्ट रोजी लगोलग शिबीर क्र. २ पर्यंत म्हणजे मोहिमेतील निर्णायक टप्प्याची लोडफेरी देखील मोठया उत्साहात, साग्रसंगीत पूर्ण करण्यात आली. 




शिबीर क्र. १ पासून अथांग पसरलेल्या प्रचंड आणि धार लावून बसलेल्या दगडराशींतून पाठीवरील ओझ्यासह कशीबशी मार्गमक्रणा पूर्ण करावी तर प्रचंड टणक अशा बर्फउतारावरील अघोरी चढाई समोर दत्त म्हणून हजर. त्या खडकाळ बर्फउतारावरील अडचणींना तर अंतच नव्हता. अनेक ग्लेशिअर टेबल्स ( मश्रुमच्या आकाराची नैसर्गिक बर्फरचना) तेथे तयार झाली होती. दिवसाच्या वाढत्या तपमानामुळे ती टेबल्स कधीही कोसळण्याच्या बेतात होती. पायाखालचा बर्फ कितीही टणक असला तरी त्याखालून वाहणा ऱ्या , रक्त गोठविणाऱ्या बर्फाळ प्रवाहाच्या विचारांनीच आम्ही थिजून जात होतो. छुप्या हिमदऱ्यांचा धोका देखील मोठा होता, पण त्यांना भ्यायला,  त्यांचा घास व्हायला आम्ही इथे आलोच नव्हतो. 




उरात धमक आहे, आणि ध्येयमूर्ती साक्षात शिखर सावरकर समोर आहे, तर मग येवू दे, संकटे कितीही, भिणार आम्ही नाही या आवेशात त्या पूर्णपणे गोठलेल्या हिमनदीच्या पृ़ष्ठभागावर जरा त्यातल्या त्यात बरी व सुरक्षित जागा पाहून शिबीर क्र. २ ची  उभारणी केली. तोच हिमवृष्टी आणि चाव ऱ्या आणि वाऱ्याचा बेफाम कहर सुरू झाला. सोबत आणलेली साधनसामुग्री कशीबशी तेथील मोठ्या दगडांच्या आडोशाला व्यवस्थितरीत्या झाकून आम्ही तेथून पळ काढला... तोही, उदया पुन्हा भेटूच... असा सज्जड दम देवूनच.





वाईट हवामानाचा असहकार...

शिबीर क्र. १  वर २२ आॅगस्टचा दिवस उगवला तोच मुळी वाईट हवामानाची लक्षणे घेवून. सर्वत्र धूक्याचे साम्राज्य ... पाउस... आणि साबुदाण्यासारख्या हिमकणांचे बरसणे... आज उन आमच्यापर्यंत पोहोचलेच नाही. भयंकर थंडीचा सामना करीत आम्हीच त्याला शिबीर क्र. २ वर गाठले. चांगलेच खडसावले त्याला.... 




दुपारनंतर मात्र हिमवृष्टीने पुन्हा बराच जोर धरला आणि आमच्या धैर्याचा कडेलोट सुरू केला. पण आम्हीही काही कच्च्या गुरूचे चेले नव्हतो, हे त्याला समजायला थोडा वेळ गेला. 


शिबिर क्र. २ वरील रात्रीची थंडी निर्दयी होती. मॅट्रेसच्या, तंबूच्या खालूनही शरीराचा संपूर्ण कारभार गोठविणाऱ्या या भयंकर थंडीने आमची झोपदेखील कुठल्या कुठे भिरकावून दिली. थकल्या जीवांना थोडी विश्रांती मात्र नितांत गरजेची होती. त्याचवेळी महान शास्त्रज्ञ कलाम साहेबांच्या शब्दांनी मनात फेर धरला होता. ”स्वप्ने ती नाहीत जी तुम्ही झोपेत पाहता, तर खरी स्वप्ने ती जी तुमची झोप उडवतात“ अशीच काहीशी आमची अवस्था होती.




त्या रात्री झोप अशी आमच्यापर्यंत अालीच नाही. अन् एका साजि ऱ्या दिवसाचा उदयास्त मात्र होऊ लागला होता. २३ आॅगष्ट..... पहाटेचे साडेतीन..... रात्रभरात झोप अशी नाहीच... तपमान जवळ-जवळ उणे १० ते १५.... अगदी कुडकुडत बाहेर येवून पहातो... तर हाय रे दैवा... संपूर्ण खोरे धुक्याने ओसंडून वहातंय.... दुष्यमानता शुन्य... काहीही निर्णय घेणे अशक्य... शेजारच्या तंबूला आवाज दिला.... तर ती भूतंदेखील रात्रभर अशीच जागी... 




अशा निर्णायक क्षणी देखील तुमची प्रसंगावधानता जागी असेल तर गिर्यारोहणात एक जादुई शब्द आपल्या मदतीला नक्की धावुन येतो, तो म्हणजे ”कॅलक्युलेटेड रिस्क“... बोलून-बोलून गुळगुळीत झालेला असला तरी या शब्दात जादू नक्कीच आहे. ती वापरता मात्र आली पाहिजे. अशा वेळी आम्ही त्याच जादूचा करिष्मा पहायचा निर्णय घेतला. 




रात्रभराच्या जागरणाने सकाळी काहीच खायची इच्छा होत नव्हती... हवामानाने असा खो दिल्यामुळे आम्ही सर्वजण काहीसे उदासच होतो... सुमारे ६ वाजेपर्यंत वातावरण निवळण्याची वाट पाहून मोठ्या हिंमतीने शिबीर क्र. २ सोडले आणि एका महान घटनेच्या निर्माणाकरीता प्रत्यक्ष चढाईचा शुभारंभ केला.






                                                                                                                                क्रमशः 

पर्वतकन्या कारवी...

जागतिक पर्यावरण दिवस 
दिनांक ०५ जून २०१७ 

पर्वतकन्या कारवी
विसेक वर्षांपुर्वी डोंगरांशी जन्म जन्मांतरीचं सख्य जमलं. तेंव्हापासुन पायाला लागलेली भटकंतीची भिंगरी आजही थांबलेली नाही. या नादापायी सखा-सांगाती सह्याद्रीच्या विस्तीर्ण पर्वतरांगेतील गडकोटांवर अहोरात्र बेहिसाब भटकलोय. या अतरंगी घाटवाटांवर सोबतीला इतर कोणी असो-नसो पण "ती" मात्र असतेच. तीची भेट नाही, असं सहसा होत नाही.
ती माझी वाट पहात नाही, पण मी मात्र तीला भेटायला सदैव उत्सुक असतो. आणि या भेटीला तीची कधीच ना नसते. जर कधी नजरचुकीने माझं दुर्लक्ष झालंच तर मात्र हमखास वाट अडवुनच ती उभी राहते.

सुरूवातीला तर ती अोळखच दाखवत नाही. ब-याच मोठ्या दुराव्यानंतरचा रूसवा असतो तो. पण एकदा का सलामीची नजरा-नजर झाली कि मग मात्र पुढचं काम अगदी सोपं होऊन जातं. थोडं इकडचं-तिकडचं झालं कि वेळ-काळ पाहुन आमच्या गुजगोष्टींना हळुवार सुरुवात होते. आणि एकदा का ती रंगात आली कि मग आपलं काहीच चालत नाही. ना आकर्षक रंगरूप, ना चाफेकळीचा नाकनक्षा. तरीही ती सर्वांगसुंदर आहे यात वादच नाही.


अवखळ वाऱ्याच्या झोतावर अलवार हेलकावे घेणारी... टप्पोऱ्या, भरदार कळ्यांच्या भाराने जराशी झुकलेली... अन् दिलखेचक हलक्याशा निळ्या-जांभळ्या फुलांनी भरगच्च डवरलेली लावण्यवती कारवी पाहिली कि बस्स ... s s s s... आणखी काही पहायला मन राजीच होत नाही.
नाजुक, मखमली, कोवळ्या फुलांच्या आगमनाने तीची चांगलीच कळी खुलते. त्यावेळी तीचा अवघा रागरंग पालटून गेलेला असतो. काय तीचा तो थाट सांगावा... रानटी असली तरी अस्सल खानदानी सौंदर्यानं देखील पहातच रहावं अस्सा शालीन दिमाखाचा बाज ती सहजी सांभाळते. लाडाकोडानं वाढलेल्या, छचोर, भावखाऊ अन् नटमोगऱ्या सुवासाचा माज मिरवणाऱ्या अनेकींना ती लीलया गुंडाळते. अशी ही चितचोर कारवी गेल्या दोन दशकांहुनही जास्त काळ काळजात अश्शी घट्ट रूतून बसलीये कि तौबा तौबा..
बरं... झुडुप म्हणावं तर इतकी काही ती खुरटी नाही. अन् झाड म्हणायची सोय नाही. अशा शेलाटया अंगकाठीची कारवी, काही निबीड रानां- वनांत मात्र आपली वहिवाट मोडुन, पदर खोचून ताडमाड झाडांशी पैजा करताना दिसते. त्यावेळी तीचा आवेश एखाद्या झुंजार रणरागिणीसारखाच असतो.




किशोरावस्थॆत असतांना "जैत रे जैत" हा वेगळया धाटणीचा नितांत सुंदर चित्रपट पाहण्यात आला होता. यातील मराठमोळ्या, सोनसावळ्या स्मिता पाटील यांचा खणखणीत अभिनय तर काळजाचा ठाव घेऊन गेला कि हो.... स्मिताजींनी आपल्या अप्रतिम आंबट-गोड चवीच्या रायवळी सौंदर्याला, गहिऱ्या पाणीदार अभिनयाचा जो काही साज चढवलाय माशाल्ला....
अभिजात अभिनयाचा तो उत्तुंग आविष्कार पाहुन त्या घनघोर, रानातील अनवट रानवाटा न् किल्ले कर्नाळ्याचा तो बेलाग पाषाणस्तंभ देखील मोहरून गेला असेल.

राना-वनांतील, वाडी- वस्त्यांवरील दुर्धर तरीही रंगारंग आदिवासी जीवनाच्या दुर्गम पार्श्वभूमीवर साकारलेला हा एक मस्त, अविस्मरणीय चित्रपट. आपल्या लाडक्या स्मिताजींनी यात बिनधास्त, चंचल, काळ्या-कभिन्न फत्तरासारखी कणखर पण वनलावण्याची खाण असलेल्या चिंधीचा लाजवाब रोल उंची वकुबाने साकारलाय.

आसमानाला गवसणी घालू पाहणा-या चिंधी-नाग्याच्या या चित्रपटाची रंजक कथा चितारलीये ती साक्षात गोपाल नीलकंठ दांडेकर अर्थात समस्त भटक्यांसाठी प्रातःस्मरणीय अशा सह्यसखा गोनिदा यांनी.

तमाम सह्याद्रीचा ७-१२च नांवावर असणाऱ्या आप्पांसारख्या आशक मस्त फकिराने चिंधीसारखं हळव्या गाभ्याचं, निबर पात्र नक्कीच कारवीला समोर धरून रेखाटलं असावं. कारण उभा-आडवा सह्याद्री पालथा घालणा-या आप्पांच्या नजरेतून बेमिसाल कारवी सुटणं अशक्य. आजही कारवी दिसली कि आप्पांच्या जैत रे जैतमधील स्मिताजींनी साकारलेली बिनधास्त, रांगडी चिंधी सर्र..कन डोळ्यांसमोर उभी राहते.




कारवीच्या वेगळेपणाचा शोध घेत गेलो तर जंगली म्हणून हिणवल्या जाणाऱ्या या वनस्पतीच्या उपकारांपुढे लोटांगणच घालायला हवं. सह्याद्रीची पर्वतशिखरे अन् गडकोटांवर अपार प्रेम करणारांनी तर या कारवीच्या कर्जातच राहिलेले बरे. कारण इतकं अवाढव्य कर्ज आपल्या पिढ्या- पिढ्यांनीही फिटणारं नाही.

खरं तर प्रेमळ पित्याच्या विशाल देहावर लडीवाळपणे पहुडलेली कारवी हि सह्याद्रीची लाडकी लेक. पण हिच पर्वतकन्या बापाची आधारकाठीही झालीय हे आपल्या लक्षातही येत नाही. या कारवीनेच आपला महान सह्याद्री जपलाय, सांभाळलाय असं म्हटलं तर धक्का बसेल कि नाही ? पण असं धाडसी विधान करण्यामागे सबळ कारणं देखील आहेत. कारवीच्या प्रेमात पडून मी उगाच बरळत नाहीये.


उतारांवरील सैलसर माती ही द-या-डोंगरांचं सर्वस्व असते. त्यांच्या अस्तित्वात या मातीचा बेहिशेबी वाटा असतो. तीची धुप रोखण्याची बेमिसाल कामगिरी करुन कारवीने आपल्यावर डोंगराएवढे उपकार करुन ठेवलेत. डोंगररांगांमधील अगदी अडचणीच्या जागा देखील आपल्या कुटुंब-कबिल्यासह मजबूतरित्या व्यापण्याच्या या विलक्षण कर्तृत्वामुळेच सह्याद्री न् त्याच्या अंगा-खांद्यावर रचलेले गडकोट, अन् तटाबुरुजांच्या माळा आजही सहीसलामत, शाबुत आहेत.


इतिहास काळात तर या वनराणीने काय काय पाहिलं असेल या कल्पनेनेच शहारून जायला होतं. कधी कधी तर वाटतं की, मर्द मावळ्यांनी जाणत्या राजाच्या शब्दाखातर अख्खा सह्याद्री रक्तानं शिंपुन काढला. त्याच सह्याद्रीच्या मातीतुन उगवलेली हि... कारवी नाही तर थोरल्या धन्यांचे इमानी मावळेच कारवीच्या रुपात येऊन गडकोटांवर नजर रोखून उभे ठाकलेत कि काय या भावनेनेच शहारुन जायला होतं.
शिवछत्रपतींनी स्वराज्यकार्यात वतनं, इनामं मंजूर करतांना अस्मानी चंद्र-सुर्य असेपर्यंत गडकोट जागते ठेवण्याच्या आज्ञा दिल्या होत्या. त्यांच्या जिंदादील मावळ्यांनी जीवात जीव असेपर्यंत ही आज्ञा काटेकोरपणे निभावलीच. पण थोरल्या धन्याचा शब्द म्हणजे थेट काळजावर कोरलेला लेख. तो पाळण्यासाठी तत्पर मावळा कुडीतला प्राण गेल्यानंतरही, भुईत रोवलेल्या उभ्या भाल्यासमान कारवीचं रुप घेऊन जणु अविरत सेवा बजावतोय. गडकिल्ल्यांवर पसरलेल्या कारवीच्या अथांग शिस्तबद्ध फलटणी पाहिल्या कि याची प्रचिती येते.


आपला सह्याद्री म्हणजे लाव्हारसापासुन निर्मित अग्निजन्य खडकांची अत्त्युच्च अशी विस्तीर्ण पर्वतमाला. कालांतराने लाव्हा थंड होऊन नैसर्गिक प्रक्रियेत त्याच्या वरच्या थरांची यथावकाश झिज होऊन त्याचे सर्जनशील मातीत रूपांतर झाले. या संपुर्ण प्रक्रियेत या मातीची भुमिका नितांत महत्वाची ठरते. हीच माती वैशिष्टयपूर्ण निसर्ग अन् जैववैविधता यांची जननी होते. पर्यावरणाचा असामान्य असा समतोल साधते. या किंमती मातीची धुप रोखण्याची अवघड कामगिरी मात्र कारवीने आपल्या शिरावर घेतल्याने तीच्या थरांखालचा, सह्यांचलाच्या मुळाशी असलेला आधाराचा मुळ कणखर खडक मात्र अभंग राहिलाय. सांगा राव आहे का काही तोड या अजोड कामगिरीला ?

वरवर पाहता इतर रानटी झाडी-झुडुपांसारखी वाटणाऱ्या‌ या कारवीचा नीट, सांगोपांग अभ्यास केल्यास लक्षात येते कि उगाच कुठेतरी आगंतुकासारखी ती रुजत नाही. निगुतीने जपलेल्या बागा-उद्यानांमध्ये तर ती ढुंकूनही दिसणार नाही. तीचा स्वतःचा एक वेगळा क्लास आहे, स्टँडर्ड आहे. अन् ती तो जबरदस्तरीत्या जपते.
सह्याद्रीच्या उत्तुंग पर्वतराजीत घुमणा-या भर्राट वाऱ्याचा बेलाग कडे-कपारींचा, गड-किल्ले आणि पर्वतपठारांचा स्वच्छंद सहवास कारवीला खुप भावतो. लोचटपणे कुणाच्याही वळचणीला जाणाऱ्यातली ती नाही. दऱ्या- खोऱ्यांत भटकतांना हिचं अपरंपार सामर्थ्य डोळे दिपवल्याशिवाय रहात नाही.



सह्याद्रीच्या कडेकपारींवर एकहाती मालकीहक्क गाजवणारी, मैलोगणती अथांगपणे पसरलेल्या साम्राज्याची ती एक अनभिषिक्त महाराणी. तरी तीला याचा ना गर्व ना अभिमान. गर्भश्रीमंत असूनही बडेजाव न करता साधं रहावं तरी किती? याचं जिवंत उदाहरण म्हणून कारवीचं नांव बिनधास्त घ्यावं.

असं म्हणतात कि कारवी सात वर्षांतुन एकदा फुलते. ती कसली फुलते ? ती सारा आसमंत फुलवून सोडते. तीचं ते फुलणं नसतंच मुळी. सह्याद्री अन् कारवी या बाप-लेकीचा तो एक आनंदोत्सव असतो. आणि या उत्सवात चराचराने सामील व्हावं असा तीचा अट्टाहास असतो. यात खरी लगबग उडते ती सतत भिरभरणाऱ्या मधमाशांची. या अपुर्व सोहळ्याचा आनंद लुटण्याकरीता मधमाशांच्या एकुण एक जाती-जमाती हिरीरीने सहभागी होतांना दिसतात. जणूकाही त्यांचं एक असं वेगळं संमेलनच भरलं असावं. याचं कारण विचाराल तर तेही तितकंच गोड आहे. कारवीच्या सर्वांगसुंदर फुलांना गंधमाधुर्य नसलं तरी मधुमकरंदाने ती मुसमुसलेली असतात. इतकंच नाही तर कारवी फुलते त्या मोसमातला मध हा खूप उच्च प्रतीचा असतो असं जाणकार सांगतात.

















नारळ जरी कल्पवृक्ष म्हणुन विख्यात असला तरी कारवीचाही कोणताच भाग वाया जात नाही याकडे कधी कोणी लक्ष दिलंय? मान्य आहे , टिकाऊ लाकूड म्हणून कारवी उपयुक्त नाही. पण दधिची ऋषींनी देवांना शस्त्रं म्हणुन स्वतःच्या अस्थि दान केल्या होत्या अगदी तसंही नसलं तरी कष्टाळू गिरीजनांच्या चंद्रमौळी झापांच्या भिंती होण्यासाठी कधी कारवी स्वतःला शेणा-मातीत लिंपुन घेते. तर कधी त्यांच्या मिठ-भाकरीसाठी यज्ञकुंडातल्या समिधांप्रमाणे स्वतःला चुलकांडात झोकून देते. थकल्या-भागल्या भटक्यांच्या मुखी लागणारा चहाचा पहिला घोट, अन् गरमा गरम पिठलं भातही कारवीचीच मेहेरबानी असते. रानावनातल्या गिरिजनांना तर हिचे अनेक असाध्य रोगांवरील रामबाण अौषधी गुणधर्म देखील चांगलेच माहिती आहेत.


केवळ महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या बेलाग पर्वतरांगा हे कारवीचं वसतीस्थान नाही. तर मध्यप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू आणि पोषक वातावरण असलेल्या इतरही काही राज्यांतुन कारवीच्या विविध प्रकारांचा टवटवीत फुललेला संसार पहावयास मिळतो. ही आनंददायक माहिती मला नुकतीच मिळालीय. तेंव्हापासुन तर मी हवेतच वावरतोय.

गुलछबु फुलांचा हंगाम गेल्यानंतर कारवी निस्तेज होत असेल असं जर कुणी समजत असेल तर तो निव्वळ गैरसमज आहे. तीच्या आन, बान, शानमध्ये यामुळे काहीही उणावत नाही. मस्त हिरवट-पिवळसर रंगाने ती वर्षभर तजेलदार दिसते. मोजक्या आयुष्याचा भर अोसरल्यानंतर मात्र ती सदेह उत्तुंग पर्वतांच्या छायेत विलीन होऊन जाते. पण या पर्वतकन्येच्या अंगी तिच्या पित्याचं अर्थात् बा सह्याद्रीचं रांगडेपण इतकं ठासून भरलंय कि जणु काही घडलंच नाही अशा टेचात ती पुढच्या हंगामात मागच्यापेक्षाही जोमदारपणे तरारुन येते.




खरं तर या गुणी वनस्पतीचं सखोल, बैजवार संशोधन होणं आवश्यक आहे. काही अज्ञात, उत्तम, उपकारक गुणवैशिष्ट्ये जगासमोर नक्कीच येतील. कारवीचं शास्त्रीय नांव Strobilanthes callosa असं काहीसं मिळमिळीत, निरसवाणंसं असलं तरी आपादमस्तक कारवी बावनकशी देखणी आहे. काही निसर्गप्रेमी हिचा बारकाईने अभ्यास करताहेत असं सद्या ऐकिवात आहे.

या रगेल आणि रंगेल कारवीची उगवणीची त-हा तर खुपच आनंददायी आहे. पहिल्या पावसातला तीच्या बिजारोपणाचा सोहळा मी सांगण्यापेक्षा न् तुम्ही ऐकण्या-वाचण्यापेक्षा तो प्रत्यक्ष पाहणे हा एक अवर्णनीय आनंद असतो. त्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत.




यंदाच्या वर्षी तर महाबळेश्वर आणि आसपास परिसरात ४ वेगवेगळ्या प्रकारच्या कारवी अभ्यासकांना दिसून आल्या आहेत. एकाच प्रकारच्या मदमस्त कारवीने मला हा लेखनप्रपंच करावयास भाग पाडले. विचार करा चार-चार प्रकारची दणकुन बेफाम फुललेली कारवी पाहतांना जीवाचे काय हाल झाले असतील? तो बेफाम, बेमिसाल नजारा, नजरेत सामावताना, ह‍दयात साठवतांना, आठवणीच्या कप्प्यांत ठासून भरतांना खरंच जीव कातावून गेला असेल. आणि हा अपूर्व सोहळा पाहण्याचे ते आयुष्यातील समृद्ध क्षण असतील यात शंकाच नाही.


अगदी पहिल्यापासुन माझ्या प्रत्येक निसर्गभेटीला अविस्मरणीयतेचा साज चढवणाऱ्या , दऱ्या-डोंगरांना, गड-किल्ल्यांना स्वर्गिय सौंदर्याने मनमुराद सजवणाऱ्या, सह्याद्रीचा कोपरा न् कोपरा कणखरतेने व्यापून त्याच्या संरक्षणासाठी आपलं अवघं अस्तित्वच खर्ची घालणाऱ्या या लाडक्या पर्वतकन्येस मानाचा मुजरा...


ऋणनिर्देश :- लाडक्या कारवीच्या सजावटीकरीता आपली सर्वोत्तम छायाचित्रे देऊन उपकृत करणाऱ्या सर्वश्री संजय अमृतकर, शेखर राजेशिर्के, योगेश अलकेरी, यतिन नामजोशी, निखील हळबे, सुरेंद्र मसुरकर यांचे मनःपूर्वक आभार.