इथे रंगला... सोहळा... छांदिष्टांचा...

इथे रंगला... सोहळा... छांदिष्टांचा...

इथे रंगला... सोहळा... छांदिष्टांचा...

सांगा कसं जगायचं ?... 

कण्हत-कण्हत कि गाणं म्हणत ?...

तुम्हीच ठरवा...

पेला अर्धा भरला आहे... असं सुद्धा म्हणता येतं...
पेला अर्धा सरला आहे... असं सुद्धा... म्हणता येतं...
सरला आहे म्हणायचं... कि भरला आहे म्हणायचं...

तुम्हीच ठरवा...

सांगा कसं जगायचं?
सांगा... ना... कसं जगायच ?

एका खास प्रसंगी,...  माझ्या आवडी-निवडी आवर्जून जपणाऱ्या  पत्नी सरिताने उत्कटतेने भेट दिलेल्या "काॅफी हाऊस" या गाजलेल्या अल्बममधील हे अपुर्व बोल आहेत सदाबहार कवी मंगेश पाडगावरांचे... त्यांच्या या दमदार, सकारात्मक ओळी, प्रचंड ताकदीच्या अभिनयाबरोबरच वैशिष्ट्यपुर्ण आवाजाचं धनीपण लाभलेल्या, अष्टपैलू कलाकार प्रशांत दामले यांच्या आवाजात ऐकून मी भारावूनच गेलो होतो...

काही वर्षांनी पुन्हा एकदा त्याच दिव्य ओळीची आठवण करून देणाऱ्या आणि छंदांच्या साह्याने मस्त-मस्त कसं रहावं? याची शिकवण देणाऱ्या एका अवलिया छांदिष्टाची अचानकच भेट झाली... आणि दिवस अक्षरशः सत्कारणीच लागला...

आयुष्यभर निगुतीने जपलेल्या आपल्या लाडक्या छंदांना वाढतं, फोफावतं आणि बहरतं पहात... उताराला लागलेल्या ६५ वर्षीय "तरुणाईचा" नेमाने नाही तर क्षणाक्षणाला अन् जोमाने आनंद लुटत मनसोक्त जगणाऱ्या... आगळ्या-वेगळ्या छंदांच्या एका बादशहावर म्या पामराचा एक छोटासा लेखनप्रपंच ...

-  -  -  -  -  -  -  -  -  -  -  -  -  -  - -  -  -  -  -  -  -  - 


वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही ... 
तर... वेडी माणसंच इतिहास घडवतात...

शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे यांच्या या प्रेरणादायी ओळी मला खुप आवडतात... नुकतीच या ओळींची प्रचीती आली त्याचीच ही चित्तरकथा...  

माझ्या अविरत भटकंतीमागची शक्ति आणि प्रेरणास्त्रोत म्हणजे आमचे लाडके कुटुंब सरकार... लढवय्या मराठ्यांचा वैभवशाली इतिहास आणि त्यांच्या शास्त्रशुद्ध अभ्यासाची आवड त्यांनी ब-याच कारणांमुळे अनेक वर्षांपासून काहीशी  सुप्तावस्थेत बाजूलाच काढून ठेवली होती...

पण, मागील काही काळातलं... आमचं सहकुटुंब, नियमित, वाढतं, गिर्यारोहण आणि गडकोटांवरील सततच्या भटकंतीमुळे ती ऐतिहासिक आवड आपोआपच नव्याने आणि प्राधान्याने पुढे-पुढेच येत गेली... त्याचं पर्यवसान असं झालं कि, त्यांनी नोकरी, घर, मुले आणि त्यांचा सगळ्यात मोठा व्याप म्हणजे मी... अशा अनेकविध व्यापात प्रचंड व्यस्त असूनही... एक आघाडीचे इतिहास अभ्यासक आणि ऐतिहासिक शस्त्रसंग्राहकांच्या प्रभावळीतलं अग्रक्रमाने उभरतं नांव म्हणजे बदलापुरचे रा.रा. श्री. सुनिल कदम... यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु झालेल्या एका विशेष अभ्यासक्रमांतर्गत ऐतिहासिक अशी मोडी लिपी... मनापासून शिकायचं ठरवलं... आणि सांगायला अभिमान वाटतो कि चक्क महिन्याभरातच वेळ मिळेल तसा अभ्यास करूनही परिक्षा दिली आणि उत्तम गुण मिळवून उत्तीर्णही झाल्या... त्यांच्या प्रमाणपत्र वाटप आणि कौतुकसोहळ्याच्या कार्यक्रमस्थळी हजर राहणं हे ओघानेच येत असल्यामुळे चक्क रविवार असूनही सक्काळी-सक्काळीच ठाण्यात पोहोचलो ...

कार्यक्रम अतिशय छान, आटोपशीर, समर्पक आणि उत्तरोत्तर रंगतच जाणारा होता... विशेष काय?... तर शिवछत्रपतींच्या मराठेशाहीचा जीता-जागता इतिहास म्हणजे दुर्गश्री आप्पासाहेब परब व ज्येष्ठ इतिहास अभ्यासक, तज्ञ आणि शासनाच्या दुर्गसंवर्धन समितीचे सदस्य सर्वश्री पांडुरंगजी बलकवडे... यांचेकडून मराठ्यांच्या अटकेपारच्या दैदिप्यमान पराक्रमाच्या खणखणीत इतिहासावर आधारित तपशीलवार न् घणाघाती विवेचन एकून अभिमानी उर दाटून आला होता... आणि कानांनी तर ही अविट मेजवानी पार मेंदूपर्यंत पोहोचविण्याची कामगिरी उत्तमरित्या फत्ते केली होती ...

कार्यक्रम संपन्न झाला आणि त्या अपुर्व नादातच ब्राम्हण सेवा संघाच्या हाॅलमधून बाहेर पडलो... मग मात्र प्रकर्षाने आठवण झाली ती आमच्या गरीब बिचाऱ्या  आणि खंगल्या-खपाटीला गेलेल्या पोटाची... इतका वेळ आमचं शरीर... पुढ्यात सुरू असलेल्या महान इतिहासाचा संगर... डोळे, कान आणि मेंदूने टिपकागदासारखं टिपण्याच्या कामगिरीत मग्न होतं... त्यामुळे बापड्या पोटाकडे थोडं दुर्लक्षच झालं... मग शोधाशोध सुरु झाली एखाद्या चांगल्या क्षुधाशांती भवनाची... ठाण्याची प्रसिद्ध मिसळ कि, इतर काही? असं हो ना करता-करता... आमच्यातील ज्येष्ठ-वरिष्ठ शेखर राजेशिर्के याने एक हाॅटेल सुचवले... त्याचं नांव ऐकून खरं तर आम्ही सगळेच गोंधळात पडलो... पण मग पोट आणि पायांनी संगनमत करून हट्टाने तिकडचाच रस्ता तात्काळ धरण्यास भाग पाडले...

श्री विनायक जोशी काकांच्या सोबत ... 

 

एकदाचे आम्ही सगळे "कुटिरोद्योग उपाहारगृहात" शिरलो... आणि अक्षरशः हैराण-परेशान होऊन गेलो... अगदी अलिबाबाच्या गुहेतच शिरल्यागत अवस्था होऊन गेली. हाॅटेलातील एकेक आश्चर्ये पाहत असतांनाच त्या सर्व कारभाराचे कर्ते करविते आणि छांदिष्टांच्या पंक्तीतील मोठे मानकरी असलेले हाॅटेलचे मालक श्री. विनायक जोशी हे तिथल्या तिथेच झालेल्या थोड्याशा परिचयात... अगदी खास ओळख असल्यासारखे येऊन आमच्या गप्पांत सहजच सामील होऊन गेले... त्यांच्या उपाहारगृहातील अप्रतिम चवीच्या पदार्थांबरोबरच उद्बोधक आणि प्रेरणादायी गप्पाष्टकांची रंगारंग मालिका आमच्या खाण्याच्या टेबलावरच सुरू झाली...

तर... हे विनायकराव जोशी काका... म्हणजे एक अपार क्षमतेचं... भरदार आणि जबरदस्त छांदिष्ट व्यक्तिमत्त्व ... हाॅटेलात जागोजागी पद्धतशीरपणे मांडून ठेवलेल्या त्यांच्या संग्रहातील पितळी आणि इतर धातुंच्या मुर्त्या, दिवे, लामणदिवे, समया, झुंबरे आणि इतरही अनेक महत्वपूर्ण बाबींसह जपलेला सागरी खजिना पाहून आम्ही सगळे हरखूनच गेलो होतो...  पण त्यांच्याशी झालेल्या बहारदार गप्पांदरम्यान् त्या अवलिया... अलिबाबाच्या गुहेतलं येक येक दालन उघडत होतं... तसतसे आम्ही आणखीनच मुग्ध होऊन जात होतो...

साध्याशा काडेपेट्यांचासुद्धा इतका विशाल संग्रह केला जाऊ शकतो... हे जोशीकाकांना भेटल्यावर तपशीलाने कळतं... जगभरातील रंगबिरंग्या, दिमाखदार काडेपेट्यांनी त्यांचं आयुष्यदेखील रंगीन होऊन गेल्यामुळे याबाबत ते एकदम ओघवत्या वाणीतच बोलतात... या काडेपेट्या त्यांच्या आयुष्याचा जणू एक महत्वाचा घटकच होऊन गेल्या आहेत.

बरं... हे एक झालं ... आता जरा...संच पुढे दुस-याकडे वळूया... साधी-सुधी बाटल्यांची, बुचं उघडण्याची ओपनर्स... आपण रोज आणि अनेकवेळा पाहतो, काम झालं कि विसरुनही जातो... कुठेही टाकून देतो... त्यात काय एवढं विशेष? पण थांबा... त्यातील अगाध वैशिष्ट्ये... ही  जोशीकाकांचा ओपनर्सचा प्रचंड संग्रह बघितल्यावर आपल्या डोक्याला झिणझिण्या आणल्याशिवाय रहात नाहीत...

एकापेक्षा एक सरस, विविधांगी आकाराचे, रंगांचे, अनेकविध धातूचे, जबरदस्त कलाकारीचे आणि जगभरातील दिमाखदार, भावखाऊ ओपनर्सच्या एका जबरदस्त संग्रहाचे धनी आहेत ते... साधे ओपनरही इतक्या प्रकारचे आणि इतके सुंदर असतात हे त्यांचा भव्य संग्रह पाहिल्यावरच कळतं...


इतकंच नाही बरं का? या सगळ्या अव्यापारेषू उद्योगाच्या जोडीला निसर्गात भटकण्याची आवड शांत बसू देत नाही... म्हणून घरातच लावलेल्या सुंदरशा बागेत बागकामाचाही एक सर्वांगसुंदर छंद त्यांनी अगदी निगुतीने सांभाळला आहे... पर्यावरणाला जपण्याचं व्रत घेतल्याप्रमाणे फक्त देशी झाडांची रोपे तयार करणे त्यांची अनेक ठिकाणी लागवड करणे असे उद्योगही यांच्या छंदयादीत कायमचेच समाविष्ट झालेले आहेत...

आता जरा हे सगळं बाजूला ठेऊन... जरा दुस-या अंगाला वळूया...  तरुणपणी तर... यांनी सह्याद्रीतील अनेक गड-कोटांवर आणि नगाधिराज हिमालयाच्या अंतरंगी येथेच्छ आणि मनसोक्त भटकंती देखील केली आहे हे कळताच... हेच एवढं राहिलं होतं कि काय यांचं?... असंच वाटून गेलं. त्यांच्या अशा एकेक छंदांची माहिती अलिबाबाच्या गुहेतल्या अजब-गजब गुप्तदालनांतून बाहेर पडत होती तसतसा आमच्या सर्वांच्या तोंडांच्या चंबूचा आकार वाढतच चालला होता...


त्यांनी वर्णन केलेली एकेक गोष्ट ऐकून गिर्यारोहणाबरोबरच फिल्म मेकिंगच्या क्षेत्रात चांगलंच नांव कमावणारा शेखर राजेशिर्के, मुद्रा ट्रेकर्स या नामवंत गिर्यारोहण संस्थेचा संस्थापक आणि ज्येष्ठ गिर्यारोहक दत्ता चाळके, गडकिल्ले भटकंतीमधली युथ आयकाॅन, "दुर्गसमशेर" हमिदा खान, गिर्यारोहण, पाकशास्त्र आणि आता इतिहास या विषयांत झपाटल्याप्रमाणे काम करणारे आमचे परमप्रिय सरकार सरिता शिंदे आणि अस्मादिक असे गेली २५ वर्षांहुनही अधिक काळ निसर्ग, डोंगर आणि गडकोटांना तिर्थक्षेत्र मानून सुखेनैव भटकंती करणारी मंडळी देखील बेक्कार चक्राऊन गेलो... गडगंज भटकंतीदरम्यान बंबाळ्या रानात चकवा लागल्यासारखीच आमची अवस्था होऊन गेली होती.

एकाच माणसाने इतके छंद का करावेत? हे पाहून इतक्या कमी कालावधीत त्यांच्याबद्धल खरंतर जबर असूयाच आमच्यात निर्माण झाली होती... एखाद्याने किती म्हणून छंद जोपासावेत? याच्यावर शासनास सांगून काहही कायदेशीर नियंत्रण आणता येतील का? याबाबत आ मचा विचारही सुरू झाला होता... असो. (जास्त फाजिलपणा बरा नसतो...)

या तरुण तरतरीत जोशीकाकांचं वय आज सुमारे ६५च्या घरात आहे... पण जोश  मात्र आजही २०-२५चाच दिसतो... इतक्या यशस्वी माणसाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेल्या त्यांच्या आयुष्याच्या साथीदाराविषयी जाणून घेण्याची आमची उत्कंठा जागृत झाल्याने सहजच बोलता-बोलता त्यांच्या अर्धांगीनीचा विषय काढला... तर एखाद्या वीर जवानाने आवडीच्या विषयावर बाह्या सरसावूनच पुढे यावे अशा उत्साहाने त्यांनी आपल्या जीवनसंगीनीबद्धल तुफान एक्सप्रेसच्या जोशपुर्ण आवेशातच धाड... धाड... धाड... सांगायला सुरुवात केली... (हा देखील त्यांचा एक आवडता छंदच बरं का?)

पुर्वाश्रमीच्या कु. हेमा मालवणकर... सुमारे ३०वर्षांपुर्वी महाराष्ट्राच्या गिर्यारोहण विश्वातलं एक दमदार आणि जोमदार नांव... म्हणजेच आताच्या सौ. हेमा जोशी...  या मोकळ्या-ढाकळ्या गप्पाष्टकांदरम्यान, थोड्याशा आजारपणामुळे त्यांची भेट मात्र होऊ शकली नाही... पण एकंदर ढोबळ माहितीवरून त्यांच्या प्रचंड व्यक्तिमत्त्वाचा केवळ अंदाज बांधता आला ... आणि त्यावरच ... आम्ही जे स्वतःला भटकंती आणि साहसाच्या विश्वातले तिसमारखाँ समजतो ... तर त्यांच्या अपार कर्तृत्वासमोर आमच्या इतक्या मोठ्या कारकीर्दीनेही मारच खाल्ला... असंच म्हणावं लागेल...

ज्या काळात बायकांनी साडीचा पदर आणि घराचा उंबरठा यांच्या बाहेर येणं ही मोठीच आफत समजली जायची त्याच काळात आमच्या या जोशीकाकींनी भर ठाणे आणि मुंबईत उमद्या घोड्यांवरून मुबलक प्रमाणात घोडा फेकत स्वारी केलीय... ओपन जीप रस्त्यावर भरधाव आणि स्वतः चालवत लोकांना हैराण करून सोडलंय ...

इतकंच नाही तर लग्नापूर्वी जोशीकाकांना भेटायला एकदा त्या घोड्यावरूनच घरी आल्या होत्या हे सांगतांना जोशीकाकांचा गौरवर्णी चेहरा किंचीतसा लालसरतेकडे झुकल्याचं दिसलं... यावरून या दोघांतील नितांत प्रेम आज या वयातही जबर शाबूत असल्याचं स्पष्टच होऊन गेलं... त्यांच्यावर भरपुर प्रेम करणं हादेखील आमच्या जोशीकाकांनी जोपासलेल्या अनेकविध छंदांपैकिच एक प्रमुख छंद बरंका...

आपल्या या हिंम्मतबाज जोशीकाकींनी अनेक होतकरू महिलांना घराबाहेरच्या विश्वाची चांगलीच ओळख करून देत त्यावेळी महिलांच्या एका तगड्या गिर्यारोहण पथकाची (लेडीज माऊंटेनिअरिंग क्लब) निर्मिती केली होती... याद्वारे त्यांनी सह्याद्री म्हणू नका... कि हिमालय म्हणू नका... या दोन्ही विस्तीर्ण पर्वतरांगांमधील उत्तुंग पर्वतशिखरांवर आपल्या कर्तृत्वाचा डंका त्या काहीशा अडनिड्या काळातही चांगलाच गाजवला होता... आणि त्याच काळात महिलांना घेऊन त्यांनी ख-या अर्थाने थरारक राॅक क्लाईंबिंग आणि आता ज्याला आपण रियल या Adventure का काय म्हणतो ना? ते सारं सारं मनसोक्त आणि स्वच्छंदपणे करून सवरून आता उतारवयात सहधर्मी जोशीकाकांसह आयुष्यभर प्रचंड ऊर्जेने जपलेल्या आपल्या छंदांना वाढतं बहरतं पहात त्यातून एक अपार आनंद नित्यनेमानेच नाही तर क्षणाक्षणाला मिळवत आपलं ज्येष्ठपण मजेत एंजाॅय करताहेत.

या दांपत्याबाबत सहजच बोलता-बोलता गुरूस्थानी असलेल्या ज्येष्ठ गिर्यारोहक प्रदीप केळकर सर (शिवछत्रपती पुरस्कार विजेते) यांच्याकडे विषय काढला तर त्यांनीही या दांपत्याच्या इतर कार्यकलापाविषयी आणि विशेषतः गिर्यारोहणतल्या योगदानाबद्धल गौरवोद्गारच काढले... लेडीज माऊंटेंनिअरिंग क्लबला त्यांनी केलेलं मार्गदर्शन, त्यावेळच्या आघाडीच्या महिला गिर्यारोहक विजयाताई गद्रे, शिवाय भारतबाला बचेंद्री पाल यांच्यासोबत माऊंट एव्हरेस्ट मोहिमेत सहभागी झालेल्या के. सरस्वती या सर्वांनी एकत्रितपणे केलेल्या अनेक गिर्यारोहणविषयक कार्यक्रमांच्या आठवणींनी तेही अगदी हळवे होऊन गेले... आता साठीच्या पुढे असलेली ही  सारी मंडळी आजही आंम्हांस मार्गदर्शनाकरीता सतत उपलब्ध आहेत हे पाहून आमच्या या मधल्या पिढीचा प्रचंड अभिमान वाटून गेला...

आपल्या विविध छंदांच्या आधारे दैनंदिन जगण्याचं असं सणा-सोहळ्यात रुपांतर करणाऱ्या आणि त्यातून मनसोक्त आनंदाची उधळण करणाऱ्या या ज्येष्ठोत्तमांना उत्तम आयुरारोग्य लाभावे अशी सदिच्छा व्यक्त करून... अन् खरंतर त्यांच्या कर्तृत्वाला मनोमन सलाम करतच त्यांचा निरोप घेतला... तो पुन्हा आणि लवकरात लवकर भेटून त्यांच्या वेगवेगळ्या छंदाद्वारे निर्मित असाधारण ऊर्जेचा लाभ घेण्यासाठीच... कारण अशी प्रचंड उर्जा आणि जबरदस्त सकारात्मकतेने आयुष्याकडे बघणा-या माणसांची अखंड साथ-संगतच... आपलं आपणच धकाधकीचं करुन घेतलेलं जीवन काहीसं सुलभ आणि सुकर करण्यासाठी कायम मार्गदर्शक ठरत असतात...

आणि विशेष म्हणजे दुनिया फक्त वाईटानेच भरलेली आहे... असं नेहमीच नकारात्मक गृहितक न मांडता, नीट डोळे उघडे ठेऊन थोडासाच त्रास घेऊन, मनापासून शोधलं, पाहिलं कि ही अशी सारी सकारात्मकतेने भरपूर तत्त्वं आपल्या आजूबाजूलाच गवसतात... पण... पण काय?... हे अजूनही लिहायची गरज आहे ?
जोशी काकांच्या सोबतचा कुटीरोद्योग ... 

ठाण्यासारख्या अतिप्राचीन नगरीचं नांव स्वकर्तृत्वाने सार्थ करीत आपल्या जगावेगळ्या छंदांद्वारे आनंदी जगण्याचं अफलातून समीकरण सहजसुलभ करून सांगणाऱ्या जोशी कुटुंबियांकडे पाहून मला माझ्याच "दोनोळी" सहजच आठवून आल्या...

खुश रहना... जिंदगीकी हँसी आदत बनालो... 
कटती नहीं ये युँही... इसे हमदम बनालो...

No comments:


Post a Comment












एका सुंदर रविवाराची... सुरस कथा



एका सुंदर रविवाराची... सुरस कथा... 

पल्या रोजच्या आयुष्यात उगवणारा कोणता दिवस कसा असेल? याचा काही नेम नसतो... इतरांचे माहित नाही पण आंम्हां भटक्यांचे डोंगरातले, गडकोटांवरचे दिवस तर लाजवाबच असतात... पण कधीतरी शहरातला एखादा गुळमुळीत दिवसही त्यातील काही खास घटनांमुळे विशेष अविस्मरणीय ठरतो...अन् उबटशा, टिनपाट जगण्याला एक मस्त हवीहवीशी किनार लाऊन जातो... अशाच एका होऊन गेलेल्या दिवसाला आठवता-आठवता एका लेखुटल्याने सहजच आकार घेतला.

भटकंतीची भिंगरी पायाला लागली कि रविवारी घरी असणं दुर्मिळ होत जातं... पण अशा घरी असलेल्या रविवारच्या निवांत सकाळची तुलना मात्र कश्शाशीही होऊ शकत नाही...

अशाच एका घरच्या रविवारी... अगदी आरामात 'पहाटे' ८ च्या सुमारास किलकिले डोळे अजून नीटसे उघडलेच नव्हते...  पृथ्वीतलावर आमचं विमान अजून पुरतं टेकलंच नव्हतं ... तोपर्यंत आमच्या सरकारांनी अगदीच मंजूळ स्वरात आमच्या नांवाच्या उद्घोषणा चालू केल्या होत्या...

त्याचं झालं असं कि, कधी नव्हे ते तिला सकाळी लवकर उठून जायचं होतं मैत्रीणींसह पिकनिकला. आणि हा निर्णय अस्मादिकांस न पटल्याने आमच्या असहकाराचा झेंडा रात्रीपासूनच फडकलेला पाहून सकाळच्या मस्त गारव्यातही तिचा पारा चांगलाच चढलेला होता.

सुरुवातीला थोड्याफार किरकोळ करकुरीत आणि चुरचुरीत सुखसंवादानंतर घरात रणमैदान छेडलं जाण्याची चिन्हं दिसू लागली. मग, बरेच दिवस दडवून ठेवलेलं पांढरं निशाण हळूच बाहेर काढून तयारीत ठेवलं. आणि संधी साधून एक हुकुमाचा पत्ता टाकत ते पांढऱ्या तोंडाचं (खरं तर पांढऱ्या पायाचं ) निशाण नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा सपशेल फडकवलं अन् अटकळीप्रमाणे सरतेशेवटी निसटत्या विजयाचे मानकरी ठरलो (असं म्हणायला हरकत नाही.) (होय... लक्षात ठेवा... अशा लढ्यांंध्ये पांढऱ्या निशाणाच्या बळावरच यश मिळवता येतं... अनुभवाचे बोल हो दुसरं काय?) सोबत फिरायला नेण्याच्या अटीवर एकदाचा तह झाला. (आता तहाच्या अटी, शर्ती मात्र विचारु नका हं...)

सरकारांनी ठरवलेल्या दिवसाचं माझ्याकडून अशा प्रकारे खोबरं केल्यानंतर, आता तिने बाह्या सरसावून भरल्या तोफांची तोंडं माझ्या कार्यक्रमाकडे वळवली. हो ... ना ... करता करता दिवसभराच्या कार्यक्रमावर भिरभिरणारं संभाव्य वादळ गरमागरम, अन्  तेही काळ्या चहाच्या पेल्यात बुडवून एकदाचे बाहेर पडलो.

जखमी, अर्धमेल्या तट्टावरुन अर्थात कायमच आजारी असलेल्या मोटारसायकलवरून आमची स्वारी निघाली दादरकडे... हाश्श... हुश्श... करत एकदाचा कित्तेभंडारी हाॅल गाठला.

शिवछत्रपतींच्या हिंदवी साम्राज्याचा एक मोहरा पार दक्षिणेकडील तामिळनाडूमध्ये चित्रदुर्ग उर्फ जिंजीच्या अश्मदुर्गाच्या रुपाने आजही आपल्या धन्याच्या अल्काबांचे पुकारे नित्यनेमाने देत उभा आहे... या दुर्गाचं रुपडं मात्र इतरांपेक्षां पार न्यारं आहे... त्याची जातकुळी अन् बाज एकदम अलग आहे... 'अश्मदुर्ग' हा शब्दप्रयोग धाडसाने करण्याचं कारण याला पाहिल्यावरच कळतं. तसे सगळेच गडकोट दगडा-मातीचे अर्थात अश्मदुर्ग असले तरी त्या सर्वांतही हा विशेषच ठरतो... शिवछत्रपतींनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याचं एक मुळ तिकडे दक्षिणेकडे रुजलेलं आहे ही भावनाच उर भरून येणारी आहे...

तर... अशा अस्सल जातीवंत अश्मदुर्गाच्या ५०हून अधिक वाऱ्या केल्यानंतर बिनचूक, विनाखंड वाणीच्या अनिकेत या "वाघाच्या" बुलंद घणाघाती डरकाळ्यांच्या रुपातलं वर्णन् आणि निरूपण ऐकून कान धन्य झाले. रविवारी आणि तेही सकाळच्या वेळी लाभलेला चांगला, भरगच्च, दर्दी श्रोतावर्ग हेच "गडवाट" या संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचं खणखणीत यश होतं.

अशा उमद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुंबईतले किल्ले आणि मुंबईतल्याच थंडावलेल्या, हरवलेल्या अाणि गवसलेल्या तोफा या विषयावर त्यातलाच एक दर्दी असलेल्या नितीन पाटोळे आणि उपस्थितांसह, लवकरच छेडल्या जाणाऱ्या एका विषयावर चांगलीच चर्चा रंगली... बरेच दिवस प्रतिक्षेत असलेलं दुर्गमहर्षी प्रमोदजी मांडे यांचा महाराष्ट्राच्या दुर्गविश्वावर आधारीत नवीन ग्रंथही इथंच संग्रही आला.

आजचा दिवस विशेषच असल्याची चुणुक सकाळपासूनच मिळू लागली होती... त्यामुळे जे मिळेल ते आपलं असं म्हणत, बरंच काही पदरी पाडून घेत, गिर्यारोहण, गडकोटच नाही तर अनेक विषयांतील दर्दी आणि व्यासंगी असलेले राजेंद्र वराडकर (स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्यवाह)  यांच्या सहवासाचा आणि प्रेमपुर्वक आदरातिथ्याचा छान पाहुणचारही घेता आला. मग व्याख्यानाला आलेल्या अाणि  भटकंतीच्या अवकाशात अमाप भरा-या घेतलेल्या अरूण (खरं तर ... तरुण ) गवेकरांसोबत परेलचं कामगार स्टेडिअम जवळ केलं. मराठा सन्मान सोहळ्यानिमित्त तेथे एका ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाची ब-याच वर्षांनंतर होणारी भेटही आजच व्हायची होती.

सर्वश्री गिरीशराव जाधव... त्यांच्या प्राणघातक, जीवघेण्या तरीही अपरंपार निगुतीने जपलेल्या अद्भुत शिवकालीन शस्त्रसंग्रहाच्या प्रदर्शनार्थ आपल्या संपुर्ण लवाजम्यासहित तेथे आलेत असं सकाळीच समजलं. अन् लगोलग घरच्या रविवारच्या सर्व महत्वाच्या कामांना बाजूला ठेऊन जाधवरावांच्या सेवेत, मुजरा आणि आशिर्वादाकरीता आम्ही जोडीने गेलो... फोनवर कितीही संपर्क असला तरी तो केवळ दिलासाच असतो आणि प्रत्यक्ष भेट मात्र अनुभूतीच असते. 

सुमारे दहायेक वर्षांनी या पुण्यात्म्याच्या निवांत भेटीने मरगळलेल्या तना-मनाला उभारी लाभली... स्वीकारलेल्या कार्यात झोकून देण्याच्या विचारांना तेज तर्रार धार काढली गेली... राजेहो... या पुनर्भेटिने आयुष्यातला हा एक दिवस फार मोठ्या सत्कारणी लागला...

या उच्चविद्याविभुषित कोल्हापुरकराने उभं आयुष्य महाराज सेवेत अपार आनंदाने घालवलंय. आणि ज्या शस्त्रास्त्रांच्या साह्याने दौलतीच्या थोरल्या धन्याने देवांनीही हेवा करावा असं स्वराज्य आपल्या शुभंकर हाताने उभारलं त्याच देवतुल्य हातांचा परिसस्पर्श घडलेल्या औजारांच्या शोधात आणि त्यांच्या बळावर या अवलियाने एक आगळंवेगळं शस्त्रविश्व उभारलंय.

शस्त्र म्हणजे काय? त्यांचे प्रकार किती? ते चालवावे कसे? आणि कोणी ? त्यांची निगा कशी राखावी? त्याचा वापर  कशासाठी करावा? असे अनेक प्रश्न आपल्याला पडलेले असतात... आपल्याला फक्त तलवार माहिती असते पण त्यातही अनेक भेद, पोटभेद असतात... तिच्या प्रत्येक सुट्या भागाला वेगळं नांव असतं त्यामागे बराच काथ्याकुट असतो...शस्त्रांचंही एक शास्त्र असतं आणि हे सारं सारं साध्या-सोप्या सरळ भाषेत ऐकावं ते आमच्या  गिरीशजींकडूनंच. शस्त्रे ही केवळ धातुची नसतात. तर लाठी-काठी ही लाकडी अस्त्रे देखील प्रसंगी तितकिच प्राणघातक ठरतात अशी शस्त्रवचनं गिरीशजींकडून ऐकतांना आपल्या ज्ञानात भर पडत असते... उर भरुन येत असतात... मुठी आवळल्या जातात... इतकंच काय? हिरड्याही आपोआपच सळसळू लागतात.

शस्त्रास्त्रांच्या शोधात,, दुर्ग-पर्वत, गडकोट, गाव-शहरे, वाड्या-वस्त्या काही काही सोडलं नाही या मर्दमराठ्याने. अवघ्या आयुष्याचा सुलतानढवा करून सोडला. अाणि आता तर सत्तरीपुढची उमर गुजरलीय... पण आवेष ? एखादी लांबसडक धोप पाणी चढवल्यानंतर अपूर्व तेजाने, नवपराक्रमाच्या, नवोन्मेषाने झळाळून उठावी, कात सोडलेला पन्नग नवतारुण्याने, विद्युतलहरीसम सळसळून निघावा अगदी तस्सेच गिरीश जाधवराव आता एका अपुर्व कामगिरीसाठी सज्ज झालेले दिसले. त्यांच्या कार्याचं महत्व, त्यांच्या सहज सुलभ अन् ठसकेदार कोल्हापुरी लहेज्यात ऐकतांना, घोडखिंडीचं पावन तिर्थक्षेत्र केलेल्या, दोन्ही हाती चढवलेले दांडपट्टे नुसते दिखाव्यासाठी नाही तर डोळे उघडझापीचीही उसंत न देता वावटळीसमान गरागरा फिरवणारे बाजीप्रभू देशपांडेच डोळ्यासमोर उभे राहतात...   

काय म्हणावं या परमोच्च उत्साहाला? सत्तरीनंतरही कुठून येतं हे अपरिमित बळ ? असाच असतो का अपार अन् अगाध महिमा श्रीशिवसह्याद्रीचा?... इथं आजच्या ताज्या टवटवीत तारुण्याला मात्र नको त्या उद्योगांमुळे तिशी-चाळीशीतच 'काशी'यात्रेचे वेध लागलेले असतात...

जाधवरावांची भेट झालीकि एका किश्शाची आठवण हमखास काढली जाते... एकदा किल्ले रायगड भेटीत, एका अवखळ बैलाने भवानी टोकावरील गुहेत आम्हां तिघा-चौघांच्या समाध्याच उभारण्याचा घाट घालून त्या अवघड जागी जो भयंकर प्रसंग आमच्यावर बेतवला होता... त्या प्रसंगाला आठवून अंगावर शहारे उठलेल्या अवस्थेत मनसोक्त हसण्याचा रतीब ठरल्यानुसार त्या दिवशीही घातला गेलाच.

अशा अघळ-पघळ भेटीत सहजच आठवलं कि, माझ्या मोठ्या मुलाच्या आदित्याच्या बारशाचं आमंत्रण उशिरा मिळूनही ते आवर्जून हजर राहिले होते... बरं नुसतेच हजर राहतील तर ते जाधवराव सरकार कसले? मुलाच्या बारशाला येतानाही त्यांनी वाघनखं आणि शिवराया आणल्या होत्या... वर म्हणाले कसे? असं कसं? तुझा लेक आहे, तो काय साधा सुधा असणाराय का? आमचं बाळ न् आम्ही दोघंही धन्य होऊन गेलो. या शस्त्रगुरूच्या संगतीत आलं कि आयुष्याला धार चढल्याचा अनुभव आजही येतोच येतो.

धातूंची शस्त्रं थोडावेळ बाजूला ठेऊन ख-या शस्त्रांच्या अर्थात् शब्दांच्या म्हणजेच सोहळ्यातल्या पुस्तकांच्या दालनात शिरलो आणि हरवूनच गेलो... पुस्तकांशिवाय जगणं म्हणजे व्यर्थ काम... ग्रंथदालनात बराच वेळ रमल्यानंतर अचानकच कोणी दर्दी पेटीच्या तरल सुरावटींना छेडत असल्याच्या लकेरीने माझ्यातल्या तमाशाप्रेमीचं कुतूहल चाळवलं गेलं. पण पेटीच्या केवळ त्या सुरावटीच तमाशासंबंधीत होत्या आणि कार्यक्रम मात्र चक्क शाहिरीचा होता. माझा काहिसा रसभंग झाला. इतक्यात मंचावर आलेल्या १२-१३ वर्षांच्या एका कोवळ्या पोराने टिपेला चढवलेल्या आवाजात श्रीराजा शिवछत्रपती आणि त्यांच्या रानगट्ट्या मावळ्यांच्या आख्यानाला सहजी हात घातला. काय ती उमर ?... अन् काय तो आवेष ? राजे असते तर या बाळाला बोरन्हाण करतात तसं सोनमोहरांनीच आंघोळ घातली असती.

गिनिज बुक विक्रमवीर बालशाहिर पृथ्वीराज माळी याने आपल्या नाजूक पट्टीच्या तरीही तुफानी पहाडी आवाजात  श्रीशिवस्तुती ऐकवून कार्यक्रमात जान आणली. अवघं शाहिरी विश्व हे पोरगं दणाणून सोडणार यात काही शंकाच नाही उरली. ( या व अशा दिग्गज लोककलावंतांवर मागे एक लेख जमवला होता त्याची लिंक पुढीलप्रमाणे - शिवजयंती... जागर लोककलांचा...

https://m.facebook.com/story.php?story_fbid=1741703122563087&id=100001702477244 )


रात्रौ ८ च्या आसपास सोहळ्यातून बरंच काहि मिळवून (त्यात आमच्या हिने, सकाळच्या रागापायी केलेली बरीचशी खरेदी) बाहेर पडलो... तर आमची मोटारसायकल आम्ही गमावल्याचं लक्षात आलं... कुछ पानेके लिये कुछ खोनाभी पडता है... असं म्हणत शोध घेतला तर ... आमच्याच वाहतूक पोलीस बंधूंनी तीला सन्मानाने उचलून दादर येथे घेऊन गेल्याचे समजले... पोलीस दलाच्या सेवेत सुमारे पंचवीसेक वर्षं गेली असल्याने थोडंफार ओळखतात ... कार्यालयात गेलो तर लगेच परत मिळाली...

खिशात तिकिट असूनही टी.सी. दिसल्यानंतर कावरा-बावरा होणारा मी... पण केवळ भटकंतीच्या छंदामुळे, कोणीतरी मला ओळखून माझी मोटारसायकल परत दिल्याने माझ्या अंगावर चांगलं शेरभर मांस चढलं...अन् त्यामुळे प्रयत्नपूर्वक कमी केलेलं वजन मात्र झटक्यात वाढलं.

आता मात्र वेध लागले होते एका  गोड कामाचे... अहं... काहितरी गैरसमज करून घेऊ नका... धाकट्या बंधूराजांना झालेल्या कन्यारत्नाचं बाळमुख पहायला भयंकर व्यस्ततेमुळे दोन दिवसात सवडच झाली नव्हती...  रूग्णालयात जाऊन आमच्या घरच्या शिंदेशाहीतील सर्वात धाकट्या पातीला (अनुष्का - हे मी सुचवलेलं नांव ) भरभरून पाहिले... सरकारांनी आवर्जून आणलेल्या उत्तम बर्फीने उपस्थितांची तोंडं गोड केली... अन् अशा रीतीने... शहरातल्या एका सर्वांगसुंदर, अप्रतिम दिवसाचा कळसाध्याय पूर्ण होऊन अत्यंत गोड असा समारोप... सुफळ, संपुर्ण अन् संपन्नही झाला ...